शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव





आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्वर ।।१।।
चौर्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्णु ।।२।।

आळंदी हे तर अनादी काळापासूनचे सिध्दांचे क्षेत्र आहे , तेथे ब्रहमदेवापासून ते इंद्रापर्यंत  अनेकांनी यज्ञ याग करून हि भूमी पावन केली आहे. व माउलींनी येथे वास्तव्य केल्यापासून या तीर्थ क्षेत्राची तर महती फार वाढली व भागवत धर्म मंदिराचा पाया ज्ञानोबांनी रचला आणि वारकरी संप्रदायाला एक मोठे व्यासपीठ व अधिष्ठान मिळाले . या क्षेत्राची वाढ व महिती श्री नाथ बाबांनी व श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केले . तुकाराम महाराजांनी तर स्वखर्चाने जणिर्णोद्धार केला . तुकाराम महाराजांचे चिरंजीव श्री नारायणबाबांनी तर ज्ञानोबा -तुकोबांच्या पादुका एकाच रथात ठेऊन आळंदी ते पांढरी असा आषाढीचा सोहळा सुरु केला पुढे तो वेगवेगळा झाला . व पुढे हैबत बाबांनी तर माउलींच्या पादुका गळ्यात घेऊन पंढरीला गेले . तात्पर्य या क्षेत्राची माहिती दिवसेंदिवस वाढतच जातेय . या क्षेत्राने महाराष्ट्राला हजारो कीर्तनकार दिले आहेत.
            तीर्थक्षेत्राचे काही नियम असतात , तिथे जी नदी असते त्या नदीमध्ये साबण लावून  अंघोळ करायची नसते, नग्न होऊन स्नान करायचे नसते . त्या नदीमध्ये लघुशंका करायची नसते. साबण लावून कपडे धुवायचे नसतात . कारण भाविक लोक ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करीत असतात. हे तिथले पावित्र्य सांभाळले गेलेच पाहिजे व तशी व्यवस्था तेथे कार्यरत असावयास हवी . परवा मी आळंदीला माऊलीच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा इंद्रायणीवर तीर्थ घेण्यासाठी गेलो आणि बघितले तर घाटावर जिकडे तिकडे कचरा पडलेला व घाणीचे साम्राज्य पसरलेले, व अशाही ठिकाणी मात्र घाटाच्या कामासाठी व इतर व्यवस्थेसाठी नगरपालिकेचा/ संस्थानचा  पावती फाडण्याचा टेबल लावलेला .आणखी थोडे पुढे गेलो तेव्हा निदर्शनास आले कि जिथे तीर्थ घ्यायचे तिथे काही महिला खुशाल कपडे साबण लावून धूत होत्या आणि हाच प्रकार सर्वत्र होता . तीर्थ कसे घ्यावे हा एक प्रश्न पडला तिथे नगरपालिकेचा कोणीही सेक्युरिटी नव्हता कि कोणी स्वयंसेवकही नव्हता . लोक भावनेने नदीत  उतरत होते पाय धुवून बाहेर येत होते पण ! तीर्थ घेत नव्हते . पण या स्थानिक लोकांना कोण काय म्हणणार ? त्यांचे प्रबोधन कसे करणार ? भारतात सर्व तीर्थात यापेक्षा वेगळी स्थिती नाही . मा . प्रधानमंत्री श्री मोदी साहेबांनी स्वच्छतेचा नारा दिलेला आहे . पण हे काम एकट्याचे नाही . मी ऑस्ट्रेलियात गेलो होतो तेथील स्वच्छता कमालीची आहे . यारा नावाची नदी आहे तेथे आम्ही गेलो तेव्हा आम्ही बघितले कि नदीच्या किनाऱ्यावर कुठेही कचरा घाण दिसली नाही . त्या लोकांना ते जमते पण आपण का नाही असा विचार करत ? मानसिकताच खराब झाली आहे. अर्थात हे सर्व स्थानिक लोकच करतात असे नाही तिथे जाणारे यात्रेकरू सुद्धा घाण करतात . तर मित्रांनो आपण सुरवात आपल्यापासूनच करूयात कुठेही रस्त्यावर , घाटावर, पवित्र ठिकाणी आपण कोणत्याही स्वरूपाची घाण करायची नाही . नेहमी आपल्याबरोबर एका पिशवीत कागदी पिशव्या ठेवायच्या आणि आपल्याकडचे जे काही टाकाऊ असेल ते त्या पिशवीत टाकायचे व जिथे डस्ट बिन असेल तेथे ते टाकून द्यायचे . रामकृष्ण हरी !!

भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा