सोमवार, ११ जुलै, २०१६

अभंग गीता (मंत्र गीता ) -जगद्गुरू श्री तुकाराम महाराज

जय हरी ।

जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा अभंग गाथा एव्हढेच वाङ्मय आपल्याला माहीत आहे पण !तुकाराम महाराजांचे आणखीही काही साहित्य आहे जे की काळाच्या ओघात लुप्तप्राय झाल्यासारखे आहे . जरासे माउलींनी भगवत  गीतेवर भाष्य लिहले , नाव ज्ञानेश्वरी अगदी त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी सुद्धा "मंत्र गीता " किंवा अभंग गीता नावाचा ग्रंथ लिहला आहे भगवत गीतेच्या श्लोकावर अभंगरूपात महाराजांनी भाष्य लिहले आहे . हाच ग्रंथ तुकाराम महाराजांची अनुग्रहित शिष्या  संत बहिणाबाई पाठक यांनाही हाच ग्रंथ दिला होता . . स्वतः: बहिणाबाईंनी त्यांना तुकाराम महाराजांनो कसा अनुग्रह दिला व मंत्र गीता दिली याविषयी अभंग लिहला आहे .
बहुत अंतरी शोक आरंभिला । का मज विठ्ठला मोकलिले ।।१।।
त्रिविध तापाने तापले मी बहु । जाईना का जीवु प्राण माझा ।।२।।
ताव अकस्मात सातव्या दिनी ।नामसंकीर्तनी घोषयुक्त ।।३।।
तुकाराम रूपे येवोनि प्रत्यक्ष । पूर्वपक्ष सांभाळिजे ।।४।।
नको करू चिंता मी तुजपाशीं ।घेई अमृताशी हातिचिया ।।५।।
गाय केले वत्स मुखी निघे धार । अमृत हे सार सेवी हेचि ।।६।।
ठेवोनिया कर मस्तकी बोलिला । मंत्र सांगितला कर्णरंध्री ।।७।।
म्या ही  पायावरी ठेविले मस्तक । दिधले पुस्तक "मंत्र गीता" ।।७।।
कार्तिक वद्य पंचमी रविवार । स्वामींचा विचार गुरुकृपा ।।८।।
आनंदले मन चिदरूपी कोंदले । उठोनि बैसले चमत्कारे ।।९।।
मंत्र पाठविती तुकोबास्वरूपा । स्वप्नामाजी कृपा पूर्ण केली ।।१०।।
अमृत पाजिले चवी अनारीसी । साक्ष ज्याची त्याची मनामाजी ।।११।।
बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची । तुकाराम साची पूर्ण केली ।।१२।।


तात्पर्य पूर्वी असे होते की ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवतगीता या प्रस्थान त्रयीवर भाष्य केली त्यांना जगद्गुरू , आचार्य पद प्राप्त होत होते विषय तो नाही पण जसे माउलींनी गीतेवर ओवीरुपात भाष्य लिहले तसेच मराठीमध्ये  अभंग या छंदांमध्ये तुकाराम महाराजांनी " मंत्र गीता " नावाचे गीतेवर भाष्य लिहले आहे भगवत गीतेच्या प्रत्येक श्लोक महाराजांनी  अभंग लिहलेले आहेत . हे अभंग " गीतार्थ कोष " नावाचा एक ग्रंथ आहे त्यामध्ये आहे . हा ग्रंथ संग्राहक श्री दिनकर विनायक भिडे यांनी संपादित केला आहे . वंदे मातरम फाऊंडेशन , मुंबई यांनी तो प्रकाशित केला आहे . परंतु जसा गाथा प्रसिद्ध झाला तशी ही मंत्र गीता प्रसिद्ध का होऊ शकली नाही ? किंवा वारकरी संप्रदायात या मात्र गीतेचा प्रचार का होऊ शकला नाही ? का जाणीवपूर्वक हा ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचूच द्यायचा नाही की काय ?  हे मला सतत आश्चर्य वाटत आलेले आहे . बरे ही मंत्र( अभंग)  गीता माझ्या पाहण्यात पण आहे . वारकरी संप्रदायातील अनेकांना हा ग्रंथ माहीतही नाही .




             

रविवार, ३ जुलै, २०१६

।। पीडिता हे राष्ट्र देखोनि जग ।

            मी  मागील आठवड्यात बीडला कार्यक्रमासाठी गेलो होतो तेव्हा  जातांना जामखेड मार्गे गेलो व येतांना पाथर्डी मार्गे ( विशाखापटटण  महामार्ग) आलो . सांगायचे तात्पर्य मला कुठेही हिरवे गावात दिसले नाही कि कुठे पाणी दिसले नाही . मोठमोठे तलाव दिसत होते परंतु त्यात पाण्याचा थेंबही नव्हता . तापमान ४१ अंशापर्यंत गेलेले . रस्त्याने कुठेही पाखरे दिसली नहित. रस्त्यावर माणसे दिसत नव्हती …… कुठेतरी एखादा मजूर मनुष्य रस्त्याने विमनस्क अवस्थेत जातांना दिसत होता . १९७२ च्या दुष्कालापेक्षाही या वर्षीच्या दुष्काळाची तीव्रता फार आहे . विशेष करून मराठवाड्यात जास्त आहे . बीड परिसरातील काही लोक मुंबईला निघून गेले आहेत कारण  येथे हाताला काम नाही शेते ओसाड पडली सरकार फार काही करते असे नाही . सर्व सामान्य लोक तर सरकारवर नाराज आहेत . सत्तेतील लोक म्हणतात " या लोकांना फुकट घ्यायची सवय लागली आहे ." अरे ! पण साधी गोष्ट आहे ज्या भागात पाणी नाही, हाताला काम नाही, जिथे पशु पक्षीही राह्यला तयार नाहीत तिथे माणसांची गोष्ट किती भयानक आहे . ६-७ परस खोल विहिरीत छोटे छोटे मुले जीव मुठीत धरून पाण्यासाठी उतरतात आणि विहिरीच्या तळाशी असलेले " चुल्लूभर " पाणी छोट्या वाटीने  भरतात . अर्धा ते एक तास हा प्रकार केल्यानंतर एक हंडा भरतो व विहिरावर कमीत कमी १००-२०० लोकांची रांग लागलेली तेही बरेचसे वृध्द कारण त्यांना गांव सोडता आलेला नाही . त्यांचे उदासवाणे चेहरे भेडसावतात . भविष्यात काय लिहिले हे कोणालाच माहित नाही . छावण्या कुठे कुठे दिसतात पण त्यातही कडक नियमावलीमुळे जास्त छावण्या नाहीत . चोरून लपून नाही म्हटले तरी काही जनावरे कसायाच्या तावडीत जात अहेत. शेतकरी आत्महत्या करीत अहेत. त्याचाही काही नेते , पुढारी, समाज सुधारक (?) सिने अभिनेते तुटपुंजी मदत करून,  शेतकऱ्यांच्या विधवा स्त्रियांना मदतीचा चेक देऊन छानपैकी फोटो काढून पेपरमध्ये छापून आणतात हि मोठे दयनीय अवस्था आहे सरकार म्हणते ," शेतकऱ्यांना आम्ही आधी सक्षम करू मग त्यांना कर्जच काढण्याची गरज राहणार नाही " हे एक वेळ खरे मानले तरी सध्याची स्थिती तसी नाही शेतकरी पार खचून गेला आहे . शेततळे अगोदर तुम्ही तयार करा मग आम्ही तुमच्या खात्यावर पैसे जमा करू ." लाल फितीतील कारभार तर जगजाहीर आहे . भ्रष्टाचारामध्ये भारत वरच्या क्रमांकावर आहे . कार्यलयात शेतकऱ्याला काय किमत आहे हे सर्वांनाच  माहित आहे . अल्प भू धारक शेतकर्यासाठी खरेच " आरक्षणाची " गरज आहे . पण ! (?) शेतकऱ्याचा विचार करायला वेळ नाही . वर त्याला "बळी राजा "म्हणायचे . तो तर  केव्हाच   पाताळात घातला आहे , "तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ।।" "उत्तम शेती, मध्यम व्यापार ,आणि कनिष्ट नोकरी " हि म्हण ज्याने कोणी सुरु केली त्याने काय विचार केला असेल त्याचे त्यालाच माहित पण ! आज मात्र उलट झाले आहे शेती कनिष्ट झाली आहे . शेतकऱ्याच्या मुलाला मुलगीहि देण्याचे धाडस कोणी करीत नाही . अशा अनेक अडचणी आहेत .
                     जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या काळात सलग बारा वर्षे दुष्काळ पडला होता . पण तेव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आढळत नाही . कारण " योजकस्तत्र दुर्लभ: ।।" योजना करणारा दुर्लभ असतो . त्यावेळी तुकाराम महाराज हे मोठे पिढीजात सावकार  होते , बारा बैलाची दावण होती , पनवेलपर्यंत त्यांचा व्यापार होता गडगंज श्रीमंत होते . धान्याची कोठारे होते. आणि अशा या दुष्काळात महाराजांचे हृदय द्रवले "न घडे यावरी न धरवे धीर । पीड्ता हे राष्ट्र देखोनि जग ॥३॥" आणि त्यांनी एक धाडशी निर्णय घेतला . धाकटा भाऊ " कान्होबा " याला बरोबर घेतले आणि दोघे भाऊ इंद्रायणीच्या तीरावर बसले आणि एक विचाराने निर्णय घेतला कि सर्व शेतकऱ्यांची कर्ज खाते फाडून टाकायची आणि दुसर्याच दिवसी सर्व गोर गरिबांना बोलावून घेतले व त्यांच्या देखत सर्व कर्ज खाते इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली . व्याजासगट मुद्दल माफ करून टाकले . व स्वत:च्या कोठारातून सर्वांना धान्य वाटून टाकले . सर्व तळागाळातला समाज सुखी झाला . विशेष म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे हे कृत्य बघून छत्रपती शिवरायांनी सुद्धा संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला शिवाय पेरणीच्या वेळी व्यापार्यांना  शेतकऱ्यांना  बियाणे मोफत देण्यास प्रवृत्त केले व त्याचे पैसे राजकोषातून अदा केले . हि होती राजनीती आणि धर्मनीती .
                         तात्पर्य आपण इतिहास विसरलो आणि त्यामुळे प्रजा सुद्धा शासनावर नाराज होऊ  शकते व त्याचा परिणाम पुढील निवडणुकीत दिसू शकतो . पण ! राजकारणी मोठे धूर्त असतात शेवटच्या दिवसात सगळे माफ करतील आणि लोकमत पुन्हा आपल्याकडे वळवतील …… हे सृष्टी चक्र असेच चालू राहील आणि नंतर  मात्र पश्चातापालाही जागा राहणार नाही .
                      दुष्काळ पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे " वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ।" हे आम्ही फक्त म्हणतो पण बेसुमार वृक्ष तोड आपणच करतो त्यासाठी आपण एक केले पाहिजे घरी वेगवेगळ्या फळांच्या बिया जमा कराव्यात आणि बाहेर कुठेही निघालो कि जवळ एखादे खुरपे किंवा तत्सम काहीतरी ठेवावे आणि डोंगरात, रस्त्याच्या कडेला पाऊस सुरु झाला कि ते बीज लावावे त्यायोगेच वृक्षराजी पुन्हा बहरेल आणि वेळेवर पाऊसहि येईल . रोग व्हायच्या आधी काळजी घेतली तर रोग होत नसतो . तेव्हा आता हि नुसती सरकारची जबाबदारी राहिली नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे . पोटाच्या लेकारासारखे झाडाला जपले तरच तुम्हाला निसर्ग सांभाळील अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात सुद्धा काही अर्थ नाही "पश्च्यात म्हणजे नंतर , नंतरचा ताप " तेव्हा मित्रांनो सावध व्हा आणि एक तर झाड लावा .
    रामकृष्ण हरी ।
             

वारी काल आणि आज



                                                         
              पंढरीची वारी हे एक वारकऱ्यांचे व्रत आहे व त्यात ते खंड पडू देत नाहीत " पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ।।" हे श्री तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवले आहे . तशी वारीची ही  प्रथा फार जुनी . ज्ञात परंपरा साधारण ७०० वर्ष्याची मानली जाते पण तसे नाही ज्ञानोबारायांचे आजोबा, माता पिता सुद्धा  पंढरीची वारी करीत होते असे उल्लेख नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये सापडतात. हजार -दोन हजार वर्ष्यापुर्वीची वारीची  परंपरा  आहे . फक्त आज असा सोहळा असतो तसा तो नव्हता . " माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।१।। पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।।२।।" माउली नाथ संप्रदायाचे असून सुद्धा वारकरी होऊन वारीला जाण्यात आनंद मानीत होते  व त्यांनी  सर्व सामान्य समाजाला बरोबर घेऊन अध्यात्माची एक महान चळवळ सुरू केली हरिभजनाने हे जग ढवळून काढले आणि पांडुरंगाच्या रंगात अवघे विश्व रंगवून टाकण्याचा विडा या संतांनी उचलला .
                     महाराष्ट्रातील तेराव्या -चौदाव्या शतकाचा कालखंड मोठा विचित्र होता . वाढती सामाजिक विषमता , धर्मातील नको तेवढे कर्मकांड , जातीभेद आणि ह्यामुळेच संतांची मांदियाळी जमली , त्यांनी ह्या कर्मकांडाला दूर सारण्याचा प्रयत्न केला " योग याग विधी येणे नोहे सिद्धी । वायाची उपाधी दंभ धर्म ।।" असा ठणकावून इशारा माउलींनी हरिपाठातून आधीच दिला होता  . हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या बनली . . वारकरी संप्रदायाची कीर्तनाची आचारसंहिता संत श्री नामदेव महाराजांनी घालून दिली " नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग । " असा कीर्तनाचा महिमा जागवला . नामदेवराय , चोखोबाराय,परिसा भागवत, नरहरी सोनार, सावता माळी, गोरबा कुंभार, कुर्मदास, सज्जन कसाई,  या संतांनी वारीला एक सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले एकही जात अशी राहिली नाही की ज्यात वारकरी संत झाले नाही सगळ्यांना सामावून घेऊन वारीचा महिमा वृद्धिंगत केला . याला साक्ष म्हणजे हा  तुकाराम महाराजांचा अभंग
उंचनिंच कांही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनियां।।
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी। दैत्याघरी रक्षीं प्रल्हादासी।।
चर्म रंगू लागे रोहिदासासंगे। कबिराचे मागीं विणी शेले।।
सजनकसाया विकूं लागे मांस। माळ्या सांवत्यास खुरपूं लागे।।
नरहरिसोनारा घडों फुंकूं लागे। चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी।।
नामयाची जनी सवें वेची शेणी। धर्माघरीं पाणी वाहे झाडी।।
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित। ज्ञानियाची भिंत अंगी ओढी।।
अर्जुनाचे रथी होय हा सारथी। भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची।।
गौळीयांचे घरी गाई अंगे वळी। द्वारपाळ बळीद्वारीं झाला।।
यंकोबाचे ऋण फेडी हृषीकेशी। आंबऋषीचे सोशी गर्भवास।।
मिराबाई साटीं घेतो विषप्याला। दामाजीचा जाला पाडेवार।।
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची। हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी।।
पुंडलिकासाटीं अझूनि तिष्ठत। तुका म्हणे मात धन्य याची।।
              पांडुरंग हा पतितपावन आहे .... लहान थोर , भलते याती, नारी नर , त्यामध्ये अगदी चांडाळ व वेश्याही अधिकारी ठरवल्या आणि ही मोठी सामाजिक क्रांती या वारकरी संतांनी केली .  वारकरी म्हणजे  नुसते हातात टाळ , पताका घेऊन पायी जाणारे पर्यटक नाहीत तर ते "' आले आले रे हरीचे डिंगर ... वीर वारीकर पंढरीचे"  असे नामदेवराय उत्साहाने म्हणतात. हे संत जसे वारकरी आहेत तसेच सामाजिक क्रांतिकारक सुद्धा आहेत. " नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जागी ।।"  ना म ।। ही  त्यांची प्रतिज्ञा आहे . कर्मकांडाकडे आणि अंधश्रद्धेकडे जाणारा समाज थोपविला हे वारीचे फार मोठे फलित आहे .
                     संत श्री नामदेवरायानंतर शंभर वर्षांनी (सन. १४५०) एकनाथांचे पणजोबा भानुदासांनीही वारीची परंपरा कायम ठेवली आणि त्याच्या पुढे संत श्री एकनाथ महाराजांनी क्षीण होत चालली ही चळवळ पुन्हा जागृत केली . त्यांच्या काळात सुलतानी संकट तीव्र होऊ लागले व माय मराठीवर उर्दू , फारशी भाषेचेही आक्रमण होऊ लागले . नाथ बाबांनी भारूड,. अभंग रचना , भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, असे वेगवेगळे ग्रंथ लिहून माय मराठी सुद्धा समृद्ध केली आणि या चळवळीला जणू  काही पुनर्जीवित केले असे म्हटले तर वावगे ठरू नये . सामाजिक समतेची ही वारी बहरू लागली .
                           नाथ बाबानंतर नऊ वर्षांनी अवतरित झालेले जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांनी तर या भागवत धर्म मंदिरावर कळस चढविला . अशी काही अभंग रचना केली की त्यावेळच्या प्रस्थापितांनी सुद्धा तोंडात बोटे घातली . " वेदाचा तो अर्थ अम्हासीच                         ठावा | येरांनी वाहवा भर माथा ।।"  कर्मकांडाला व धर्ममार्तंडांना हादरा दिला . व निक्षून सांगितले की " पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ।। " म्हणून होय होय वारकरी । पाहे पाहे रे पांढरी ।। १।। काय करावी साधने । फळ अवघेचि येणे ।। " आणि वारीची महिमा जनसामन्यापर्यंत पोहोचविला एवढेच नव्हे तर छत्रपती शिवराय यांनाही धारकरी पुरविण्याचे काम तुकाराम महाराजांनीं केले व छत्रपती शिवराय घडविण्याचे श्रेय जसे आईसाहेब जिजाऊंना जाते तसे तुकाराम महाराज व पूर्वोत्तर संतपरंपरेला जाते .
                           तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी वारीची परंपरा चालू ठेवली पण थोडा बदल केला त्यांनी इ स. १६८५ साली पालखी सुरू केली व त्यामध्ये तुकोबारायांच्या पादुका ठेवून दिंडी सुरू केली .त्यानंतर अनेक  संतांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या स्थानापासून निघून पंढरीला येऊ लागल्या .  नंतर नारायण महाराजांनी एकाच पालखीत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबाराय यांच्या दोघांच्या पादुका ठेऊन दिंडी काढू लागले ही प्रथा बऱ्याच कालावधीपर्यंत चालू होती पूढे काही मतभेद झाले आणि संत श्री हैबत बाबा यांनी माऊलीची पालखी वेगळी सुरू केली . तेव्हापासून माऊलीचा हा सोहळा आळंदी ते पंढरपूर असा सुरू झाला आणि तुकाराम महाराजांचा रथ देहू ते पंढरपूर असा सुरू झाला . आज लाखो लोक या सोहळ्यात असतात ही वारकऱ्यांची महान परंपरा आहे त्यांनी केलेले योगदान फार मोठे आहे .
                               परिवर्तनशीलता हा जगाचा नियम आहे आणि कालमानानुसार बदल आपणही स्वीकारले पाहिजेत यात शंका नाही . पूर्वी वीज नसायची तेव्हा रॉकेलच्या टेम्भे असायचे व त्याच्या प्रकाशात कीर्तन करावे लागायचे मी स्वतः: १९७६ मध्ये याच रॉकेलच्या टेम्भ्यात कीर्तन केले होते. पण आता वीज आहे तर त्याचा वापर केला पाहिजे , लाऊड स्पीकरच्या वापर केला पाहिजे . पण काही फडावर मात्र अजूनही लाऊड स्पीकरच्या वापर करीत नाहीत . आता आधुनिक काळात वारीचे स्वरूपही आधुनिक झाले  आहे , त्याचे माध्यमही बदलले आहेत." पंढरीची वारी "हा चित्रपट घरोघर टी व्ही मुळे  पोहचला  व लोकांना वारीची दृश्य दिसू लागली व उत्सुकता निर्मांण झाली . आता या सोहळ्यामध्ये जर आपण गेलात तर आपणास आकाशाकडे  तोंड केलेल्या 'ओबी व्हॅन्स' काही सेकंदात त्यांना 'ऑन एअर' करतायत. व सोहळा तात्काळ घरोघर पोहचवतात ,  लोकांमध्ये भक्ती भाव दाटून येतो . जमाना माध्यमांचा आहे , गळ्यात कॅमरा अडकवून फोटोग्राफर  वारीचे ,. त्यातील मनोहर प्रसंगाचे विविध फोटो काढण्यात मग्न असतात . त्यांच्याही कपाळावर गंध दिसतो तेव्हा मात्र मजा वाटते. व हेच फोटोग्राफर वारीतील फोटो व्हाट्सअपवर , फेसबुकवर ताबडतोब अपलोड करतात व क्षणात वारीचा आनंद ऑनलाईन जगभर पोहचवतात . बरेचसे लोक पायी वारीला जातात पण ज्यांना पायी जायला जमत नाही त्यांना " फेसबुक दिंडीमध्ये " सामील होता येते व घाबरल्या दिंडीचा आनंद घेता येतो फेसबुकवर असे अनेक पेज सध्या सुरू झाले आहे . " माउली -आपली वारी जगात भारी " या नावाचे एक पेज आहे त्यामध्ये वारीच्या बातम्या, वारीचे फोटो, व्हिडीओ सर्व काही बघायला मिळते . असंख्या पत्रकार या वारीत सहभागी होतात व शोध पत्रकारिता सुद्धा करतात. एम बी ए चे विद्यार्थी येथे येतात व म्यानेजमेंटचा अभ्यास करतात लाखो लोकांचे नियोजन कसे करतात. ? त्यामध्ये रोजचा स्वयंपाक , गाड्यांचे नियोजन , दिंडीचे नियोजन ,  टाळकरी , तुळशीवृंदावन घेऊन जाणाऱ्या महिला, झेंडेकरी, चोपदार, रथ, रथाच्या पुढे कोण, मागे कोण, दिंडीमध्ये म्हणावयाचे अभंग ठरलेले असतात काहीही म्हणून चालत नाही, काकडा , हरिपाठ त्या त्या वेळीच व्हायला पाहिजे वर्गणीचा (भिशीचा ) हिशेब हा सर्व अभ्यासाचा विषय आहे . या विषयवार काहींनी पी एच डी सुद्धा केलेली असते. वारीचे कव्हरेज करता यावे म्हणून कोणतेही माध्यम मागे नाही दूरदर्शनवरील बहुतेक बातम्यांचे चॅनल व इतरही चॅनल वारी कव्हर करतांना दिसतात . वारकऱ्यांच्या मुलाखती , भारुडे, पुढाऱ्यांनी खेळलेली फुगडी हे सर्व लाईव्ह दाखवतात. विशेष म्हणजे कोणतेही नेते या वारीत सहभागी व्हायचे सोडीत नाहीत कारण जेथे गर्दी तेथे हे नेते न बोलविता सुद्धा जातात व चमकून घेतात. प्रिंट मीडिया सुद्धा वारीच्या बातम्या व फोटो आपल्या वृत्तपत्रामध्ये सर्वात आधी कशा छापता येतील ते पाहतात त्यासाठी स्पेशल बातमीदार, फोटोग्राफर नेमले जातात . आकाशवाणीवर सुद्धा वारीचे वर्णन लाईव्ह टेलिकास्ट असते .पाठीवर स्याग अडकवून आपल्या भारतीय मित्रांसोबत परदेशी अभ्यासक , फोटोग्राफरही वारीत सहभागी होतांना दिसतात. त्यांच्या बरोबर " सेल्फी " काढून घेणारे वारकरी सुद्धा दिसतात .  त्यामुळे वारी आता एक सोहळा तर आहेच पण त्यापेक्षा तो एक " इव्हेंट " झालेला दिसतो . अर्थात हा बदल स्वागतार्ह आहेच यात वाद नाही पण ! त्यात श्रद्धेचा भाग किती असतो हे सांगता येत  नाही . वारकऱ्यांची आचारसंहिता किती लोक पाळीत असतील , कीर्तन ,प्रवचन, ऐकून आपण वारकरी व्हाव असे किती लोकांना वाटत असेल हे सांगता येत नाही . काही लोक चला बुवा तेवढेच पर्यटन, थोडा बदल, व्यायाम,. कुतूहल यापोटी सुद्धा येणारे असतात., असो तरी सुद्धा आधुनिक वारीचं सुस्वरूप हे डिजिटल झालेले आहे ते आता  वाढत जाणार आणि आपण त्याच्या स्वागताला तयार असले पाहिजे कारण " कालाय तस्मै नमः ।।" 

  - भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले                                  (माझा म . टा . मधील दिनांक ३-७-२०१६ चा लेख )