अभावातून भावाची कधीही उत्पत्ती होत नसते व भावरूप पदार्थाचा कधीही अभाव होत नसतो . पण शून्यवादाची जे सहा नास्तिक तत्वज्ञान सांगणारे शास्त्रे आहेत ते म्हणतात कि " हे जग शून्यातून निर्माण झाले ". हे शून्यवादी अभाव प्रमाण मानतात पण विचार करा नसण्यातून असणे कधीच निर्माण होत नाही . शून्य म्हणजे अभाव . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात " न झाला प्रपंच आहे परब्रहम ।अहं सोहम ब्रह्म आकळले ।।" कोणतेही मिथ्या पदार्थाला अधिष्ठान सत्य लागत असते . सत्य अधिष्ठानाशिवाय मिथ्या पदार्थ भासत नाही . शून्यवादी मात्र म्हणतो कि काहीहि जे नाही तेच जग निर्माण करते . किती हास्यास्पद आहे . " वांझेचीया पुत्रा कैची जन्म पत्रिका ।।" वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कशी असू शकेल ? तसे जग अधिष्ठानाशिवाय कसे दिसेल किंवा भासेल ? " रज्जू सर्पाकार। भासियेले जगदंबर ।।" असे तुकाराम महाराज म्हणतात. ( विवर्तवाद ) एके हाती दंतु । जो स्वभावाता खंडितु ।।... ज्ञा . तात्पर्य शून्यवाद हा स्वभावात:च खंडित आहे . एक सुंदर दृष्टांत आहे ... एक भिकारी एका घराच्या बाहेर उभा राहून भिक्षेकरिता हाक मारतो व म्हणतो " माई भिक्षा वाढा " आतील बाई म्हणते कि " पुढे जा पुढे ! घरात कोणी नाही . ! शून्यवादाची अशी स्थिती आहे कोणी नाही म्हणणारा कोणी तरी आहे ना ? म्हणजे नाही म्हणायचे त्याकरिता सुद्धा कोणीतरी अगोदर असावे लागते . आणि खरोखर कोणीच नसते तर कोणीच उत्तर दिले नसते . आणि म्हणे शून्यातून जग निर्मण झाले . कधी कधी एखादा माणूस म्हणतो सुद्धा " अहो ! माझ्या बापाने काहीहि केले नाही मीच सर्व शून्यातून निर्माण केले ." यालाच वदतो व्याघात दोष म्हणतात. "नासते विद्यते भावो नाभावो विद्यते संत:।। " वेदांत जग नाही असे म्हणत नाही तो म्हणतो जग आहे पण कसे " रज्जू सर्पवत " ते हि तुम्ही म्हणता म्हणून अगदी सोप सांगायचे तर व्यवहारात सुद्धा लोक म्हणतात "दिसत तस नसत म्हणून जग फसत " स्वप्नातील पदार्थ स्वप्न काली दिसतात पण जागे झाले कि ते मिथ्या ठरतात . स्वप्नातील पदार्थ हे अनिर्वाचिनीय व अतींद्रिय आहेत तरी पण ते भासतात . व जागे झाल्यावर त्याचे अस्तित्व संपते . तद्वत ब्रह्मज्ञान झाले कि जगद्भ्रास मिथ्या ठरतो .म्हणून अभाव प्रमा मानणारा शून्यवाद सहजच खंडित होतो .
ऐसे जागवितो मना । सरिसे जनासहित ।। या तुकोक्तीप्रमाणे जे काही विचार मांडायचे ते आपल्या मनाला योग्य वाटले पाहिजेत आणि शिवाय त्याचा इतरांनाही उपयोग व्हावा हाच या ब्लोगचा उद्देश आहे . वाचकांनी कृपया आपली अभिप्राय नोंदवावेत म्हणजे मलाही सुधारण्याची संधी मिळेल व आपल्यालाही वाचनाचा आनंद मिळेल . अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६
शनिवार, १० सप्टेंबर, २०१६
।। परपीडे चित्त दुखी: होते ।।
जय हरी !
नवल वर्तले! लाखा लाखाचे मोर्चे निघतात त्यामध्ये लोक शांतपणे चालतात कुठली घोषणा नाही, आरडा ओरडा नाही, "मूकपणे केलेला आक्रोश " सरकारला ऐकू गेला पाहिजे हि त्यांची धारणा आहे . आत्मक्लेश करून घेणे हा आंदोलनाचा फार चांगला मार्ग आहे . जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या तेव्हा महाराजांना किती क्लेश झाले , किती वेदना झाल्या ! पण त्यांनी प्रस्थापितांना दोष देत बसले नाही उलट १३ दिवस उपोषण केले व स्वतःला आत्मक्लेश करून घेतले आणि फलस्वरूप गाथा इंद्रायणीत व लोकगंगेत तरला . तसेच ह्या मोर्च्याचे कौतुक वाटते . कुठेही जाळपोळ नाही, फूटतूट नाही, उलट मोर्चा पुढे गेल्यावर स्वयंसेवक पाठीमागे स्वच्छता करतात . "मौनं सर्वार्थ साधनं ।।"हे सुभाषितकारांनी म्हटले ते किती सार्थ आहे . नेहमी बोलणार्यापेक्षा कधीही न बोलणारा जर बोलला तर तो मार्मिक बोलत असतो आणि अर्थपूर्ण बोलत असतो व त्याच्या बोलण्याचा परिणाम होत असतो. सतत बोलणार्यांची स्थिती उत्तरासारखी होते " बालिश बहू बायकांत बडबडला ।।" त्याची बडबड व्यर्थ ठरण्याची शक्यता असते . कोणी नेता नाही , पुढारी नाही,इथे समाज मनच पेटून उठले आहे . अशीच एकी आणि संघटन जर मराठ्यांनी ठेवले तर ध्येय सध्या होणे अवघड नाही . जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी म्हटले आहे " यारे यारे लहान थोर । याती भलते नरी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ।।" याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन एक चांगला समाज घडविण्याचे श्रेय मिळाल्याशिवाय राहणार नाही .
शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्वर ।।१।।
चौर्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्णु ।।२।।
आळंदी हे तर अनादी काळापासूनचे सिध्दांचे क्षेत्र आहे , तेथे ब्रहमदेवापासून ते इंद्रापर्यंत अनेकांनी यज्ञ याग करून हि भूमी पावन केली आहे. व माउलींनी येथे वास्तव्य केल्यापासून या तीर्थ क्षेत्राची तर महती फार वाढली व भागवत धर्म मंदिराचा पाया ज्ञानोबांनी रचला आणि वारकरी संप्रदायाला एक मोठे व्यासपीठ व अधिष्ठान मिळाले . या क्षेत्राची वाढ व महिती श्री नाथ बाबांनी व श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केले . तुकाराम महाराजांनी तर स्वखर्चाने जणिर्णोद्धार केला . तुकाराम महाराजांचे चिरंजीव श्री नारायणबाबांनी तर ज्ञानोबा -तुकोबांच्या पादुका एकाच रथात ठेऊन आळंदी ते पांढरी असा आषाढीचा सोहळा सुरु केला पुढे तो वेगवेगळा झाला . व पुढे हैबत बाबांनी तर माउलींच्या पादुका गळ्यात घेऊन पंढरीला गेले . तात्पर्य या क्षेत्राची माहिती दिवसेंदिवस वाढतच जातेय . या क्षेत्राने महाराष्ट्राला हजारो कीर्तनकार दिले आहेत.
तीर्थक्षेत्राचे काही नियम असतात , तिथे जी नदी असते त्या नदीमध्ये साबण लावून अंघोळ करायची नसते, नग्न होऊन स्नान करायचे नसते . त्या नदीमध्ये लघुशंका करायची नसते. साबण लावून कपडे धुवायचे नसतात . कारण भाविक लोक ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करीत असतात. हे तिथले पावित्र्य सांभाळले गेलेच पाहिजे व तशी व्यवस्था तेथे कार्यरत असावयास हवी . परवा मी आळंदीला माऊलीच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा इंद्रायणीवर तीर्थ घेण्यासाठी गेलो आणि बघितले तर घाटावर जिकडे तिकडे कचरा पडलेला व घाणीचे साम्राज्य पसरलेले, व अशाही ठिकाणी मात्र घाटाच्या कामासाठी व इतर व्यवस्थेसाठी नगरपालिकेचा/ संस्थानचा पावती फाडण्याचा टेबल लावलेला .आणखी थोडे पुढे गेलो तेव्हा निदर्शनास आले कि जिथे तीर्थ घ्यायचे तिथे काही महिला खुशाल कपडे साबण लावून धूत होत्या आणि हाच प्रकार सर्वत्र होता . तीर्थ कसे घ्यावे हा एक प्रश्न पडला तिथे नगरपालिकेचा कोणीही सेक्युरिटी नव्हता कि कोणी स्वयंसेवकही नव्हता . लोक भावनेने नदीत उतरत होते पाय धुवून बाहेर येत होते पण ! तीर्थ घेत नव्हते . पण या स्थानिक लोकांना कोण काय म्हणणार ? त्यांचे प्रबोधन कसे करणार ? भारतात सर्व तीर्थात यापेक्षा वेगळी स्थिती नाही . मा . प्रधानमंत्री श्री मोदी साहेबांनी स्वच्छतेचा नारा दिलेला आहे . पण हे काम एकट्याचे नाही . मी ऑस्ट्रेलियात गेलो होतो तेथील स्वच्छता कमालीची आहे . यारा नावाची नदी आहे तेथे आम्ही गेलो तेव्हा आम्ही बघितले कि नदीच्या किनाऱ्यावर कुठेही कचरा घाण दिसली नाही . त्या लोकांना ते जमते पण आपण का नाही असा विचार करत ? मानसिकताच खराब झाली आहे. अर्थात हे सर्व स्थानिक लोकच करतात असे नाही तिथे जाणारे यात्रेकरू सुद्धा घाण करतात . तर मित्रांनो आपण सुरवात आपल्यापासूनच करूयात कुठेही रस्त्यावर , घाटावर, पवित्र ठिकाणी आपण कोणत्याही स्वरूपाची घाण करायची नाही . नेहमी आपल्याबरोबर एका पिशवीत कागदी पिशव्या ठेवायच्या आणि आपल्याकडचे जे काही टाकाऊ असेल ते त्या पिशवीत टाकायचे व जिथे डस्ट बिन असेल तेथे ते टाकून द्यायचे . रामकृष्ण हरी !!
भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)