मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

परी मी त्यासी न म्हणे संत

करिशी ते देवा करि माझे सूखे । परी मी त्यासी न म्हणे संत ॥१॥
जया राज्य द्रव्य करणे उपार्जना । वश दंभ माना इच्छे झाले || २॥
जग देव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भार वाही ।।३।।
तुका म्हणे भय न धरी मानसी । ऐशियाचे विशी करिता दंड ।।४।।
परमार्थ मार्ग म्हणावा तसा सोपा नाही . आज सकाळपासून विविध घडामोडी घडत आहेत . त्यात काही परमार्थातील आहेत काही राजकारणातील आहेत . एकमेकांची अब्रू चोहट्यावर आणण्यात धन्यता मानतात . " मतामतांचा गलबला । कोणीच ऐकेना कोणाला । थोर म्हणताच । वाया गेला ।।" हे एक संत वाचन आहे . संत नव्हती जागा माणसाच्या सारिखे ।। संत हे सांसारिक माणसासारखे नसतात. त्यांना कुठलीही उपाधी आवडत नाही . उपाधिरहित जीवन हे खरे संत जीवन असते . " मांडीना स्वतंत्र फड । अंगी अहंता येईन वाड ।।" हे नाथरायांनी चिरंजीवपदात सांगून ठेवले आहे पण ! कोण ऐकतो ? गड, फड , या उपाधीने महाराज शोभत नाही तर तो स्वरुपस्थितीने शोभत असतो . राजकारण आणि परमार्थ या दोन वेगळ्या बाजू आहेत . त्याची सरमिसळ होता कामा नये .
एकदा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांना एकाने संत कसे असतात असे विचारले ? तेव्हा त्याचे उत्तर त्यांनी दिले ते म्हणतात " हे देवा ! माझे काय व्हायचे ते होवो पण ! अशा व्यक्तीला संत म्हणणार नाही , ज्याला राजकारण करून परमार्थ करायचा , द्रव्य मिळवायचे,व आपले पोट भरायचे , ज्याच्या मनामध्ये दंभ आहे , दंभ म्हणजे असतो एक आणि दाखवतो दुसरेच , आणि इच्छेचे अधीन ज्याचे जीणे झाले आहे . अशा व्यक्तीला मी संत म्हणणार नाही . वास्तविक जगत ब्रहम आहे , देव आहे तरीही मी निवडनिवड करिन ज्यांना आत्मज्ञान नाही केवळ राजकारण करून आपले संतपण, महंतपण टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न जो करतो तो ज्ञानदृष्टी नसलेला आंधळा आहे असा व्यक्ती नुसता भारवाही हमाल आहे. त्याचे संतजीवन , महंतपण व्यर्थ आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या काळी सुद्धा असे काही महंत होतेही त्यांचा महाराजांनी तीव्र शबदात निषेध केलेला आहे. " भिक्षा पात्र अवलंबिणे । जळो जीणे लाजिरवाणे ।।" कष्ट न करता , ज्ञान नसताना भिक्षा मागणे हे लाजिरवाणे जीणे आहे . " हरिभजनें हे ढवळीले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ।।" हे साधूचे काम आहे . आता कुठेही पाहावे तर साधू ,महंतांच्या मारामाऱ्या , कुंभमेळ्यात तर तलवारीने मारामाऱ्या होतात हे ऐकणाऱ्याला लाज वाटते महंतपद, मंडलेश्वर , महामंडलेश्वर या पदव्या मिळवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात हे वास्तव आहे . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात कि " न होती ते संत करिता कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ।।१।। येथे नाही वेष सरते आडनाव ।निवाडे घावडावं व्हावा अंगी ।।२।। नव्हती ते संत धरीता भोपळा करिता वाकला प्रावरण ।।३।। नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराणे नव्हती संत ।।४।। नव्हती ते संत वेदाच्या पठणे ।कर्म आचरणे नव्हती संत ।।५।। नव्हती संत करिता तप तीर्थाटणें । सेविल्या वन नव्हती संत ।।६।। नव्हती संत माळा मुद्रांच्या भूषणे । भस्म उधळणे नव्हती संत ।।७।। तुका म्हणे नाही निरसीला देह । तोवरी अवघे हे सांसारिक ।।८।। तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा जर विचार केला तर मला वाटत नाही एखादा तरी खरा संत सापडेल कि नाही ? आणि अशा दांभिक संतांविषयी महाराज म्हणतात कि अशा माणसाला दंड करण्यात मला बिलकुल भीती वाटत नाही . किंवा ज्याला दंड करण्याचा अधिकार आहे त्याने तरी भय भरू नये .

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

खंडित शून्यवाद

जय हरी !  
अभावातून भावाची कधीही उत्पत्ती होत नसते व भावरूप पदार्थाचा कधीही अभाव होत नसतो . पण शून्यवादाची जे सहा नास्तिक तत्वज्ञान सांगणारे शास्त्रे आहेत ते म्हणतात कि " हे जग शून्यातून निर्माण झाले ". हे शून्यवादी अभाव प्रमाण मानतात पण विचार करा नसण्यातून असणे कधीच निर्माण होत नाही . शून्य म्हणजे अभाव . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात " न झाला प्रपंच आहे परब्रहम ।अहं सोहम ब्रह्म आकळले ।।" कोणतेही मिथ्या पदार्थाला अधिष्ठान सत्य लागत असते . सत्य अधिष्ठानाशिवाय मिथ्या पदार्थ भासत नाही . शून्यवादी मात्र म्हणतो कि काहीहि जे नाही तेच जग निर्माण करते . किती हास्यास्पद आहे . " वांझेचीया पुत्रा कैची जन्म पत्रिका ।।" वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कशी असू शकेल ? तसे जग अधिष्ठानाशिवाय कसे दिसेल किंवा भासेल ? " रज्जू सर्पाकार। भासियेले जगदंबर ।।" असे तुकाराम महाराज म्हणतात. ( विवर्तवाद ) एके हाती दंतु । जो स्वभावाता खंडितु ।।... ज्ञा . तात्पर्य शून्यवाद हा स्वभावात:च खंडित आहे . एक सुंदर दृष्टांत आहे ... एक भिकारी एका घराच्या बाहेर उभा राहून भिक्षेकरिता हाक मारतो व म्हणतो " माई भिक्षा वाढा " आतील बाई म्हणते कि " पुढे जा पुढे ! घरात कोणी नाही . ! शून्यवादाची अशी स्थिती आहे कोणी नाही म्हणणारा कोणी तरी आहे ना ? म्हणजे नाही म्हणायचे त्याकरिता सुद्धा कोणीतरी अगोदर असावे लागते . आणि खरोखर कोणीच नसते तर कोणीच उत्तर दिले नसते . आणि म्हणे शून्यातून जग निर्मण झाले . कधी कधी एखादा माणूस म्हणतो सुद्धा " अहो ! माझ्या बापाने काहीहि केले नाही मीच सर्व शून्यातून निर्माण केले ." यालाच वदतो व्याघात दोष म्हणतात. "नासते विद्यते भावो नाभावो विद्यते संत:।। " वेदांत जग नाही असे म्हणत नाही तो म्हणतो जग आहे पण कसे " रज्जू सर्पवत " ते हि तुम्ही म्हणता म्हणून अगदी सोप सांगायचे तर व्यवहारात सुद्धा लोक म्हणतात "दिसत तस नसत म्हणून जग फसत " स्वप्नातील पदार्थ स्वप्न काली दिसतात पण जागे झाले कि ते मिथ्या ठरतात . स्वप्नातील पदार्थ हे अनिर्वाचिनीय व अतींद्रिय आहेत तरी पण ते भासतात . व जागे झाल्यावर त्याचे अस्तित्व संपते . तद्वत ब्रह्मज्ञान झाले कि जगद्भ्रास मिथ्या ठरतो .म्हणून अभाव प्रमा मानणारा शून्यवाद सहजच खंडित होतो .

शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

।। परपीडे चित्त दुखी: होते ।।






जय हरी !

नवल र्तले! लाखा लाखाचे मोर्चे निघतात त्यामध्ये लोक शांतपणे चालतात कुठली घोषणा नाही, आरडा ओरडा नाही, "मूकपणे केलेला आक्रोश " सरकारला ऐकू गेला पाहिजे हि त्यांची धारणा आहे  . आत्मक्लेश करून घेणे हा आंदोलनाचा फार चांगला मार्ग आहे  . जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या तेव्हा महाराजांना किती क्लेश झाले , किती वेदना झाल्या ! पण त्यांनी प्रस्थापितांना दोष देत बसले नाही उलट १३ दिवस उपोषण केले व स्वतःला आत्मक्लेश करून घेतले आणि फलस्वरूप गाथा इंद्रायणीत व लोकगंगेत तरला . तसेच ह्या मोर्च्याचे कौतुक वाटते . कुठेही जाळपोळ नाही, फूटतूट नाही, उलट मोर्चा पुढे गेल्यावर स्वयंसेवक पाठीमागे स्वच्छता करतात . "मौनं सर्वार्थ साधनं ।।"हे सुभाषितकारांनी म्हटले ते किती सार्थ आहे . नेहमी बोलणार्यापेक्षा कधीही न बोलणारा जर बोलला तर तो मार्मिक बोलत असतो आणि अर्थपूर्ण बोलत असतो व त्याच्या बोलण्याचा परिणाम होत असतो. सतत बोलणार्यांची स्थिती उत्तरासारखी होते " बालिश बहू बायकांत बडबडला ।।" त्याची बडबड व्यर्थ ठरण्याची  शक्यता असते . कोणी नेता नाही ,  पुढारी नाही,इथे समाज मनच पेटून उठले आहे . अशीच एकी आणि संघटन जर मराठ्यांनी ठेवले तर ध्येय सध्या होणे अवघड नाही . जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी म्हटले आहे " यारे यारे लहान थोर । याती भलते नरी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ।।"  याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन एक चांगला समाज  घडविण्याचे श्रेय मिळाल्याशिवाय राहणार नाही .

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव





आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्वर ।।१।।
चौर्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्णु ।।२।।

आळंदी हे तर अनादी काळापासूनचे सिध्दांचे क्षेत्र आहे , तेथे ब्रहमदेवापासून ते इंद्रापर्यंत  अनेकांनी यज्ञ याग करून हि भूमी पावन केली आहे. व माउलींनी येथे वास्तव्य केल्यापासून या तीर्थ क्षेत्राची तर महती फार वाढली व भागवत धर्म मंदिराचा पाया ज्ञानोबांनी रचला आणि वारकरी संप्रदायाला एक मोठे व्यासपीठ व अधिष्ठान मिळाले . या क्षेत्राची वाढ व महिती श्री नाथ बाबांनी व श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केले . तुकाराम महाराजांनी तर स्वखर्चाने जणिर्णोद्धार केला . तुकाराम महाराजांचे चिरंजीव श्री नारायणबाबांनी तर ज्ञानोबा -तुकोबांच्या पादुका एकाच रथात ठेऊन आळंदी ते पांढरी असा आषाढीचा सोहळा सुरु केला पुढे तो वेगवेगळा झाला . व पुढे हैबत बाबांनी तर माउलींच्या पादुका गळ्यात घेऊन पंढरीला गेले . तात्पर्य या क्षेत्राची माहिती दिवसेंदिवस वाढतच जातेय . या क्षेत्राने महाराष्ट्राला हजारो कीर्तनकार दिले आहेत.
            तीर्थक्षेत्राचे काही नियम असतात , तिथे जी नदी असते त्या नदीमध्ये साबण लावून  अंघोळ करायची नसते, नग्न होऊन स्नान करायचे नसते . त्या नदीमध्ये लघुशंका करायची नसते. साबण लावून कपडे धुवायचे नसतात . कारण भाविक लोक ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करीत असतात. हे तिथले पावित्र्य सांभाळले गेलेच पाहिजे व तशी व्यवस्था तेथे कार्यरत असावयास हवी . परवा मी आळंदीला माऊलीच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा इंद्रायणीवर तीर्थ घेण्यासाठी गेलो आणि बघितले तर घाटावर जिकडे तिकडे कचरा पडलेला व घाणीचे साम्राज्य पसरलेले, व अशाही ठिकाणी मात्र घाटाच्या कामासाठी व इतर व्यवस्थेसाठी नगरपालिकेचा/ संस्थानचा  पावती फाडण्याचा टेबल लावलेला .आणखी थोडे पुढे गेलो तेव्हा निदर्शनास आले कि जिथे तीर्थ घ्यायचे तिथे काही महिला खुशाल कपडे साबण लावून धूत होत्या आणि हाच प्रकार सर्वत्र होता . तीर्थ कसे घ्यावे हा एक प्रश्न पडला तिथे नगरपालिकेचा कोणीही सेक्युरिटी नव्हता कि कोणी स्वयंसेवकही नव्हता . लोक भावनेने नदीत  उतरत होते पाय धुवून बाहेर येत होते पण ! तीर्थ घेत नव्हते . पण या स्थानिक लोकांना कोण काय म्हणणार ? त्यांचे प्रबोधन कसे करणार ? भारतात सर्व तीर्थात यापेक्षा वेगळी स्थिती नाही . मा . प्रधानमंत्री श्री मोदी साहेबांनी स्वच्छतेचा नारा दिलेला आहे . पण हे काम एकट्याचे नाही . मी ऑस्ट्रेलियात गेलो होतो तेथील स्वच्छता कमालीची आहे . यारा नावाची नदी आहे तेथे आम्ही गेलो तेव्हा आम्ही बघितले कि नदीच्या किनाऱ्यावर कुठेही कचरा घाण दिसली नाही . त्या लोकांना ते जमते पण आपण का नाही असा विचार करत ? मानसिकताच खराब झाली आहे. अर्थात हे सर्व स्थानिक लोकच करतात असे नाही तिथे जाणारे यात्रेकरू सुद्धा घाण करतात . तर मित्रांनो आपण सुरवात आपल्यापासूनच करूयात कुठेही रस्त्यावर , घाटावर, पवित्र ठिकाणी आपण कोणत्याही स्वरूपाची घाण करायची नाही . नेहमी आपल्याबरोबर एका पिशवीत कागदी पिशव्या ठेवायच्या आणि आपल्याकडचे जे काही टाकाऊ असेल ते त्या पिशवीत टाकायचे व जिथे डस्ट बिन असेल तेथे ते टाकून द्यायचे . रामकृष्ण हरी !!

भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
              

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

|| कामातुराणां भयं ना लज्जा ||

           


                  
                भारतीय तत्वज्ञानात चार पुरुषार्थ कल्पिलेले आहेत , धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष . यातील दोन पुरुषार्थ म्हणजे अर्थ आणि काम जरी साधले गेले नाही तरी चालते परंतु धर्म आणि मोक्ष मात्र संपादन केलेच पाहिजेत . तसेच अर्थ आणि काम हे पुरुषार्थ तेव्हाच पुरुशर्थ ठरतात जेव्हा त्यांना " धर्माची " चौकट असते " वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।" या तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे जर धन कमावले तर तो पुरुषार्थ ठरतो पण जर   म्हणजेच भ्रष्टाचाराने पैसा कमावला कि तो पुरुषापरध ठरतो . तसेच काम या पुरुषार्थाचे सुद्धा आहे " धर्माविरुद्ध भुतेषु कामोस्मि भारतषर्भ ।।" धर्मानुकूल काम हा पुरुषार्थ असतो . धर्माने विहित , निषिद्ध , काम्य, प्रायश्चित , कर्म अकर्म, विकर्म असे वेगवेगळे कर्माचे प्रकार सांगितले आहेत नित्य , नैमित्तिक कर्मे केलीच पाहिजेत व निषिद्ध कर्मे करूच नयेत व झालीच तर त्यासाठी वेगवेगळे प्रायश्चित कर्मे आहेत . असो काम म्हणजे इच्छा त्यातही सदिच्छा वेगळी आणि असदिच्छा वेगळी . समाजाची घडी नीट चालावी यासाठी धर्माने हे नियोजन केले आहे. पण आपल्यला माहित आहे कि कितीही चांगले नियोजन करा त्यात अम्मलबजावणी नीट होईल असे नाही . त्यात दोष राहतो आणि त्याचे परिणाम वाईट होतात .
                  चांगली प्रजा उत्पन्न व्हावी म्हणून धर्माने काम या विषयाला पुरुषार्थ ठरवले आणि त्याचे योग्य नियमन व नियोजन केले तर चांगली प्रजा उत्पन्न होते याचे अनेक उदाहरणे आहेत. व कामाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे भल्या भल्या व्यक्तींनी अत्याचार केल्याचे उदाहरणे आहेत . इतिहास पुराणातील उदाहरणे दिली कि हे म्हणतात पुराणातील वांगे पुराणात पण मित्रांनो तसे नाही ती एक प्रवृत्ती  आहे तिला काळाचे बंधन नाही . रावणासारख्याला काही कमी  नव्हते पण त्याने सुद्धा " हेमा " नावाच्या अप्सरेवर बलात्कार केला होता . तो पंडित होता ज्ञानी होता तरीही वासनेवर नियंत्रण मिळवू शकला नाही . इंद्राने वासनेपोटीच अहल्येशी समागम केला आणि शाप पदरात पडला . " महाराजांचा एक अभंग आहे "वासनेच्या सांगे नको जाऊ मना ।पहा त्या रावणा काय झाले ।।१।।।इंद्रा पडले भाग चंद्र झाला काळा । नारद चुकला चाळा भजनाचा ।।२।। " किंवा नाथ बाबा सांगतात कि " एडका मदन , केवळ पंचानन । धडक मारली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।।इंद्र चंद्रासी लाविला दरारा जेणे ।। तो जाण  केवळ पंचानन ।।" हि सगळी मोठ्यांची यादी आहे ज्यांना विधी निषेधाचे ज्ञान आहे अशांना वासना ताब्यात ठेवता अली नाही . अगदी ब्रहादेव तर स्वात:च्या मुलीच्या मागे वासनेने धावत होता . " ब्रम्हा डोलसते वेदार्थ ना कळे । तेथे हे आंधळे व्यर्थ होती ।। वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेडे नाही ऐसे सांगितले ।।" पण इकडे बघितले तर संत मंडळी मात्र सद्विचाराने " काम " या विषयावर मात  करू शकली . " जाई वो माते न करी सायास । आम्ही विष्णुदास तैसे नोहो ।। तुका म्हणे तुज जरी पाहिजे भ्रतार । तरी का इतर लोक थोडे ।।" याचा परिणाम असा झाला कि ज्या वाईट विचाराने ती श्त्री अली होती तीच बदलली आणि त्यांची अनुयायी झाली . म्हणून नियंत्रित काम हा पुरुषर्थ आहे आणि अनियंत्रित काम हा विनाशाला कारणीभूत होतो .
                      अनियंत्रित काम वासनेतूनच बलात्कार, अत्याचार असे  घडत असतात . अशा या वासनांध लोकांवर नियंत्रण  दोन प्रकारे ठेवले जाते १) संस्कारद्वारे २) कायद्याद्वारे ... रांझ्याच्या पाटलाने एका तरुण स्त्रीवर अत्याचार केला असता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा" चौरंग " केला म्हणजे हात पाय तोडून गाढवावरून धिंड काढली मग लोकांना कळले कि असे काही केले कि असे होऊ शकते . कामातुराणां भयं न लज्जा  वासनांध माणसाला भय वाटत नाही आणि लाजहि वाटत नाही . कायद्याचे भय नाही आणि नीतीची चाड नाही  . आता लोकशाही आहे अशा जबर शिक्षा होत नाहीत किंबहुना असे म्हटले जाते कि १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका  निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये . असे जर असेल तर गुन्हेगार कोर्टातून सुटून जातात हा आपला अनुभव आहे . तुकाराम महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतात " काय करू देवा सत्ता नाही हाती । दंडुनी पुढती लावू वाटे ।" हे देवा सत्ता हातात नाही , नाही तर असे अन्यायी अत्याचारी लोकांना मीच दंड केला असता . सत्ता परिवर्तन घडवते म्हणतात पण सत्ता ज्याच्या हातात आहे त्याची मानसिकता हवी . आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल मी का लिहतोय " कोपर्डीची " घटना सर्वांना ज्ञात आहे , दिल्लीत जेव्हा निर्भयाकांड झाले तेव्हा साऱ्या जगाने  दखल घेतली सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड लोक तर मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले होते .... ते योग्यच होते यात वाद नाही पण कोपर्डीची घटना त्याहून भयानक होती पण ! या घटनेला जातीय रंग देऊन दोन समाजात तेढ उत्त्पन्न झाली . आता हे दुष्टचक्र किती दिवस चालणार आहे . जाती जातीमध्ये सलोखा निर्माण होऊ शकत नाही का ? या सर्व गोष्टीला राजकारण कारणीभूत आहे . प्रत्येकजण जण तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेत असतो , फोटो छापून आणीत असतो . " तुका म्हणे ऐश्या नरा । मोजनि माराव्या पैजांरा ।।" किंवा तुका म्हणे याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगाव्या ।।" हा महाराजांचा सात्विक संताप आहे . दुर्दैव असे आहे कि आता जेलमध्येही या अशा लोकांची मोठी बडदास्त ठेवली जाते , तिथेहि हे गुन्हेगार त्याच तोऱ्यात वागत असतात. गुन्हा करणाऱ्याला भीतीच राहिली नाही . " सांगितले तरी नायकीती बटकीचे । पुढे शिंदळीचे रडतील ।।" असा शाप सुद्धा महाराजांनी दिलेला आहे. संस्काराने माणूस घडत असतो . धर्म माना  नका मनू हा भाग वेगळा पण परस्त्री मातेसमान मानायला काय हरकत आहे . "Brothers and sisters god is one "  हा संदेश स्वामी विवेकानंदानी अमेरिकन लोकांना शिकागो येथे दिला तेव्हा बंधू - भगिनी हा भाव त्यांना नवीन होता कारण त्यांना फक्त " Ladies and gentleman " एवढेच माहित होते.  दृष्टी बदलली कि जग सुंदर आहे आणि दृष्टी विकृत झाली कि जग हे नरक आहे . कीर्तनकार, प्रवचनकार, समाजसुधारक, नेते, पुढारी  हे सगळे उदबोधनात्मक बोलत असतात पण ! याचा परिणाम होत नाही . का ? त्याचे कारण म्हणजे " बोलते मगर करते नाही मुहसे भले लबाड ". वृत्तीसह कृती नाही " सर्वच कमर्शियल झाले आहेत त्यामुळे समाजाचा सुद्धा यांच्यावर विश्वास राहिला नाही . अध्यतमाच्या क्षेत्रात करोडो रुपयांची उलाढाल होत असते . पण सत्कारणी किती लागते हे ज्याचे  त्यालाच माहित . "सब पैसेके भाई आपणा कोई नाही " दहशतवाद्यास शाहिद म्हणण्याची प्रथा आपल्याकडे रुजवली जातेय . नथुराम गोडसेचे उद्दात्तीकरण केले जातंय हि कसली मानसिकता . स्वतंत्र्य लढ्यातील एक मोठा नेता बलात्कारी होता पण त्याचेही उदात्तीकरण झाले ...... एक खोटे दहा वेळा सांगितले कि ते खरे वाटू लागते . असो तरीसुद्धा लोकशाहीने आपणास विचार स्वतंत्र्य दिलेले आहे त्याचा उपयोग करून आपण आपल्या परीने आवाज उठवू अर्थात एवढया मोठ्या भाऊगर्दीत आपला आवाज विरून सुद्धा जाईल पण आपण प्रयत्न सोडायचे  नाही . " सदैव सैनिका पुढेही जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे ".

 भागवताचार्य  अशोकानंद महाराज कर्डीले 

सोमवार, ११ जुलै, २०१६

अभंग गीता (मंत्र गीता ) -जगद्गुरू श्री तुकाराम महाराज

जय हरी ।

जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा अभंग गाथा एव्हढेच वाङ्मय आपल्याला माहीत आहे पण !तुकाराम महाराजांचे आणखीही काही साहित्य आहे जे की काळाच्या ओघात लुप्तप्राय झाल्यासारखे आहे . जरासे माउलींनी भगवत  गीतेवर भाष्य लिहले , नाव ज्ञानेश्वरी अगदी त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी सुद्धा "मंत्र गीता " किंवा अभंग गीता नावाचा ग्रंथ लिहला आहे भगवत गीतेच्या श्लोकावर अभंगरूपात महाराजांनी भाष्य लिहले आहे . हाच ग्रंथ तुकाराम महाराजांची अनुग्रहित शिष्या  संत बहिणाबाई पाठक यांनाही हाच ग्रंथ दिला होता . . स्वतः: बहिणाबाईंनी त्यांना तुकाराम महाराजांनो कसा अनुग्रह दिला व मंत्र गीता दिली याविषयी अभंग लिहला आहे .
बहुत अंतरी शोक आरंभिला । का मज विठ्ठला मोकलिले ।।१।।
त्रिविध तापाने तापले मी बहु । जाईना का जीवु प्राण माझा ।।२।।
ताव अकस्मात सातव्या दिनी ।नामसंकीर्तनी घोषयुक्त ।।३।।
तुकाराम रूपे येवोनि प्रत्यक्ष । पूर्वपक्ष सांभाळिजे ।।४।।
नको करू चिंता मी तुजपाशीं ।घेई अमृताशी हातिचिया ।।५।।
गाय केले वत्स मुखी निघे धार । अमृत हे सार सेवी हेचि ।।६।।
ठेवोनिया कर मस्तकी बोलिला । मंत्र सांगितला कर्णरंध्री ।।७।।
म्या ही  पायावरी ठेविले मस्तक । दिधले पुस्तक "मंत्र गीता" ।।७।।
कार्तिक वद्य पंचमी रविवार । स्वामींचा विचार गुरुकृपा ।।८।।
आनंदले मन चिदरूपी कोंदले । उठोनि बैसले चमत्कारे ।।९।।
मंत्र पाठविती तुकोबास्वरूपा । स्वप्नामाजी कृपा पूर्ण केली ।।१०।।
अमृत पाजिले चवी अनारीसी । साक्ष ज्याची त्याची मनामाजी ।।११।।
बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची । तुकाराम साची पूर्ण केली ।।१२।।


तात्पर्य पूर्वी असे होते की ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवतगीता या प्रस्थान त्रयीवर भाष्य केली त्यांना जगद्गुरू , आचार्य पद प्राप्त होत होते विषय तो नाही पण जसे माउलींनी गीतेवर ओवीरुपात भाष्य लिहले तसेच मराठीमध्ये  अभंग या छंदांमध्ये तुकाराम महाराजांनी " मंत्र गीता " नावाचे गीतेवर भाष्य लिहले आहे भगवत गीतेच्या प्रत्येक श्लोक महाराजांनी  अभंग लिहलेले आहेत . हे अभंग " गीतार्थ कोष " नावाचा एक ग्रंथ आहे त्यामध्ये आहे . हा ग्रंथ संग्राहक श्री दिनकर विनायक भिडे यांनी संपादित केला आहे . वंदे मातरम फाऊंडेशन , मुंबई यांनी तो प्रकाशित केला आहे . परंतु जसा गाथा प्रसिद्ध झाला तशी ही मंत्र गीता प्रसिद्ध का होऊ शकली नाही ? किंवा वारकरी संप्रदायात या मात्र गीतेचा प्रचार का होऊ शकला नाही ? का जाणीवपूर्वक हा ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचूच द्यायचा नाही की काय ?  हे मला सतत आश्चर्य वाटत आलेले आहे . बरे ही मंत्र( अभंग)  गीता माझ्या पाहण्यात पण आहे . वारकरी संप्रदायातील अनेकांना हा ग्रंथ माहीतही नाही .




             

