सोमवार, १९ जून, २०१७

   ।। होय होय वारकरी ।।
जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी सांगितले आहे कि पंढरी बघायची असेल तर तुला वारकरीच व्हावे लागेल . कारण पंढरीचा महिमा असा आहे कि तो वारकरी झाल्याशिवाय कळत नाही त्यासाठी वारकरी व्हावे लागेल " होय होय व वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।। " वारकरी होऊन वारीत सामील होण्याबाबत कोणाची काही तक्रार असण्याचे कारण नाही ..... काल -परवा कोणी धारकरी माऊलीच्या पालखीच्या पुढे तलवारी वगैरे घेऊन आले कदाचित ते त्यांची कला सादर करीत असतील ...पण वारीचे काही नियम असतात. पालखीच्या मार्गावरील काही पद्धती असतात. ते नियम पाळायला काय हरकत आहे . गर्दी दिसली कि घे आपली पोळी भाजून ! अहो निळोबारायानंतर संत झाले नाही का ? पण त्याचे सुद्धा अभंग काव्य प्रमाण धरले जात नाही , हा दंडक आहे आणि तो पळाला पाहिजे . छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येत तेव्हा ते त्यांचा लवाजमा बाजूला ठेवून येत . तुम्ही तुमचे वारकरी संप्रदायात घुसडयाचे काही कारण नाही . उद्या कोणीही उठेल आणि दिंडीमध्ये सामील होऊन आम्हाला आमची कला सादर करायची म्हणेल तर ते चालणार नाही . " हाती टाळ दिंडी घेऊनि नाचा ।।" असा आदेश संतांचा आहे तलवारी नव्हे !! तलवारीचे क्षेत्र वेगळे आहे . वारीत सरमिसळ कशासाठी ? प्रत्येकाला आपण व्यक्त व्हावे वाटते. पण त्याला मार्ग भिन्न आहेत. काही कर्मठ वारकऱ्यांमध्ये घुसले आहेत आणि नको त्या पद्धती सुरु करीत असतील तर त्या तिथेच रोखल्याही पाहिजेत. वारकरी संप्रदायाची संप्रदायाची आचारसंहिता आहे.
लोकमान्य टिळक आणि ह भ प श्री जोग महाराज हे मित्र होते , ते दोघे एकदा पंढरपूरला गेले व पांडुरंगाच्या दर्शनाची एक विशिष्ट पद्धत आहे . अगोदर श्री चोखोबार्यांचे समाधीचे दर्शन , नंतर श्री नामदेव पायरीचे दर्शन त्यानंतर आत गेल्यावर गरुड खांबाचे दर्शन व पुढे मग पांडुरंगाचे दर्शन व याप्रमाणे दोघांनी दर्शन झाल्यावर गाभाऱ्यात आले व जोग महाराजांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे दोन्ही हातानी आपले कान धरून उडी मारली ... व टिळकांना पण म्हणाले कि " येथे आपले कां धरून उडी मारावी लागते " तर टिळक म्हणाले " मी इंग्रज सरकारचे कान धरतो , माझे नाही ". जोग महाराज म्हणाले "इंग्रजांचे कान धरण्यासाठी बळ हवे असेल तर अगोदर पांडुरंगासमोर आपले कान धरावे लागतील " टिळकांनी लगेच स्वतः:चे कां धरले आणि उडी मारली . तात्पर्य वारकरी संप्रदायाचे नियम हे सगळ्यांनी पाळायचे असतात. व ती शिस्त पालन करून घेण्याची जबाबदारी चोपदारांची असते म्हणून त्यांनी जर आपल्याला तसे सांगितले तर त्यांचा राग यायचे काही कारण नाही . ज्याच्या त्याच्या क्षेत्राचे ज्याचे त्यालाच माहित असते. दिंडी सोहळा म्हणजे काही फुटकळ उत्सव नाही त्याला एक शिस्त आहे.
एकदा दिंडी प्रस्थानाचे वेळी काही दिंडी चालकांमध्ये मतभेद झाले व पोलीस फोर्स बोलवावा लागला पण लोक काही ऐकेनात तेव्हा ह भ प मामा दांडेकर होते एस पी मामांना म्हणाले " मामा आता यांच्यावर लाठी चार्ज करता येणार नाही व यांना आवरताही येत नाही काय करावे काही कळत नाही " मामा म्हणाले " साहेब तुम्ही काही काळजी करू नका ... आमच्या वारकऱ्यांना शिस्त आहे ते कोणाचे ऐकणार नाहीत पण माऊलीच्या सेवकाचे नक्की ऐकणार ." आणि मामांनी चोपदाराला कल्पना दिली , काय सांगावे ! चोपदाराने रथावर जाऊन एक ललकारी दिली आणि त्याच्या हातातील दंड उंच धरला , काही क्षणात सर्व वारकरी समाज एकदम शांत झाला व चोपदार काय सांगतो हे कां टवकारून ऐकू लागला . तात्पर्य हि आहे वारकरी संप्रदायाची शिस्त . हि मोडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये आणि आपले काही नवीन मांडण्याच्या भानगडीत पडू नये . तो वारकऱ्यांचा अपमान ठरेल . ह भ प राजाभाऊ चोपदार माउलीचे चोपदार त्यांच्या शिस्तीचे सर्वांनी आदराने पालन करावे त्यांना तो अधिकार आहे . राजाभाऊ तसे वैक्तिक जीवनात खरेच खूप नम्र आहेत. हजारो वारकरी त्यांना आदराने ओळखतात. तेव्हा त्यांच्या कृतीचे मी समर्थन करतो . रामकृष्ण हरी ।
हि पोस्ट कुठल्याही अभिनिवेशाने लिहली नाही नि:पक्षपातीपणाने लिहली आहे तेव्हा कोणी उगीच ओढाताण करू नये आणि विषयांतर करण्याचे प्रयत्न करू नये . मी त्याला किंमत देणार नाही याचे नोंद घ्यावी
अशोकानंद महाराज कर्डीले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा