रविवार, ३ जुलै, २०१६

वारी काल आणि आज



                                                         
              पंढरीची वारी हे एक वारकऱ्यांचे व्रत आहे व त्यात ते खंड पडू देत नाहीत " पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ।।" हे श्री तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवले आहे . तशी वारीची ही  प्रथा फार जुनी . ज्ञात परंपरा साधारण ७०० वर्ष्याची मानली जाते पण तसे नाही ज्ञानोबारायांचे आजोबा, माता पिता सुद्धा  पंढरीची वारी करीत होते असे उल्लेख नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये सापडतात. हजार -दोन हजार वर्ष्यापुर्वीची वारीची  परंपरा  आहे . फक्त आज असा सोहळा असतो तसा तो नव्हता . " माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।१।। पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।।२।।" माउली नाथ संप्रदायाचे असून सुद्धा वारकरी होऊन वारीला जाण्यात आनंद मानीत होते  व त्यांनी  सर्व सामान्य समाजाला बरोबर घेऊन अध्यात्माची एक महान चळवळ सुरू केली हरिभजनाने हे जग ढवळून काढले आणि पांडुरंगाच्या रंगात अवघे विश्व रंगवून टाकण्याचा विडा या संतांनी उचलला .
                     महाराष्ट्रातील तेराव्या -चौदाव्या शतकाचा कालखंड मोठा विचित्र होता . वाढती सामाजिक विषमता , धर्मातील नको तेवढे कर्मकांड , जातीभेद आणि ह्यामुळेच संतांची मांदियाळी जमली , त्यांनी ह्या कर्मकांडाला दूर सारण्याचा प्रयत्न केला " योग याग विधी येणे नोहे सिद्धी । वायाची उपाधी दंभ धर्म ।।" असा ठणकावून इशारा माउलींनी हरिपाठातून आधीच दिला होता  . हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या बनली . . वारकरी संप्रदायाची कीर्तनाची आचारसंहिता संत श्री नामदेव महाराजांनी घालून दिली " नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग । " असा कीर्तनाचा महिमा जागवला . नामदेवराय , चोखोबाराय,परिसा भागवत, नरहरी सोनार, सावता माळी, गोरबा कुंभार, कुर्मदास, सज्जन कसाई,  या संतांनी वारीला एक सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले एकही जात अशी राहिली नाही की ज्यात वारकरी संत झाले नाही सगळ्यांना सामावून घेऊन वारीचा महिमा वृद्धिंगत केला . याला साक्ष म्हणजे हा  तुकाराम महाराजांचा अभंग
उंचनिंच कांही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनियां।।
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी। दैत्याघरी रक्षीं प्रल्हादासी।।
चर्म रंगू लागे रोहिदासासंगे। कबिराचे मागीं विणी शेले।।
सजनकसाया विकूं लागे मांस। माळ्या सांवत्यास खुरपूं लागे।।
नरहरिसोनारा घडों फुंकूं लागे। चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी।।
नामयाची जनी सवें वेची शेणी। धर्माघरीं पाणी वाहे झाडी।।
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित। ज्ञानियाची भिंत अंगी ओढी।।
अर्जुनाचे रथी होय हा सारथी। भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची।।
गौळीयांचे घरी गाई अंगे वळी। द्वारपाळ बळीद्वारीं झाला।।
यंकोबाचे ऋण फेडी हृषीकेशी। आंबऋषीचे सोशी गर्भवास।।
मिराबाई साटीं घेतो विषप्याला। दामाजीचा जाला पाडेवार।।
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची। हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी।।
पुंडलिकासाटीं अझूनि तिष्ठत। तुका म्हणे मात धन्य याची।।
