गुरुवार, ५ मे, २०१६

।। माउली ।।

                                                   
         माउली हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे येते ती श्री संत ज्ञानोबारायांची मूर्ती कारण सर्व संतांनी माउली हा शब्द श्री संत ज्ञानोबारायासाठी वापरलाय . माउली म्हणजे जिव्हाळा , प्रेम , आधार  , आई असे अनेक अर्थ सांगता येतील . " स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी "।। असे कवी माधव जुलियन यांनी म्हटले आहे , कल्पना किती छान आहे जो जगाचा स्वामी आहे त्यालाही आई नाही तर तो सुद्धा भिकारी ठरवलाय . कारण आईसारखे प्रेम जगात कोणीही  देऊ शकत नाही .. आणि जगी ज्यास कोणी नाही । त्यास देव आहे …. असे एक कवन  आहे पण ! मित्रांनो नगरपासून अवघ्या १०-१२ किलोमीटरवर देहरे गावाजवळ शिंगवे येथे अशी एक संस्था आहे कि जिथे" माउली " खर्या अर्थाने भेटते . कोणाला कशाचे वेड कोणाला कशाचे वेड ! काही सांगता येत नाही हे जग वेड्यांनी भरलेले आहे कोणाला पैशाचे वेड , कोणाला सत्तेचे वेड कोणाला एख्याद्या कलेचे वेड असे वेगवेगळे प्रकार पण ! मित्रांनो " डॉ  श्री राजेंद्र धामणे आणि डॉ सौं सुचेता  धामणे "यांनाही आगळे वेगळे वेड आहे त्यांची एक संस्था आहे आणि त्या संस्थेचे नाव आहे " माउली  सेवा प्रतिष्ठान " जिथे घरच्यांनी व इतरांनीही ज्यांचा त्याग केलेला आहे , उपेक्षा केली आहे , समाजाने ज्यांच्यावर अत्याचार केले  आहेत  बलत्कार केले आहेत आणि त्यातून भयंकर आजाराच्या ज्या बळी ठरल्या आहेत अशा बेवारस स्त्रियांचे आधारस्थान म्हणजे" माउली सेवा प्रतिष्ठान ". 
                 डॉ राजेंद्र धामणे यांचा माझा तसा परिचय फेस बुकवरच काही वर्षापूर्वी झाला होता व त्यातूनच संवाद साधला जात होता. पण त्यांचे कार्य जवळून पाहता आले नव्हते . एक  दिनांक २-५-१६  ला मी त्यांच्या प्रतिष्ठानची एक व्हिडीओ लिंक माझ्या फेस बुकच्या वालवर शेअर केली आणि ती लिंक माझा पुतण्या श्री रवि कर्डिले याने बघितली आणि त्याने मला विचारले कि " आपल्याला या संस्थेमध्ये जायचे आहे तुम्हाला कधी वेळ आहे ?" मी त्याला म्हणालो " आपण उद्याच जाऊ "आणि  डॉक्टरांशी संपर्क केला व दिनांक ३-५-२०१६ ला  ११ वाजता माउलीमध्ये पोहचलो . डॉक्टरांनी आमचे हसतच स्वागत केले . त्यांच्या कार्यालयात थोडा वेळ थांबलो आणि मग आम्ही जिथे या मनोरुग्ण स्त्रिया आहेत ते वार्ड बघण्यासाठी गेलो . तेथील स्वच्छता व व्यवस्था बघितली कमालीची शिस्त व अत्यंत आपुलकीने त्या स्त्रियांना त्यांनी सांभाळलेले दिसले . 
मोना
                   तेथील एका वार्डमध्ये १०-१५ जणी नुकत्याच दाखल झालेल्या होत्या आणि त्यांची सर्व प्रकारची स्वच्छता करीत  असलेली ती " मोना " सिस्टर .  जागेचा अभाव त्यामुळे एकाच वार्डमध्ये या स्त्रियांची देखभाल करावी लागत होती . मोना हि मुळची पुण्याची तिचा बराच काळ रशियात गेलेला , भाषा फक्त इंग्रजी येते ,. मराठी थोडी समजते . तीही अशीच मनोरुग्ण होती परित्यक्ता पण माउलीध्ये आली व डॉक्टरांनी सतत ३ वर्षे उपचार केले ती आता एकदम नॉर्मल झाली आहे व तेथेच सेवा करते आम्ही तिच्याशी सवांद साधला अतिशय हुशार व सेवाधारी स्वभाव डॉक्टरांच्या विषयी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करीत होति. 
             दुसऱ्या मजल्यावर आम्ही गेलो तेथे ३०-४० महिला होत्या पण त्यांच्यात बरीच सुधारणा झालेली होती विशेष म्हणजे येथे कुठलाही जाती भेद नाही कोण कुठले हा विचार नाही फक्त सेवाभाव . येथे एक महिला भेटली तिचे वय ६१ आहे . एम ए मराठी झालेली , पण ! तीही अत्याचारित त्यामुळे मनावर परिणाम झाला तिच्या असह्यातेचा लोकांनी गैरफायदा घेतला आणि शेवटी तिलाही आसरा मिळाला तो माउलीमधेच आता ती एकदम बरी झाली आहे . मराठी साहित्य म्हणजे काय , भास्कर बोरीकरांचे साहित्य, कुसुमाग्रजांचे नटसम्राट , भग्नमूर्ती खंड काव्य , मराठी साहित्यातील चढउतार  सांगून तिने शेवटी तिने आम्हाला एक काव्य " एका तळ्यात होती बदके पिले सुरेख । होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक ।।" म्हणून दाखवले …. ते एकून माझ्या डोळ्यात  पाणी तरळले . 
                   एक महिला फिजीक्स्ची प्राध्यापक होती अत्यंत हुशार पण तिच्यावरही असेच अनेकांनी अत्याचार केलेले आणि शेवटी ती पण माउलीमध्ये दाखल झाली ती एच आय व्ही बाधित आहे , पण डॉक्टरांनी पोटाच्या लेकीप्रमाणे तिला सांभाळले आहे . विशेष म्हणजे डॉक्टरांना कोणीतरी या स्त्रियांविषयी माहिती देते व हे ambulance घेऊन जातात व त्या महिलांना घेऊन येतात .


                एकदा डॉक्टरांना पंढरपूरहून फोन आला , त्यांनी सांगितले कि वारीमध्ये एक महिला मनोरुग्ण आहे आणि तिच्या अंगावर वस्त्र नाही आणि कदाचित ती गरोदर असावी , डॉक्टरांनी ambulance घेतली आणि पंढरपूर गाठले आणि तिला घेऊन आले , उपचार सुरु केले , तिचे बाळंतपण केले मुलगा झाला . त्याचे नाव पांडुरंग ठेवले व त्याला स्वत:चे नाव दिले " पांडुरंग राजेंद्र धामणे "…. हि डॉक्टरांची खरी " वारी " आहे, त्यांनी अशीच १५-१६ अनाथ मुले पण सांभाळलि आहेत . . त्यांच्या सौभाग्यवती या कामात मागे नाहीत त्यांना त्या सर्व साह्य करतात . जगावेगळे हे जोडपे आहे . आता येथे जवळपास १०० महिला आहेत . डॉक्टरांची फार ओढाताण होते स्वत:


चा प्रपंच बघून हे सर्व करता करता हाच त्याचं एक प्रपंच झालाय , एक मोठे कुटुंब झाले आहे . त्यांना येथे आता जागा कमी पडते आहे श्री  बलभीम पठारे यांनी त्यांना तीन एकर जमीन दान दिली आहे तेथे आता " मनगव " प्रकल्प  साकार होतोय २५ कोटीचा हा प्रकल्प आहे जवळ जवळ ६०० महिला येथे राहू शकतील अशी योजना आहे . रोज १०० लोकांचे जेवण तयार करायचे सोपे काम नाही . कधी कधी त्यांना स्टाफला पगार द्यायला पैसे नसतात त्यावेळी डॉक्टरांचे वडील त्यांची पेन्शन देतात व या कामात ते स्वत:चा सहभाग नोंदवतात . अर्थात हे जगावेगळे काम करतांना नातेवाईक , आसपासचे लोक त्यांना विरोध करतात , त्यांना हा वेडेपणा वाटतो ते त्यांचे काम निदा करून चोख बजावतात ." आली कष्टदशा जरी अपार , न टाकिती धैर्य तथापि थोर । केला बळेची पोत खाली , ज्वाळा तरी ते वरती उफाळे ।। " याप्रमाणे डॉक्टर धाडशी आहेत , अध्यात्मिक भूमिका असलेले आहे म्हणून तर त्यांनी माउली हे नाव निवडले आहे . . 

         असो प्रत्येकाने या प्रकल्पाला एकदा तरी भेट द्यावी आणि तेथील वातावरण व तो प्रकल्प जाणून घ्यावा व जशी शक्य होईल तशी मदत करण्याचा प्रयत्न करावा . त्यांचे हे काम मानवतेच्या भावनेतून आहे . याला जातीपातीचे , देश काळाचे बंधन नाही शिव भावातून जीव सेवा मोठा उदात्त हेतू आहे . शहाण्या माणसाला सांभाळणे सोपे आहे पण ज्याला स्वत:चेच काही कळत नाही अशा मनोरुग्ण व्यक्तीला सांभाळणे सोपे नाही .डॉक्टरांच्या या महान कार्यास माझ्या अंत:करणापासून खूप खूप शुभेच्छा . 
 संपर्क :-डॉ राजेंद्र धामणे मोब क्र ९८६०८४९५४
             डॉ सुचेता धामणे  मोब क्र ९३२६१०७१४१

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले 

२ टिप्पण्या:

  1. ......तर महारज खुपच सुंदर माहिती दिलीत. मी नक्की भेट देईन. अशा माणसांना प्रोत्साहन दिलच पाहिजे....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर! धन्यवाद. खरेच त्यांना प्रोत्साहन देण्याची खुप गरज आहे. जात,धर्म,देश -कालाच्या पलिकडील हे काम आहे. मानवतेच्या भावनेतून हे सर्व चालते आहे.

      हटवा