रविवार, ३ जुलै, २०१६

।। पीडिता हे राष्ट्र देखोनि जग ।

            मी  मागील आठवड्यात बीडला कार्यक्रमासाठी गेलो होतो तेव्हा  जातांना जामखेड मार्गे गेलो व येतांना पाथर्डी मार्गे ( विशाखापटटण  महामार्ग) आलो . सांगायचे तात्पर्य मला कुठेही हिरवे गावात दिसले नाही कि कुठे पाणी दिसले नाही . मोठमोठे तलाव दिसत होते परंतु त्यात पाण्याचा थेंबही नव्हता . तापमान ४१ अंशापर्यंत गेलेले . रस्त्याने कुठेही पाखरे दिसली नहित. रस्त्यावर माणसे दिसत नव्हती …… कुठेतरी एखादा मजूर मनुष्य रस्त्याने विमनस्क अवस्थेत जातांना दिसत होता . १९७२ च्या दुष्कालापेक्षाही या वर्षीच्या दुष्काळाची तीव्रता फार आहे . विशेष करून मराठवाड्यात जास्त आहे . बीड परिसरातील काही लोक मुंबईला निघून गेले आहेत कारण  येथे हाताला काम नाही शेते ओसाड पडली सरकार फार काही करते असे नाही . सर्व सामान्य लोक तर सरकारवर नाराज आहेत . सत्तेतील लोक म्हणतात " या लोकांना फुकट घ्यायची सवय लागली आहे ." अरे ! पण साधी गोष्ट आहे ज्या भागात पाणी नाही, हाताला काम नाही, जिथे पशु पक्षीही राह्यला तयार नाहीत तिथे माणसांची गोष्ट किती भयानक आहे . ६-७ परस खोल विहिरीत छोटे छोटे मुले जीव मुठीत धरून पाण्यासाठी उतरतात आणि विहिरीच्या तळाशी असलेले " चुल्लूभर " पाणी छोट्या वाटीने  भरतात . अर्धा ते एक तास हा प्रकार केल्यानंतर एक हंडा भरतो व विहिरावर कमीत कमी १००-२०० लोकांची रांग लागलेली तेही बरेचसे वृध्द कारण त्यांना गांव सोडता आलेला नाही . त्यांचे उदासवाणे चेहरे भेडसावतात . भविष्यात काय लिहिले हे कोणालाच माहित नाही . छावण्या कुठे कुठे दिसतात पण त्यातही कडक नियमावलीमुळे जास्त छावण्या नाहीत . चोरून लपून नाही म्हटले तरी काही जनावरे कसायाच्या तावडीत जात अहेत. शेतकरी आत्महत्या करीत अहेत. त्याचाही काही नेते , पुढारी, समाज सुधारक (?) सिने अभिनेते तुटपुंजी मदत करून,  शेतकऱ्यांच्या विधवा स्त्रियांना मदतीचा चेक देऊन छानपैकी फोटो काढून पेपरमध्ये छापून आणतात हि मोठे दयनीय अवस्था आहे सरकार म्हणते ," शेतकऱ्यांना आम्ही आधी सक्षम करू मग त्यांना कर्जच काढण्याची गरज राहणार नाही " हे एक वेळ खरे मानले तरी सध्याची स्थिती तसी नाही शेतकरी पार खचून गेला आहे . शेततळे अगोदर तुम्ही तयार करा मग आम्ही तुमच्या खात्यावर पैसे जमा करू ." लाल फितीतील कारभार तर जगजाहीर आहे . भ्रष्टाचारामध्ये भारत वरच्या क्रमांकावर आहे . कार्यलयात शेतकऱ्याला काय किमत आहे हे सर्वांनाच  माहित आहे . अल्प भू धारक शेतकर्यासाठी खरेच " आरक्षणाची " गरज आहे . पण ! (?) शेतकऱ्याचा विचार करायला वेळ नाही . वर त्याला "बळी राजा "म्हणायचे . तो तर  केव्हाच   पाताळात घातला आहे , "तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ।।" "उत्तम शेती, मध्यम व्यापार ,आणि कनिष्ट नोकरी " हि म्हण ज्याने कोणी सुरु केली त्याने काय विचार केला असेल त्याचे त्यालाच माहित पण ! आज मात्र उलट झाले आहे शेती कनिष्ट झाली आहे . शेतकऱ्याच्या मुलाला मुलगीहि देण्याचे धाडस कोणी करीत नाही . अशा अनेक अडचणी आहेत .
                     जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या काळात सलग बारा वर्षे दुष्काळ पडला होता . पण तेव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आढळत नाही . कारण " योजकस्तत्र दुर्लभ: ।।" योजना करणारा दुर्लभ असतो . त्यावेळी तुकाराम महाराज हे मोठे पिढीजात सावकार  होते , बारा बैलाची दावण होती , पनवेलपर्यंत त्यांचा व्यापार होता गडगंज श्रीमंत होते . धान्याची कोठारे होते. आणि अशा या दुष्काळात महाराजांचे हृदय द्रवले "न घडे यावरी न धरवे धीर । पीड्ता हे राष्ट्र देखोनि जग ॥३॥" आणि त्यांनी एक धाडशी निर्णय घेतला . धाकटा भाऊ " कान्होबा " याला बरोबर घेतले आणि दोघे भाऊ इंद्रायणीच्या तीरावर बसले आणि एक विचाराने निर्णय घेतला कि सर्व शेतकऱ्यांची कर्ज खाते फाडून टाकायची आणि दुसर्याच दिवसी सर्व गोर गरिबांना बोलावून घेतले व त्यांच्या देखत सर्व कर्ज खाते इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली . व्याजासगट मुद्दल माफ करून टाकले . व स्वत:च्या कोठारातून सर्वांना धान्य वाटून टाकले . सर्व तळागाळातला समाज सुखी झाला . विशेष म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे हे कृत्य बघून छत्रपती शिवरायांनी सुद्धा संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला शिवाय पेरणीच्या वेळी व्यापार्यांना  शेतकऱ्यांना  बियाणे मोफत देण्यास प्रवृत्त केले व त्याचे पैसे राजकोषातून अदा केले . हि होती राजनीती आणि धर्मनीती .
                         तात्पर्य आपण इतिहास विसरलो आणि त्यामुळे प्रजा सुद्धा शासनावर नाराज होऊ  शकते व त्याचा परिणाम पुढील निवडणुकीत दिसू शकतो . पण ! राजकारणी मोठे धूर्त असतात शेवटच्या दिवसात सगळे माफ करतील आणि लोकमत पुन्हा आपल्याकडे वळवतील …… हे सृष्टी चक्र असेच चालू राहील आणि नंतर  मात्र पश्चातापालाही जागा राहणार नाही .
                      दुष्काळ पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे " वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ।" हे आम्ही फक्त म्हणतो पण बेसुमार वृक्ष तोड आपणच करतो त्यासाठी आपण एक केले पाहिजे घरी वेगवेगळ्या फळांच्या बिया जमा कराव्यात आणि बाहेर कुठेही निघालो कि जवळ एखादे खुरपे किंवा तत्सम काहीतरी ठेवावे आणि डोंगरात, रस्त्याच्या कडेला पाऊस सुरु झाला कि ते बीज लावावे त्यायोगेच वृक्षराजी पुन्हा बहरेल आणि वेळेवर पाऊसहि येईल . रोग व्हायच्या आधी काळजी घेतली तर रोग होत नसतो . तेव्हा आता हि नुसती सरकारची जबाबदारी राहिली नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे . पोटाच्या लेकारासारखे झाडाला जपले तरच तुम्हाला निसर्ग सांभाळील अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात सुद्धा काही अर्थ नाही "पश्च्यात म्हणजे नंतर , नंतरचा ताप " तेव्हा मित्रांनो सावध व्हा आणि एक तर झाड लावा .
    रामकृष्ण हरी ।
             

वारी काल आणि आज



                                                         
              पंढरीची वारी हे एक वारकऱ्यांचे व्रत आहे व त्यात ते खंड पडू देत नाहीत " पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ।।" हे श्री तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवले आहे . तशी वारीची ही  प्रथा फार जुनी . ज्ञात परंपरा साधारण ७०० वर्ष्याची मानली जाते पण तसे नाही ज्ञानोबारायांचे आजोबा, माता पिता सुद्धा  पंढरीची वारी करीत होते असे उल्लेख नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये सापडतात. हजार -दोन हजार वर्ष्यापुर्वीची वारीची  परंपरा  आहे . फक्त आज असा सोहळा असतो तसा तो नव्हता . " माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।१।। पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।।२।।" माउली नाथ संप्रदायाचे असून सुद्धा वारकरी होऊन वारीला जाण्यात आनंद मानीत होते  व त्यांनी  सर्व सामान्य समाजाला बरोबर घेऊन अध्यात्माची एक महान चळवळ सुरू केली हरिभजनाने हे जग ढवळून काढले आणि पांडुरंगाच्या रंगात अवघे विश्व रंगवून टाकण्याचा विडा या संतांनी उचलला .
                     महाराष्ट्रातील तेराव्या -चौदाव्या शतकाचा कालखंड मोठा विचित्र होता . वाढती सामाजिक विषमता , धर्मातील नको तेवढे कर्मकांड , जातीभेद आणि ह्यामुळेच संतांची मांदियाळी जमली , त्यांनी ह्या कर्मकांडाला दूर सारण्याचा प्रयत्न केला " योग याग विधी येणे नोहे सिद्धी । वायाची उपाधी दंभ धर्म ।।" असा ठणकावून इशारा माउलींनी हरिपाठातून आधीच दिला होता  . हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या बनली . . वारकरी संप्रदायाची कीर्तनाची आचारसंहिता संत श्री नामदेव महाराजांनी घालून दिली " नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग । " असा कीर्तनाचा महिमा जागवला . नामदेवराय , चोखोबाराय,परिसा भागवत, नरहरी सोनार, सावता माळी, गोरबा कुंभार, कुर्मदास, सज्जन कसाई,  या संतांनी वारीला एक सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले एकही जात अशी राहिली नाही की ज्यात वारकरी संत झाले नाही सगळ्यांना सामावून घेऊन वारीचा महिमा वृद्धिंगत केला . याला साक्ष म्हणजे हा  तुकाराम महाराजांचा अभंग
उंचनिंच कांही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनियां।।
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी। दैत्याघरी रक्षीं प्रल्हादासी।।
चर्म रंगू लागे रोहिदासासंगे। कबिराचे मागीं विणी शेले।।
सजनकसाया विकूं लागे मांस। माळ्या सांवत्यास खुरपूं लागे।।
नरहरिसोनारा घडों फुंकूं लागे। चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी।।
नामयाची जनी सवें वेची शेणी। धर्माघरीं पाणी वाहे झाडी।।
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित। ज्ञानियाची भिंत अंगी ओढी।।
अर्जुनाचे रथी होय हा सारथी। भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची।।
गौळीयांचे घरी गाई अंगे वळी। द्वारपाळ बळीद्वारीं झाला।।
यंकोबाचे ऋण फेडी हृषीकेशी। आंबऋषीचे सोशी गर्भवास।।
मिराबाई साटीं घेतो विषप्याला। दामाजीचा जाला पाडेवार।।
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची। हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी।।
पुंडलिकासाटीं अझूनि तिष्ठत। तुका म्हणे मात धन्य याची।।
              पांडुरंग हा पतितपावन आहे .... लहान थोर , भलते याती, नारी नर , त्यामध्ये अगदी चांडाळ व वेश्याही अधिकारी ठरवल्या आणि ही मोठी सामाजिक क्रांती या वारकरी संतांनी केली .  वारकरी म्हणजे  नुसते हातात टाळ , पताका घेऊन पायी जाणारे पर्यटक नाहीत तर ते "' आले आले रे हरीचे डिंगर ... वीर वारीकर पंढरीचे"  असे नामदेवराय उत्साहाने म्हणतात. हे संत जसे वारकरी आहेत तसेच सामाजिक क्रांतिकारक सुद्धा आहेत. " नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जागी ।।"  ना म ।। ही  त्यांची प्रतिज्ञा आहे . कर्मकांडाकडे आणि अंधश्रद्धेकडे जाणारा समाज थोपविला हे वारीचे फार मोठे फलित आहे .
                     संत श्री नामदेवरायानंतर शंभर वर्षांनी (सन. १४५०) एकनाथांचे पणजोबा भानुदासांनीही वारीची परंपरा कायम ठेवली आणि त्याच्या पुढे संत श्री एकनाथ महाराजांनी क्षीण होत चालली ही चळवळ पुन्हा जागृत केली . त्यांच्या काळात सुलतानी संकट तीव्र होऊ लागले व माय मराठीवर उर्दू , फारशी भाषेचेही आक्रमण होऊ लागले . नाथ बाबांनी भारूड,. अभंग रचना , भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, असे वेगवेगळे ग्रंथ लिहून माय मराठी सुद्धा समृद्ध केली आणि या चळवळीला जणू  काही पुनर्जीवित केले असे म्हटले तर वावगे ठरू नये . सामाजिक समतेची ही वारी बहरू लागली .
                           नाथ बाबानंतर नऊ वर्षांनी अवतरित झालेले जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांनी तर या भागवत धर्म मंदिरावर कळस चढविला . अशी काही अभंग रचना केली की त्यावेळच्या प्रस्थापितांनी सुद्धा तोंडात बोटे घातली . " वेदाचा तो अर्थ अम्हासीच                         ठावा | येरांनी वाहवा भर माथा ।।"  कर्मकांडाला व धर्ममार्तंडांना हादरा दिला . व निक्षून सांगितले की " पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ।। " म्हणून होय होय वारकरी । पाहे पाहे रे पांढरी ।। १।। काय करावी साधने । फळ अवघेचि येणे ।। " आणि वारीची महिमा जनसामन्यापर्यंत पोहोचविला एवढेच नव्हे तर छत्रपती शिवराय यांनाही धारकरी पुरविण्याचे काम तुकाराम महाराजांनीं केले व छत्रपती शिवराय घडविण्याचे श्रेय जसे आईसाहेब जिजाऊंना जाते तसे तुकाराम महाराज व पूर्वोत्तर संतपरंपरेला जाते .
                           तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी वारीची परंपरा चालू ठेवली पण थोडा बदल केला त्यांनी इ स. १६८५ साली पालखी सुरू केली व त्यामध्ये तुकोबारायांच्या पादुका ठेवून दिंडी सुरू केली .त्यानंतर अनेक  संतांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या स्थानापासून निघून पंढरीला येऊ लागल्या .  नंतर नारायण महाराजांनी एकाच पालखीत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबाराय यांच्या दोघांच्या पादुका ठेऊन दिंडी काढू लागले ही प्रथा बऱ्याच कालावधीपर्यंत चालू होती पूढे काही मतभेद झाले आणि संत श्री हैबत बाबा यांनी माऊलीची पालखी वेगळी सुरू केली . तेव्हापासून माऊलीचा हा सोहळा आळंदी ते पंढरपूर असा सुरू झाला आणि तुकाराम महाराजांचा रथ देहू ते पंढरपूर असा सुरू झाला . आज लाखो लोक या सोहळ्यात असतात ही वारकऱ्यांची महान परंपरा आहे त्यांनी केलेले योगदान फार मोठे आहे .
                               परिवर्तनशीलता हा जगाचा नियम आहे आणि कालमानानुसार बदल आपणही स्वीकारले पाहिजेत यात शंका नाही . पूर्वी वीज नसायची तेव्हा रॉकेलच्या टेम्भे असायचे व त्याच्या प्रकाशात कीर्तन करावे लागायचे मी स्वतः: १९७६ मध्ये याच रॉकेलच्या टेम्भ्यात कीर्तन केले होते. पण आता वीज आहे तर त्याचा वापर केला पाहिजे , लाऊड स्पीकरच्या वापर केला पाहिजे . पण काही फडावर मात्र अजूनही लाऊड स्पीकरच्या वापर करीत नाहीत . आता आधुनिक काळात वारीचे स्वरूपही आधुनिक झाले  आहे , त्याचे माध्यमही बदलले आहेत." पंढरीची वारी "हा चित्रपट घरोघर टी व्ही मुळे  पोहचला  व लोकांना वारीची दृश्य दिसू लागली व उत्सुकता निर्मांण झाली . आता या सोहळ्यामध्ये जर आपण गेलात तर आपणास आकाशाकडे  तोंड केलेल्या 'ओबी व्हॅन्स' काही सेकंदात त्यांना 'ऑन एअर' करतायत. व सोहळा तात्काळ घरोघर पोहचवतात ,  लोकांमध्ये भक्ती भाव दाटून येतो . जमाना माध्यमांचा आहे , गळ्यात कॅमरा अडकवून फोटोग्राफर  वारीचे ,. त्यातील मनोहर प्रसंगाचे विविध फोटो काढण्यात मग्न असतात . त्यांच्याही कपाळावर गंध दिसतो तेव्हा मात्र मजा वाटते. व हेच फोटोग्राफर वारीतील फोटो व्हाट्सअपवर , फेसबुकवर ताबडतोब अपलोड करतात व क्षणात वारीचा आनंद ऑनलाईन जगभर पोहचवतात . बरेचसे लोक पायी वारीला जातात पण ज्यांना पायी जायला जमत नाही त्यांना " फेसबुक दिंडीमध्ये " सामील होता येते व घाबरल्या दिंडीचा आनंद घेता येतो फेसबुकवर असे अनेक पेज सध्या सुरू झाले आहे . " माउली -आपली वारी जगात भारी " या नावाचे एक पेज आहे त्यामध्ये वारीच्या बातम्या, वारीचे फोटो, व्हिडीओ सर्व काही बघायला मिळते . असंख्या पत्रकार या वारीत सहभागी होतात व शोध पत्रकारिता सुद्धा करतात. एम बी ए चे विद्यार्थी येथे येतात व म्यानेजमेंटचा अभ्यास करतात लाखो लोकांचे नियोजन कसे करतात. ? त्यामध्ये रोजचा स्वयंपाक , गाड्यांचे नियोजन , दिंडीचे नियोजन ,  टाळकरी , तुळशीवृंदावन घेऊन जाणाऱ्या महिला, झेंडेकरी, चोपदार, रथ, रथाच्या पुढे कोण, मागे कोण, दिंडीमध्ये म्हणावयाचे अभंग ठरलेले असतात काहीही म्हणून चालत नाही, काकडा , हरिपाठ त्या त्या वेळीच व्हायला पाहिजे वर्गणीचा (भिशीचा ) हिशेब हा सर्व अभ्यासाचा विषय आहे . या विषयवार काहींनी पी एच डी सुद्धा केलेली असते. वारीचे कव्हरेज करता यावे म्हणून कोणतेही माध्यम मागे नाही दूरदर्शनवरील बहुतेक बातम्यांचे चॅनल व इतरही चॅनल वारी कव्हर करतांना दिसतात . वारकऱ्यांच्या मुलाखती , भारुडे, पुढाऱ्यांनी खेळलेली फुगडी हे सर्व लाईव्ह दाखवतात. विशेष म्हणजे कोणतेही नेते या वारीत सहभागी व्हायचे सोडीत नाहीत कारण जेथे गर्दी तेथे हे नेते न बोलविता सुद्धा जातात व चमकून घेतात. प्रिंट मीडिया सुद्धा वारीच्या बातम्या व फोटो आपल्या वृत्तपत्रामध्ये सर्वात आधी कशा छापता येतील ते पाहतात त्यासाठी स्पेशल बातमीदार, फोटोग्राफर नेमले जातात . आकाशवाणीवर सुद्धा वारीचे वर्णन लाईव्ह टेलिकास्ट असते .पाठीवर स्याग अडकवून आपल्या भारतीय मित्रांसोबत परदेशी अभ्यासक , फोटोग्राफरही वारीत सहभागी होतांना दिसतात. त्यांच्या बरोबर " सेल्फी " काढून घेणारे वारकरी सुद्धा दिसतात .  त्यामुळे वारी आता एक सोहळा तर आहेच पण त्यापेक्षा तो एक " इव्हेंट " झालेला दिसतो . अर्थात हा बदल स्वागतार्ह आहेच यात वाद नाही पण ! त्यात श्रद्धेचा भाग किती असतो हे सांगता येत  नाही . वारकऱ्यांची आचारसंहिता किती लोक पाळीत असतील , कीर्तन ,प्रवचन, ऐकून आपण वारकरी व्हाव असे किती लोकांना वाटत असेल हे सांगता येत नाही . काही लोक चला बुवा तेवढेच पर्यटन, थोडा बदल, व्यायाम,. कुतूहल यापोटी सुद्धा येणारे असतात., असो तरी सुद्धा आधुनिक वारीचं सुस्वरूप हे डिजिटल झालेले आहे ते आता  वाढत जाणार आणि आपण त्याच्या स्वागताला तयार असले पाहिजे कारण " कालाय तस्मै नमः ।।" 

  - भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले                                  (माझा म . टा . मधील दिनांक ३-७-२०१६ चा लेख )

                          

                     
    


          

रविवार, १५ मे, २०१६

बंदीशाळा



                     तुरुंगामधील कैदी हे हि माणसेच आहेत . त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे म्हणून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि तशी ते तुरुंगात भोगीत असतात पण! हे सर्व करीत असतांना माणसाला कुठेतरी अंत:करणात पश्चाताप सुद्धा होत असतो आणि अशा व्यक्तीला त्या तुरुंगाच्या चार भिंती खायला उठत असतात . रोज तेच कैदी माणसे तोच जेलर, तेच जेलचे पोलिस , त्याच भिंती . कंटाळवाणे जीणे भोगत असतांना त्यांना नैराश्य येते अशा त्या उदासीनतेच्या अवस्थेत तो आणखी सुडाग्नीने पेटू शकतो . त्याचे जीवन पुन्हा एका नव्या गुन्हेगाराला जन्म देवू शकते . शिवाय लोकांची त्याच्याकडे बघण्याची भावना , अपकीर्ती घरच्या माणसांची दुरवस्था या सर्व गोष्टी त्याला पुन्हा एका विनाशाच्या गर्तेकडे नेऊ शकतात , हा सर्व विचार करून गुरुवर्य श्री चंपामाई प्रतिष्ठान , लातूरचे संस्थापक श्री अशोक महाराज रुमणे , कार्यकारी अभियंता , सा. बां . विभाग लातूर त्यांचे सुपुत्र अध्यक्ष डॉ श्री अभिजित रुमणे यांनी एक आगळावेगळा उपक्रम सुरु केला आणि तो म्हणजे प्रत्येक कारागृहामध्ये सर्व धर्माचे ग्रंथ  , वेगवेगळ्या साहित्यिकांचे नावाजलेले पुस्तके , खेळाचे साहित्य त्यांच्या संस्थेच्या वतीने द्यायचे  तुरुंगात एक सुंदर असे वाचनालय सुरु करायचे , ते वाचनालय तेथील कैदीच चालवणार , असा हा उपक्रम . आत्तापर्यंत त्यांनी लातूर , उस्मानाबाद, बीड येथील कारागृहामध्ये प्रत्येकी २००-२५० पुस्तके आणि खेळाचे साहित्य देऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे . . 
                   परवा दिनांक १४--२०१६ ला आम्ही बीड येथील कारागृहामध्ये हाच उपक्रम घेतला. या कारागृहाचे अधीक्षक मा . श्री धनसिंग कवाळे साहेब यांनीही मोठे सहकार्य केले अर्थात त्यांच्या परवानगीशिवाय आत प्रवेशच मिळू शकत नव्हता . कायदेशीर सर्व सोपस्कार झाले आणि सकाळी ७=३० वाजता श्री रुमणे पिता- पुत्र , मी , श्री चौधरी साहेब, आणि मा श्री मुफ्ती मोइनौद्दिन कासमी , गेवराई त्या जेलमध्ये उपस्थित झालो . सर्वांचे मोबाईल काढून घेण्यात आले कारण नियमाने तसी परवानगी नव्हती . प्रथम श्री कवाळे साहेबांच्या केबिनमध्ये आमचे स्वागत झाले त्यांचा स्वभाव मोठा मनमिळावू आहे , अधिकारी असूनही " अलौकिक नोहावे लोकप्रति ।" या माउलीच्या ओवीप्रमाणे त्यांचे सहज वर्तन आहे . नंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी आतमध्ये प्रवेश केला तेथे पटांगणात ३०९ कैदी बांधव बसलेले बघितले . प्रत्येकाची नजर अपराधी भावनेने ओथंबलेली . एका टेबलावर सर्व ग्रंथ मांडलेले होते त्यामध्ये गीता होती त्याचबरोबर कुराण शरीफ होते , विश्वास पाटलांचे " महानायक " होते . मुस्लिम बांधवासाठी नमाज अदा करण्यासाठी "मुसाल्ला " ( बस्कर ) आणले होते. 
                  कवाळे साहेबांनी परिचय करून दिला त्याच कैदी बंधावामधील एक शिक्षक कैदी बांधवाने सुंदर अशी प्रस्तावांना केली व सर्वांचे स्वागत केले . प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली सर्वात शेवटी माझे भाषण होते . काही वक्त्यांनी असे सांगितले कि " मित्रांनो ! तुम्ही कैदी नाहीत तर तुम्ही सुद्धा माणसेच आहात "  ……… मला जेव्हा बोलण्यास सांगितले तेव्हा मी माझ्या भाषणात सांगितले कि " मित्रांनो तुम्ही कैदी  नाहीत असे नाही  कारण जगात कोणतीही गोष्ठ विनाकारण घडत नाही . कार्य कारण भाव प्रत्येक बाबतीत असतो . ज्याचे जळते त्यालाच कळते . कदाचित काहीना मुद्दाम गुन्ह्यात  अडकवून या कैदेत टाकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ! शिक्षा हि भोगून सारवावी लागते व मगच सुटका होते .तुम्ही इथे कैदी आहात तसेच बाहेर खूप मोठे कैदी आहेत जे इथे आत नाहीत ."त्यांना हे वाक्य फार भावले.  बहुतांशी तरुण मुले होती , वयस्कर काही होते .गद्धे पंचविशीतच अपराध घडण्याची जास्त शक्यता असते त्यामुळेच हि तरुण मुले इथे शिक्षा भोगीत होती . त्यातही एक नगराचा मुलगा होता " महाराज मी नगराचा आहे बरका " 
" असे का ? अरे काळजी करू नको चांगल आचरण ठेव लवकर सुटशील व घरी आल्यावर आमच्याकडे ये बरका ." 
कारण चांगले वागले कि महिन्याला सात दिवस शिक्षा माफ होत असते .
                  एक वयस्कर मुस्लीम कैदी होता त्याचे डोळ्यातून सारखे अश्रू ओघळत होते . ते बघून मला फार वाईट वाटले . अनवधानाने किंवा कधी कधी मुद्दाम जाणून बुजून गुन्हा घडतो पण शिक्षा भोगतांना मात्र पश्चाताप होतो . आणि खरे म्हणजे पश्चातापाने शुद्धता होते . विचाराने परिवर्तन घडते . भगवान श्री कृष्णाचा जन्म तुरुंगात झाला, अनेक क्रांतिकारक जेलमध्ये राहूनच परिवर्तन करू शकले , योगी अरविंद , लोकमान्य टिळक , हे सर्व महान नेते जेलमध्ये होते पण त्यांनी त्यांच्या वेळेचा फार मोठा सदुपयोग केला . माणूस चुकू शकतो पण ! बदल काणे त्याच्याच हातात असते . सात्विकता हे माणसातच असते आणि सैतानहि माणूसच असतो . काय व्हायचे ते आपणच ठरवायचे असते . सकारात्मक विचारात फार मोठी ताकद असते . 
                   ग दि माडगुळकरांचे छान गाणे आहे 

जग हे बंदिशाला
कुणी येथे भलाचांगला, जो तो पथ चुकलेला

ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला

जो तो अपुल्या जागी जखडे
नजर धावे तटापलीकडे
उंबरातले किडेमकोडे उंबरिं करिती लीला

कुणा माहीत सजा किती ते
कोठुन आलो ते नच स्मरते
सुटकेलागी मन घाबरते, जो आला तो रमला

         प्रत्येक माणूस क्षणोक्षणी काहीतरी अपराध करीत असतो . आयुर्वेदामध्ये त्याला " प्रज्ञापराध " असे म्हणतात म्हणजे बुद्धीकडून घडलेला  अपराध . हा सतत होत असतो . मन सांगत असते कि " हि गोष्ट चांगली नाही , पण! दुसरे मन मात्र विपरीत गोष्टीकडे बळेच ओढून नेते . अर्जुनाने भगवंताला विचारले होते कि अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः । अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥३-३६।।कळत असूनही हे लोक पाप का करतात ? यांना जणू काही बळेच कोणी तरी पापाकडे प्रवृत्त करते कि काय असे वाटते . असे का घडते ? तेव्हा भगवंतानी त्याला सागितले कि " अर्जुना ! काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥३-३७।।" हे काम क्रोधादिक एव्हढे  बलवान आहेत कि ज्ञानी म्हणविणार्यांना सुद्धा केव्हा खेचून घेतात  हेत्यांनाही  कळत नाही आणि मग अशा पुरुषाचे अध:पतन होते विषयाचे नुसते ध्यान सुद्धा माणसाला पतनाकडे नेते . पराशर ऋषी होते ज्ञानी होते आणि नेमके मत्स्यगंधेच्या होडीमध्ये बसले व जिच्या अंगाला माशाचा वास येत होता तिला बघून " कामासक्त " झाले  आणि दिवसा अंधार करून तिच्याशी समागम केला ……। तात्पर्य "बलवान इंद्रिय-ग्रामो विद्वांसम अपि कर्षति ॥ " इंदिये बलवान आहेत ज्ञानी माणसाचेही पतन होऊ शकते , मग तो गुन्हेगार नाही का ? जरी तो कैदेत नसला तरी तो माणूस अंत:करणात मात्र वासनेच्या कैदेतच असतो , त्याचे मन त्याला खात अस्ते. म्हणून मनुष्य जन्माला अल्यापसून कैदेतच असतो फक्त प्रत्येकाच्या कैदेचे स्वरूप वेगळे असते . 
              अपराध घडूनही त्याचे परिमार्जन जो करतो व स्वत:चे परिवर्तन जो करतो तोच माणूस असतो . त्यासाठीच "ग्रंथ हे आपले गुरु आहेत " म्हणून तुरुंगातील वाचनालय हा उपक्रम महत्वाचा आहे.वाचील तो वाचेल हे खरे आहे. पुस्तके मार्गदर्शक असतात .  
            मला इथे एक आवर्जून नमूद करावयाचे आहे. एक शिक्षक कैदी जेव्हा भाषण करीत होता तेव्हा तो मा श्री कवाळे साहेबांच्याबद्दल बोलत होता ,." आमचे जेलर साहेब हे नुसते साहेब नाहीत तर ते एक सुधारक आहेत प्रबोधनकार आहेत . " एखाद्या अधिकार्याबद्दल असे ऐकायला मिळणे तसे अवघड आहे. श्री कवाळे साहेबांनीही तसे कार्य जेलमध्ये केलेले आहे . त्यांनी वेल्डिंग, मोटार वाईन्डींग, इलेक्ट्रिशियन असे वेगवेगळे कोर्स कैद्यांसाठी सुरु केले आहेत व त्यासठी कोणतेही शुल्क आकारले जात नहित. त्यांना सणावाराला गोडधोड खाऊ घालतात . एखादा कैदी शिक्षा पूर्ण करून सुटल्यावर




साहेब त्याला पैसे कमी पडले तर स्वत:च्या खिशातून घरापर्यंत जाण्याची खर्ची देवून वर काही पैसे देतात. कैद्यांची आजारपणाची काळजी घेणे हा जरी कामाचा भाग असला तरी जिव्हाळा ठेवून काम करणे हे एक वेगळेच आहे . स्वत: कैद्यामध्ये जाऊन विचारपूस करणे त्यांच्याशी प्रेमाने वागणे ह्या गोष्टी केवळ संस्कारानेच येऊ शकतात त्यासाठी साहेब आमच्यासारखे कीर्तनकार, प्रवचनकार, बोलावतात व त्यांच्यासमोर हे कार्यक्रम घडवून आणतात त्यामुळे त्या कैद्यामध्येहि परिवर्तन घडते आणि म्हणूनच सर्व कैदी त्यांच्यवर प्रेम करतात . त्यामुळे त्यांची गुन्हेगारी प्रवृतीही कमी होते . या कारागृहाला जेल न म्हणता "बंदीशाळा " हेच नाव सार्थ आहे असे वाटते .