              पांडुरंग हा पतितपावन आहे .... लहान थोर , भलते याती, नारी नर , त्यामध्ये अगदी चांडाळ व वेश्याही अधिकारी ठरवल्या आणि ही मोठी सामाजिक क्रांती या वारकरी संतांनी केली .  वारकरी म्हणजे  नुसते हातात टाळ , पताका घेऊन पायी जाणारे पर्यटक नाहीत तर ते "' आले आले रे हरीचे डिंगर ... वीर वारीकर पंढरीचे"  असे नामदेवराय उत्साहाने म्हणतात. हे संत जसे वारकरी आहेत तसेच सामाजिक क्रांतिकारक सुद्धा आहेत. " नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जागी ।।"  ना म ।। ही  त्यांची प्रतिज्ञा आहे . कर्मकांडाकडे आणि अंधश्रद्धेकडे जाणारा समाज थोपविला हे वारीचे फार मोठे फलित आहे .
                     संत श्री नामदेवरायानंतर शंभर वर्षांनी (सन. १४५०) एकनाथांचे पणजोबा भानुदासांनीही वारीची परंपरा कायम ठेवली आणि त्याच्या पुढे संत श्री एकनाथ महाराजांनी क्षीण होत चालली ही चळवळ पुन्हा जागृत केली . त्यांच्या काळात सुलतानी संकट तीव्र होऊ लागले व माय मराठीवर उर्दू , फारशी भाषेचेही आक्रमण होऊ लागले . नाथ बाबांनी भारूड,. अभंग रचना , भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, असे वेगवेगळे ग्रंथ लिहून माय मराठी सुद्धा समृद्ध केली आणि या चळवळीला जणू  काही पुनर्जीवित केले असे म्हटले तर वावगे ठरू नये . सामाजिक समतेची ही वारी बहरू लागली .
                           नाथ बाबानंतर नऊ वर्षांनी अवतरित झालेले जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांनी तर या भागवत धर्म मंदिरावर कळस चढविला . अशी काही अभंग रचना केली की त्यावेळच्या प्रस्थापितांनी सुद्धा तोंडात बोटे घातली . " वेदाचा तो अर्थ अम्हासीच                         ठावा | येरांनी वाहवा भर माथा ।।"  कर्मकांडाला व धर्ममार्तंडांना हादरा दिला . व निक्षून सांगितले की " पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ।। " म्हणून होय होय वारकरी । पाहे पाहे रे पांढरी ।। १।। काय करावी साधने । फळ अवघेचि येणे ।। " आणि वारीची महिमा जनसामन्यापर्यंत पोहोचविला एवढेच नव्हे तर छत्रपती शिवराय यांनाही धारकरी पुरविण्याचे काम तुकाराम महाराजांनीं केले व छत्रपती शिवराय घडविण्याचे श्रेय जसे आईसाहेब जिजाऊंना जाते तसे तुकाराम महाराज व पूर्वोत्तर संतपरंपरेला जाते .
                           तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी वारीची परंपरा चालू ठेवली पण थोडा बदल केला त्यांनी इ स. १६८५ साली पालखी सुरू केली व त्यामध्ये तुकोबारायांच्या पादुका ठेवून दिंडी सुरू केली .त्यानंतर अनेक  संतांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या स्थानापासून निघून पंढरीला येऊ लागल्या .  नंतर नारायण महाराजांनी एकाच पालखीत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबाराय यांच्या दोघांच्या पादुका ठेऊन दिंडी काढू लागले ही प्रथा बऱ्याच कालावधीपर्यंत चालू होती पूढे काही मतभेद झाले आणि संत श्री हैबत बाबा यांनी माऊलीची पालखी वेगळी सुरू केली . तेव्हापासून माऊलीचा हा सोहळा आळंदी ते पंढरपूर असा सुरू झाला आणि तुकाराम महाराजांचा रथ देहू ते पंढरपूर असा सुरू झाला . आज लाखो लोक या सोहळ्यात असतात ही वारकऱ्यांची महान परंपरा आहे त्यांनी केलेले योगदान फार मोठे आहे .
                               परिवर्तनशीलता हा जगाचा नियम आहे आणि कालमानानुसार बदल आपणही स्वीकारले पाहिजेत यात शंका नाही . पूर्वी वीज नसायची तेव्हा रॉकेलच्या टेम्भे असायचे व त्याच्या प्रकाशात कीर्तन करावे लागायचे मी स्वतः: १९७६ मध्ये याच रॉकेलच्या टेम्भ्यात कीर्तन केले होते. पण आता वीज आहे तर त्याचा वापर केला पाहिजे , लाऊड स्पीकरच्या वापर केला पाहिजे . पण काही फडावर मात्र अजूनही लाऊड स्पीकरच्या वापर करीत नाहीत . आता आधुनिक काळात वारीचे स्वरूपही आधुनिक झाले  आहे , त्याचे माध्यमही बदलले आहेत." पंढरीची वारी "हा चित्रपट घरोघर टी व्ही मुळे  पोहचला  व लोकांना वारीची दृश्य दिसू लागली व उत्सुकता निर्मांण झाली . आता या सोहळ्यामध्ये जर आपण गेलात तर आपणास आकाशाकडे  तोंड केलेल्या 'ओबी व्हॅन्स' काही सेकंदात त्यांना 'ऑन एअर' करतायत. व सोहळा तात्काळ घरोघर पोहचवतात ,  लोकांमध्ये भक्ती भाव दाटून येतो . जमाना माध्यमांचा आहे , गळ्यात कॅमरा अडकवून फोटोग्राफर  वारीचे ,. त्यातील मनोहर प्रसंगाचे विविध फोटो काढण्यात मग्न असतात . त्यांच्याही कपाळावर गंध दिसतो तेव्हा मात्र मजा वाटते. व हेच फोटोग्राफर वारीतील फोटो व्हाट्सअपवर , फेसबुकवर ताबडतोब अपलोड करतात व क्षणात वारीचा आनंद ऑनलाईन जगभर पोहचवतात . बरेचसे लोक पायी वारीला जातात पण ज्यांना पायी जायला जमत नाही त्यांना " फेसबुक दिंडीमध्ये " सामील होता येते व घाबरल्या दिंडीचा आनंद घेता येतो फेसबुकवर असे अनेक पेज सध्या सुरू झाले आहे . " माउली -आपली वारी जगात भारी " या नावाचे एक पेज आहे त्यामध्ये वारीच्या बातम्या, वारीचे फोटो, व्हिडीओ सर्व काही बघायला मिळते . असंख्या पत्रकार या वारीत सहभागी होतात व शोध पत्रकारिता सुद्धा करतात. एम बी ए चे विद्यार्थी येथे येतात व म्यानेजमेंटचा अभ्यास करतात लाखो लोकांचे नियोजन कसे करतात. ? त्यामध्ये रोजचा स्वयंपाक , गाड्यांचे नियोजन , दिंडीचे नियोजन ,  टाळकरी , तुळशीवृंदावन घेऊन जाणाऱ्या महिला, झेंडेकरी, चोपदार, रथ, रथाच्या पुढे कोण, मागे कोण, दिंडीमध्ये म्हणावयाचे अभंग ठरलेले असतात काहीही म्हणून चालत नाही, काकडा , हरिपाठ त्या त्या वेळीच व्हायला पाहिजे वर्गणीचा (भिशीचा ) हिशेब हा सर्व अभ्यासाचा विषय आहे . या विषयवार काहींनी पी एच डी सुद्धा केलेली असते. वारीचे कव्हरेज करता यावे म्हणून कोणतेही माध्यम मागे नाही दूरदर्शनवरील बहुतेक बातम्यांचे चॅनल व इतरही चॅनल वारी कव्हर करतांना दिसतात . वारकऱ्यांच्या मुलाखती , भारुडे, पुढाऱ्यांनी खेळलेली फुगडी हे सर्व लाईव्ह दाखवतात. विशेष म्हणजे कोणतेही नेते या वारीत सहभागी व्हायचे सोडीत नाहीत कारण जेथे गर्दी तेथे हे नेते न बोलविता सुद्धा जातात व चमकून घेतात. प्रिंट मीडिया सुद्धा वारीच्या बातम्या व फोटो आपल्या वृत्तपत्रामध्ये सर्वात आधी कशा छापता येतील ते पाहतात त्यासाठी स्पेशल बातमीदार, फोटोग्राफर नेमले जातात . आकाशवाणीवर सुद्धा वारीचे वर्णन लाईव्ह टेलिकास्ट असते .पाठीवर स्याग अडकवून आपल्या भारतीय मित्रांसोबत परदेशी अभ्यासक , फोटोग्राफरही वारीत सहभागी होतांना दिसतात. त्यांच्या बरोबर " सेल्फी " काढून घेणारे वारकरी सुद्धा दिसतात .  त्यामुळे वारी आता एक सोहळा तर आहेच पण त्यापेक्षा तो एक " इव्हेंट " झालेला दिसतो . अर्थात हा बदल स्वागतार्ह आहेच यात वाद नाही पण ! त्यात श्रद्धेचा भाग किती असतो हे सांगता येत  नाही . वारकऱ्यांची आचारसंहिता किती लोक पाळीत असतील , कीर्तन ,प्रवचन, ऐकून आपण वारकरी व्हाव असे किती लोकांना वाटत असेल हे सांगता येत नाही . काही लोक चला बुवा तेवढेच पर्यटन, थोडा बदल, व्यायाम,. कुतूहल यापोटी सुद्धा येणारे असतात., असो तरी सुद्धा आधुनिक वारीचं सुस्वरूप हे डिजिटल झालेले आहे ते आता  वाढत जाणार आणि आपण त्याच्या स्वागताला तयार असले पाहिजे कारण " कालाय तस्मै नमः ।।" 

  - भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले                                  (माझा म . टा . मधील दिनांक ३-७-२०१६ चा लेख )

                          

                     
    


          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा