जय हरी !
धन्य म्हणवीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।।वारकरी संप्रदायातील भागवत धर्म मंदिराचे कळस असणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा आज निर्याण दिवस म्हणजेच " बीजोत्सव". ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस ।। असे तुकाराम महाराजांची शिष्या संत बहिणाबाई पाठक यांनी म्हटले आहे. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहितांना श्रीमद भगवद गीतेचा आधार होता ," पदाची कोर न सांडी ।।" हि त्यांना मर्यादा होती , भगवंताचे मनोगत सांगायचे होते. तसे तुकोबारायांना गाथा लिहितांना बंधन नव्हते त्यामुळे गाथ्यामध्ये सर्व विषय आलेले आहेत. व या स्वातंत्र्यामुळेच तुकोबाराय तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर परखडपणे बोलू शकले. नाही भीड भार । तुका म्हणे साना थोर ।।... सत्याचिये साठी नाही भीड भार । आप आणि पर दोन्ही नाही ।। सत्य सांगण्याकरिता महाराजांनी कोणाचाही मुलाहिजा राखला नाही . वास्तविक पाहता तत्कालीन परिस्थती अत्यंत सनातनी व जातीभेद , वर्णभेद मानणारी होती . अशा प्रतिकूल काळात तुकाराम महाराजांचा अवतार झाला होता. महाराजांनी सनातनी व्यवस्थेविरुद्ध उघडपणे बंड पुकारले होते , ढोंगी महाराज , अभक्त ब्राहमण , फुटकळ दैवते, याविषयी महाराजांनी परखडपणे लिहले . म्हणून ते सर्वात श्रेष्ठ क्रांतिकारी संत ठरले . तसेच ते समाजाभिमुख समाजसेवक सुद्धा होते. देहू परिसरात बारा वर्षे दुष्काळ पडला अशा वेळी महाजांनी आपली धान्याची कोठारे जनतेसाठी खुली केली , सर्व धान्य वाटून टाकले . महाराज हे महाजनकीचा व्यवसाय सुद्धा करीत होते . त्यांनी ओळखले कि पाऊस नसल्यामुळे गरीब लोक आता आपले व्याज सुद्धा देऊ शकणार नाहीत तेव्हा त्यांनी जेव्हढ्या कर्जाच्या वह्या होत्या त्या सर्व वह्या इंद्रायणीत बुडवून टाकल्या लोकांना कर्जमुक्त केले , त्यांचा " सातबारा कोरा केला ". हा तुकाराम महाराजांचा आदर्श घेऊन हल्लीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे पण गेंड्याची कातडी असलेले सरकार त्यांच्याही लोकांचे व विरोधकांचे ऐकायला तयार नाही . तसेच तुकोबाराय उत्कृष्ट व्यापारी अर्थतज्ज्ञ होते. " याती शूद्र केला वैश्य केला व्यवसाव ।। " हे महाराजांनी स्वत:च म्हणून ठेवले आहे. ते उत्कृष्ट शेतकरी होते . " एका बीज केला नाश । मग भोगिले कणीस ।।" व अशाच शेतीवरील त्यांच्या अभंगावरून लक्षात येते.
महाराजांनी वेद , पुराणादिकांचा अभ्यास देखील केला होता. " पाहिली पुराणे । धांडोळिली दर्शने ।। " अठरा पुराणे आणि षड दर्शने महाराजांनी अभ्यासली होती . त्यावेळी हे ग्रंथ भाषांतरित झालेले नव्हते ते सर्व संस्कृतमध्येच होते. म्हणजे महाराजांना संस्कृत उत्तम येत होते. शिवाय त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन देऊन अनुग्रह दिला होता. " माझ्या विठाबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु ।। किंवा पांडुरंगे सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धी भेद ।।" नामदेवराय व पांडुरंग हे साक्षात भेटले आणि कवित्व करायची आज्ञा केली . सखा कृपावंत वाचा त्याची म्हणून त्यांच्या मुखवटे अभंग वाणी बाहेर पडू लागली .... वेदाचा तो अर्थ अम्हासीच ठावा । येरांनी वाहवा भार माथा ।। खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाहे मजुरीचे ।। किंवा तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरी वेदांत वाहे पाणी ।। व एव्हढेच बोलून महाराज थांबले नाही तर त्यांनी वेदाचे मनोगत सुद्धा सांगितले " वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची साधिला । विठाबासी शरण जावे । निजनिष्ठे नाम गावे ।। आम्ही नुसते वेदाचे पाठक नसून आम्हाला त्याचा यथार्थ अर्थ सुद्धा कळतो .... नेणती वेद श्रुती कोणी । आम्हा भविकावाचूनि ।। तुका म्हणे नाही श्रुती आतुडलें । आम्हा सापडले गीता गाता ।। किंवा शास्त्राचे जे सार वेदाची जो मूर्ती । तो माझा सांगाती प्राणसखा । म्हणुनी नाही अनिकाचा पांग ।। केव्हडा हा आत्मविश्वास आणि अनुभूती . आणि नेमके हेच तत्कालीन पंडित आणि पुरोहित वर्गाला सहन झाले नाही त्यांना विविध प्रकारे छळण्यास सुरवात झाली . पण महाराज त्यांच्या विरोधाला जुमानीत नव्हते उलट आणखी स्पष्ट लिहू लागले " न पढवे वेद नव्हे शास्त्र बोध । नामाचे प्रबंध पाठ करा ।।.... निगमाचे वन नको शोधू करू शीण ।। .... व्यर्थ भराभर पाठांतर काय कामाचे . घोडे काय ओझे वागवीत नाहीत ? पण त्यांना त्यातील काही कळते का ? म्हणून न लगे सांडणे मांडणे । अगं निगमाचे देखणे ।। न लगे पाहावे अबद्ध वाकडे । उच्चारावे कोडे नाम तुझे ।। .. आणि नाही वेळ नाही पंडिताचा धाक । होत का वाचक वेदवक्ते ।। न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएक भावे ।। धातू पोसोनिया आणिक उपदेश । अंतरितो लेश प्रेम नाही ।। व ब्राहमण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी । पहा श्रुतीमधी विचारूनि ।। असे परखड विचार महाराजांनी मांडले . आणि ते या उच्चवर्णीयांना सहन झाले नाही मग त्यांनी नाना प्रकारे महाराजांना त्रास द्यायला सुरवात केली . तितक्याच प्रमाणात त्यांना उत्तर दिले " सकळांसी येथे आहे अधिकार । कलियुगी उद्धार हरीच्या नामे ।। किंवा ब्राहमण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार । बाळे नारीनर अदीकरोनी वेश्याही ।। " परमार्थाच्या क्षेत्रात महाराजांनी मोठी जनजागृती केली . त्यामुळेच पुरोहित वर्ग नाराज झाला कारण त्यांचे पोट भरणे हे लोकांच्या अज्ञानात असते. त्यामुळे पंडित लोक खोडी काढू लागले. किंबहुना कोर्ट कचेरीमध्ये दावे दाखल झाले महाराजांना त्यांच्या अभंगाच्या वह्या बुडवायला आदेश दिले गेले. तेरा दिवस उपोषण केले व त्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत तरल्या ताशा त्या लोकगंगेतही तरल्या . पण मनस्ताप खूप झाला. गावचे लोकही त्यांचेच खाऊन त्यांच्या विरोधात गेले . " कोपला पाटील गावीचे हे लोक । आता मज भीक कोण घाली ।।" अशी भ्रांत पडली कारण धर्मसत्तेपुढे कोणाचेही चालत नव्हते ... साक्षात छत्रपति शिवाजी महाराजांना सुद्धा दोन वेळा राज्याभिषेक करावा लागला .
चमत्कार व अंगात येणे अशा प्रकारांना महाराजांनी कधीच महत्व दिले नाही . अंगे भारोनिया वारे दया देती । तया भक्ता हाती चोट आहे।। मांत्रिक हा काळतोंड्या कुत्र्यासारखा आहे . वनात जाण्याची गरज नाही . कासया करावे तापाचे डोंगर ? रिद्धी सिद्धी यांचे दास आम्ही होणार नाही . भगवे कपडे घालून लोकांना भुलवयाचे काम आम्ही करणार नाही . उलट भगवे तरी श्वान । सहज वेष त्याचा ।। किंवा भिक्षापात्र अबलंबिणे । जालो जिणे लाजिरवाणे ।। भिक्षा मागून भगवे कपडे करून जगणे म्हणजे लाजिरवाणे आहे . स्वत: कष्ट न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणे हे चांगले नाही . परमार्थातील दांभिकपणावर महाराजांनी कोरडे ओढले.
मोक्ष सुख हाणू लाता । भय नाही जन्म घेता ।। असे म्हणून त्यांनी मोक्षाचे स्वरूप काय आहे हे समजावून सांगितले . बंध आणि मोक्ष या दोन्ही कल्पना आहेत. किंबहुना " रज्जू सर्पाकार । भासियले जगडंबर ।। " हा विवर्तवादातील सिद्धांत त्यांनी सांगितला . जगत मिथ्यत्व प्रतिपादन करून ब्रह्माचे सत्यत्व प्रतिपादन केले . सत्य तू सत्य तू सत्य विठ्ठला । का गा हा दाविला जगदाकार ।। , सत्य साच खरे । नाम विठोबाचे बरे ।। आणि एवढे असूनही भक्तिमार्गाचे महत्व अनन्यसाधारण आहे हेच सांगितले " भक्ती पंथ बहू सोपा । पुण्य नागवे पापा ।। भक्तीचा जिव्हाळा ज्याला आहे तोच मला आवडतो दुसरा कोण पंडित महाज्ञानी असला तरी त्याला मी मान्यता देत नाही. महाराजांनी परमार्थ सोपा करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवला . महाराजांचे हे कार्य पारमार्थिक क्षेत्रातील दिग्गजांना धक्का देणारी होती .
" वैकुंठा जावया तापाचे सायास । करणे लागे जिवा नाश बहू ।। आणि म्हणून वैकुंठीचा देव आणिला भूतळा। धन्य तो आगळा पुंडलिक ।। वैकुंठादिक स्वर्ग सुख सुद्धा तुच्छ करून टाकली . नको वैकुंठीचा वास । तया सुखा आहे नाश ।। या न्यायाने त्यांनी जगत मिथ्यत्व अनुभूतीने जगालाही पटवून दिले . व आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहोत , स्वयंभू आहोत हेही ठणकावून सांगितले " तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइतें केले नव्हो ।।" तात्विक, उपदेशपर, करुणापर, वेदान्तापर,अशा विविध प्रकारची अभंग रचना केली आणि " पीडिता हे राष्ट्र देखोनि जग ।।" राष्ट्राची व जगाची पीडा बघवेना , प्रस्थापितांचा छळ , आणि देहीच विदेही भोगू दशा ।। हि महाराजांची प्रतिभ अनुभूती त्यामुळे शरीराचे तादात्म्य राहिले नाही . " झाला प्रेतरूप शरीराचा भाव ।।"... आता ह्या जगात राहू वाटेना आणि मी आता आपुल्या माहेराला जाईन .. मी कृतकृत्य झालो आहे. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो ।। अशी माझी स्थिती आहे. म्हणून " जातो आता आज्ञा घेऊनिया स्वामी । काळक्षेप आम्ही करू कोठे ।।आता मी जातो ..... मला शेवटचे चिन्ह दिसू लागले आहेत. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला । गरुडावर बैसोनि माझा कैवारी आला ।। .... आता माझे कर्तव्य संपले आहे ,माझ्या कीर्तनात लोकांना जो आनंद मिळेल तो कुठेही मिळणार नाही. " कडू स्वर्गवास करिन भोग ।।"स्वर्गादि सुखोपभोग सुद्धा माझ्या कीर्तनापुढे तुच्छ वाटतील . लोकही म्हणतील ," धन्य म्हणावीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।।", देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ।। या नामदेव महारांजाच्या उक्तीप्रमाणे जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे आज म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीवर निर्याण झाले . त्यांचा अभंग गाथा हेच त्यांचे खरे वाङ्मयरूप आहे. तुकोबाराय जर समजावून घ्यायचे असतील तर त्यांचा अभंग गाथा अर्थारुद्ध होऊन वाचला कीं खरे तुकाराम महाराज समाजातील म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात गाथा अवश्य ठेवावा. रामकृष्ण हरी ।।
-भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा