
परवा दिनांक १४-५-२०१६ ला आम्ही बीड येथील कारागृहामध्ये हाच उपक्रम घेतला. या कारागृहाचे अधीक्षक मा . श्री धनसिंग कवाळे साहेब यांनीही मोठे सहकार्य केले अर्थात त्यांच्या परवानगीशिवाय आत प्रवेशच मिळू शकत नव्हता . कायदेशीर सर्व सोपस्कार झाले आणि सकाळी ७=३० वाजता श्री रुमणे पिता- पुत्र , मी , श्री चौधरी साहेब, आणि मा श्री मुफ्ती मोइनौद्दिन कासमी , गेवराई त्या जेलमध्ये उपस्थित झालो . सर्वांचे मोबाईल काढून घेण्यात आले कारण नियमाने तसी परवानगी नव्हती . प्रथम श्री कवाळे साहेबांच्या केबिनमध्ये आमचे स्वागत झाले त्यांचा स्वभाव मोठा मनमिळावू आहे , अधिकारी असूनही " अलौकिक नोहावे लोकप्रति ।" या माउलीच्या ओवीप्रमाणे त्यांचे सहज वर्तन आहे . नंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी आतमध्ये प्रवेश केला तेथे पटांगणात ३०९ कैदी बांधव बसलेले बघितले . प्रत्येकाची नजर अपराधी भावनेने ओथंबलेली . एका टेबलावर सर्व ग्रंथ मांडलेले होते त्यामध्ये गीता होती त्याचबरोबर कुराण शरीफ होते , विश्वास पाटलांचे " महानायक " होते . मुस्लिम बांधवासाठी नमाज अदा करण्यासाठी "मुसाल्ला " ( बस्कर ) आणले होते.
कवाळे साहेबांनी परिचय करून दिला त्याच कैदी बंधावामधील एक शिक्षक कैदी बांधवाने सुंदर अशी प्रस्तावांना केली व सर्वांचे स्वागत केले . प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली सर्वात शेवटी माझे भाषण होते . काही वक्त्यांनी असे सांगितले कि " मित्रांनो ! तुम्ही कैदी नाहीत तर तुम्ही सुद्धा माणसेच आहात " ……… मला जेव्हा बोलण्यास सांगितले तेव्हा मी माझ्या भाषणात सांगितले कि " मित्रांनो तुम्ही कैदी नाहीत असे नाही कारण जगात कोणतीही गोष्ठ विनाकारण घडत नाही . कार्य कारण भाव प्रत्येक बाबतीत असतो . ज्याचे जळते त्यालाच कळते . कदाचित काहीना मुद्दाम गुन्ह्यात अडकवून या कैदेत टाकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ! शिक्षा हि भोगून सारवावी लागते व मगच सुटका होते .तुम्ही इथे कैदी आहात तसेच बाहेर खूप मोठे कैदी आहेत जे इथे आत नाहीत ."त्यांना हे वाक्य फार भावले. बहुतांशी तरुण मुले होती , वयस्कर काही होते .गद्धे पंचविशीतच अपराध घडण्याची जास्त शक्यता असते त्यामुळेच हि तरुण मुले इथे शिक्षा भोगीत होती . त्यातही एक नगराचा मुलगा होता " महाराज मी नगराचा आहे बरका "
" असे का ? अरे काळजी करू नको चांगल आचरण ठेव लवकर सुटशील व घरी आल्यावर आमच्याकडे ये बरका ."
कारण चांगले वागले कि महिन्याला सात दिवस शिक्षा माफ होत असते .
एक वयस्कर मुस्लीम कैदी होता त्याचे डोळ्यातून सारखे अश्रू ओघळत होते . ते बघून मला फार वाईट वाटले . अनवधानाने किंवा कधी कधी मुद्दाम जाणून बुजून गुन्हा घडतो पण शिक्षा भोगतांना मात्र पश्चाताप होतो . आणि खरे म्हणजे पश्चातापाने शुद्धता होते . विचाराने परिवर्तन घडते . भगवान श्री कृष्णाचा जन्म तुरुंगात झाला, अनेक क्रांतिकारक जेलमध्ये राहूनच परिवर्तन करू शकले , योगी अरविंद , लोकमान्य टिळक , हे सर्व महान नेते जेलमध्ये होते पण त्यांनी त्यांच्या वेळेचा फार मोठा सदुपयोग केला . माणूस चुकू शकतो पण ! बदल काणे त्याच्याच हातात असते . सात्विकता हे माणसातच असते आणि सैतानहि माणूसच असतो . काय व्हायचे ते आपणच ठरवायचे असते . सकारात्मक विचारात फार मोठी ताकद असते .
ग दि माडगुळकरांचे छान गाणे आहे
जग हे बंदिशाला
कुणी न येथे भलाचांगला, जो तो पथ चुकलेला
ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला
जो तो अपुल्या जागी जखडे
नजर न धावे तटापलीकडे
उंबरातले किडेमकोडे उंबरिं करिती लीला
कुणा न माहीत सजा किती ते
कोठुन आलो ते नच स्मरते
सुटकेलागी मन घाबरते, जो आला तो रमला
प्रत्येक माणूस क्षणोक्षणी काहीतरी अपराध करीत असतो . आयुर्वेदामध्ये त्याला " प्रज्ञापराध " असे म्हणतात म्हणजे बुद्धीकडून घडलेला अपराध . हा सतत होत असतो . मन सांगत असते कि " हि गोष्ट चांगली नाही , पण! दुसरे मन मात्र विपरीत गोष्टीकडे बळेच ओढून नेते . अर्जुनाने भगवंताला विचारले होते कि अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः । अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥३-३६।।कळत असूनही हे लोक पाप का करतात ? यांना जणू काही बळेच कोणी तरी पापाकडे प्रवृत्त करते कि काय असे वाटते . असे का घडते ? तेव्हा भगवंतानी त्याला सागितले कि " अर्जुना ! काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥३-३७।।" हे काम क्रोधादिक एव्हढे बलवान आहेत कि ज्ञानी म्हणविणार्यांना सुद्धा केव्हा खेचून घेतात हेत्यांनाही कळत नाही आणि मग अशा पुरुषाचे अध:पतन होते विषयाचे नुसते ध्यान सुद्धा माणसाला पतनाकडे नेते . पराशर ऋषी होते ज्ञानी होते आणि नेमके मत्स्यगंधेच्या होडीमध्ये बसले व जिच्या अंगाला माशाचा वास येत होता तिला बघून " कामासक्त " झाले आणि दिवसा अंधार करून तिच्याशी समागम केला ……। तात्पर्य "बलवान इंद्रिय-ग्रामो विद्वांसम अपि कर्षति ॥ " इंदिये बलवान आहेत ज्ञानी माणसाचेही पतन होऊ शकते , मग तो गुन्हेगार नाही का ? जरी तो कैदेत नसला तरी तो माणूस अंत:करणात मात्र वासनेच्या कैदेतच असतो , त्याचे मन त्याला खात अस्ते. म्हणून मनुष्य जन्माला अल्यापसून कैदेतच असतो फक्त प्रत्येकाच्या कैदेचे स्वरूप वेगळे असते .
अपराध घडूनही त्याचे परिमार्जन जो करतो व स्वत:चे परिवर्तन जो करतो तोच माणूस असतो . त्यासाठीच "ग्रंथ हे आपले गुरु आहेत " म्हणून तुरुंगातील वाचनालय हा उपक्रम महत्वाचा आहे.वाचील तो वाचेल हे खरे आहे. पुस्तके मार्गदर्शक असतात .
मला इथे एक आवर्जून नमूद करावयाचे आहे. एक शिक्षक कैदी जेव्हा भाषण करीत होता तेव्हा तो मा श्री कवाळे साहेबांच्याबद्दल बोलत होता ,." आमचे जेलर साहेब हे नुसते साहेब नाहीत तर ते एक सुधारक आहेत प्रबोधनकार आहेत . " एखाद्या अधिकार्याबद्दल असे ऐकायला मिळणे तसे अवघड आहे. श्री कवाळे साहेबांनीही तसे कार्य जेलमध्ये केलेले आहे . त्यांनी वेल्डिंग, मोटार वाईन्डींग, इलेक्ट्रिशियन असे वेगवेगळे कोर्स कैद्यांसाठी सुरु केले आहेत व त्यासठी कोणतेही शुल्क आकारले जात नहित. त्यांना सणावाराला गोडधोड खाऊ घालतात . एखादा कैदी शिक्षा पूर्ण करून सुटल्यावर

साहेब त्याला पैसे कमी पडले तर स्वत:च्या खिशातून घरापर्यंत जाण्याची खर्ची देवून वर काही पैसे देतात. कैद्यांची आजारपणाची काळजी घेणे हा जरी कामाचा भाग असला तरी जिव्हाळा ठेवून काम करणे हे एक वेगळेच आहे . स्वत: कैद्यामध्ये जाऊन विचारपूस करणे त्यांच्याशी प्रेमाने वागणे ह्या गोष्टी केवळ संस्कारानेच येऊ शकतात त्यासाठी साहेब आमच्यासारखे कीर्तनकार, प्रवचनकार, बोलावतात व त्यांच्यासमोर हे कार्यक्रम घडवून आणतात त्यामुळे त्या कैद्यामध्येहि परिवर्तन घडते आणि म्हणूनच सर्व कैदी त्यांच्यवर प्रेम करतात . त्यामुळे त्यांची गुन्हेगारी प्रवृतीही कमी होते . या कारागृहाला जेल न म्हणता "बंदीशाळा " हेच नाव सार्थ आहे असे वाटते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा