शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

।। परपीडे चित्त दुखी: होते ।।






जय हरी !

नवल र्तले! लाखा लाखाचे मोर्चे निघतात त्यामध्ये लोक शांतपणे चालतात कुठली घोषणा नाही, आरडा ओरडा नाही, "मूकपणे केलेला आक्रोश " सरकारला ऐकू गेला पाहिजे हि त्यांची धारणा आहे  . आत्मक्लेश करून घेणे हा आंदोलनाचा फार चांगला मार्ग आहे  . जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या तेव्हा महाराजांना किती क्लेश झाले , किती वेदना झाल्या ! पण त्यांनी प्रस्थापितांना दोष देत बसले नाही उलट १३ दिवस उपोषण केले व स्वतःला आत्मक्लेश करून घेतले आणि फलस्वरूप गाथा इंद्रायणीत व लोकगंगेत तरला . तसेच ह्या मोर्च्याचे कौतुक वाटते . कुठेही जाळपोळ नाही, फूटतूट नाही, उलट मोर्चा पुढे गेल्यावर स्वयंसेवक पाठीमागे स्वच्छता करतात . "मौनं सर्वार्थ साधनं ।।"हे सुभाषितकारांनी म्हटले ते किती सार्थ आहे . नेहमी बोलणार्यापेक्षा कधीही न बोलणारा जर बोलला तर तो मार्मिक बोलत असतो आणि अर्थपूर्ण बोलत असतो व त्याच्या बोलण्याचा परिणाम होत असतो. सतत बोलणार्यांची स्थिती उत्तरासारखी होते " बालिश बहू बायकांत बडबडला ।।" त्याची बडबड व्यर्थ ठरण्याची  शक्यता असते . कोणी नेता नाही ,  पुढारी नाही,इथे समाज मनच पेटून उठले आहे . अशीच एकी आणि संघटन जर मराठ्यांनी ठेवले तर ध्येय सध्या होणे अवघड नाही . जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी म्हटले आहे " यारे यारे लहान थोर । याती भलते नरी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ।।"  याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन एक चांगला समाज  घडविण्याचे श्रेय मिळाल्याशिवाय राहणार नाही .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा