शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

विचाराचे चिरंतनत्व

                                 

                              
        विचाराचे चिरंतनत्व

          माणसाला एक गोष्ट कळली पाहिजे ते म्हणजे "त्याला कळत नाही हे त्याला कळले पाहिजे." पण !काय करावे त्याला हेच कळत नाही कि त्याला कळत नाही . नाकळे ते कळे कळे ते नाकळे ।वळे ते नावळे गुरुविण ।। ए. म. हरिपाठ ।। जगत मिथ्या असूनही सत्य वाटते व परमात्मा सत्य असूनही तो सत्य वाटत नाही . जसे जगात एक आंधळा असा आहे कि त्याला जगत दिसत नाही फक्त परमात्मा दिसतो, व दुसरा एक आंधळा आहे ज्याला देव न दिसता जगत दिसते आणि ते सत्य वाटते. " सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे । वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे । कवणा मी शरण जाऊ दृष्टी देई जो निर्मळ ।।.... येथे दृष्टी सुर्ष्टीवाद आहे म्हणजे दृष्टीकाली सृष्टी . ईशसृष्टी आणि जीव सृष्टी असाही एक सुंदर विचार पंचदशीमध्ये आला आहे. असो जगात विचार हा खूप महत्वाचा भाग आहे . विचारला कोणीही नष्ट करू शकत नाही हेही तितकेच खरे आहे. कार्ल मार्क्सने कम्युनिझम सांगितला " दास कॅपिटल" नावाचा ग्रंथ लिहला त्याचा एवढा परिणाम झाला कि संपूर्ण रशिया, चीन हे कम्युनिष्ट झाले म्हणून विचार हि चिरंतन राहणारी बाब आहे. महाराष्ट्रात झालेले संत, विचारवंत त्यांच्या विचाराने समाजात एक वेगळी जागृती आणली . संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज , संत नामदेव महाराज अगदी संत निळोबाराय आदी संत व आधुनिक कालावधीमध्ये झालेले संत महंत यांनी समजला एक विचार दिला व वराकारी परंपरा अबाधित राहिली कर्मठपणाला या परंपरेत स्थान नाही " चंद्रभागे स्नान । विधी तो हरिकथा ।।" असा सुंदर विधी पंढरीचा आहे , कर्माची कटकट नाही, सोवळे ओवळेपणाचे अवडंबर नाही .
           असा एखदा क्रांतिकारी विचार आला  कि मग मात्र कर्मठ प्रस्थापितांना मात्र हे सहन होत नाही मग अशा विचारवंताना हे लोक विरोध करतात तो विरोध नाना प्रकारचा असतो कधी निंदा करून, कधी प्रलोभन दाखवून, कधी चारित्य्रावर संशय घेऊन, आणि कशानेही जमले नाही कि मग ते त्या विचारवंताला या जगातूनच नाहीसे करतात.
           ग्रीस देशातील महान तत्वेता सॉक्रेटिस , वै . ह.भ.प श्री मामा (सोनोपंत) दांडेकर या सॉक्रेटिसची तुलना आपल्या जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि संत श्री कबीर महाराज यांच्याबरोबर करायचे . या सॉक्रेटिसने आत्म्याचे अमरत्व सांगितले आणि अंधश्रद्धेवर आघात केले.सॉक्रेटिस हा एक थोर शिक्षक गणला जातो. त्याची शिक्षणपद्धत ही वेगळीच होती व तो प्रश्न विचारत-विचारत शिकवे व लोकांकडून उत्तरे मिळवे. "ex duco" चा अर्थ "lead out" होतो जो "education" ह्या शब्दाचा गाभा आहे. उत्तरे "मिळवणे" हे "lead out" किंवा त्यातूनच मार्ग दाखवणे अशा अर्थाने पाहिले तर अशा शिक्षणपद्धतीचे महत्त्व पटते.  पण त्यांचे विचार व आचार तत्कालीन प्रस्थापित कर्मठ लोकांना पटले नाही त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण सॉक्रेटिसने त्यांना दाद दिली नाही. शेवटी त्यांच्यावर खटला  भरला व त्यावेळी कोर्टात न्यायाधीशाने त्यांना विचारले ," सॉक्रेटिस ! तुम्ही म्हणता कि मला जे कळले ते कोणाला कळले नाही , तुम्हाला काय कळले कि जे इतरांना कळले नाही ? तेव्हा सॉक्रेटिसने सांगितले कि " महोदय ! मला जे कळले आहे ते या लोकांना कळले नाही , तुम्ही म्हणता तुम्हाला काय कळले , तर महाराज ! मला कळत नाही हे मला कळले आहे आणि हेच या लोकांना कळले नाही . अज्ञानाचे ज्ञान याना नाही मला माझ्या अज्ञानाचे ज्ञान झाले आहे . " एवढ्या मोठया तत्ववेत्याला शेवटी देहांताची शिक्षा देण्यात आली . त्यांना हिरकणी खाऊ घालून मारण्यात आले पण त्यांच्या विचारांना ते मारू शकले नाही उलट त्यांचे शिष्य प्लेटो व ऍरिस्टॉटल त्यांनी सॉक्रेटिसची ही प्रश्नावली लिहून ठेवल्यामुळेच ती आज जगाला माहीत आहे असे समजले जाते. त्यांचे विचार पुढे जास्त प्रमाणात प्रसार पावले . तत्ववेता संपवला पण त्याचे तत्वज्ञान मात्र संपवू शकले नाही.  याचप्रमाणे येशू ख्रिस्त , सेंट जोन्स , अशा अनेक विचारवंतांना प्रस्थापितांनी संपवले पण त्यांचे विचार संपवू शकले नाही कारण विचार हे चिरंतन असतात एवढेच मला सांगायचे आहे .
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी(पा)
मो. ९४२२२२०६०३
       

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

।। वाचावी ज्ञानेश्वरी ।।


                                                    ।। वाचावी ज्ञानेश्वरी ।।
             जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते.आणि त्यांना "फादर ऑफ ड्रामा" असेही म्हटले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात. विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म इंग्लंड देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन या गावात इ.स. १५६४ साली झाला. समजा तुम्ही जर पर्यटनासाठी इंगलंडमध्ये गेलात आणि तेथील जाणकार माणसाची भेट झाली आणि तुम्ही जर त्याला सांगितले कि इंग्लडमध्ये बराच फिरलो आणि अमुक बघितले तमुक बघितले " त्यानंतर तो समोरचा माणूस तुम्हाला विचारतो कि " तुम्ही सगळा इंग्लंड फिरून बघितला पण काहो ! तुम्ही आमच्या देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन या गावात गेला होता का ? ते आमच्या शेक्सपियरचे जन्मस्थान आहे " आपण जर ते बघितले नाही म्हणून सांगितले तर तो माणूस म्हणतो मग तुम्ही काहीच बघितले नाही . असो हे सांगण्याचे तात्पर्य त्या लोकांना त्याच्या एका नाटककाराचे किती अप्रूप वाटते . मित्रानो ! जगामध्ये कुठेही तुम्ही जा तुम्हाला मंदिरासाठी खांब दिसतील पण अहमदनगर जिल्यातील नेवासा हे असे एकमेव गाव आहे येथे फक्त खांबासाठी मंदिर आहे.  जगात  अनेक भाषेत जिची भाषांतरे झाली आहेत अशी ज्ञानेश्वरी या खांबाला टेकून माउली ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरील टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी सांगितली आणि सदचिदानंद बाबा यांनी ती लाऊन घेतली . शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ।।ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय ओवी क्र. १८१० माउलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने भगवद गीतेवर मराठीत भाष्य केले , देशीकार लेणे केले . "माझा मऱ्हाटीचा बोलू कौतुके । परी अमृताते पैजा जिंके ।ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।। (ज्ञाने - ६.१४)  माउलींनी ग्रंथ सांगितला व सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला . ग्रंथ लेखन गोदावरी तटी नेवासे क्षेत्री झाले . आपणही हा विचार केला पाहिजे कि "जर तुम्ही महाराष्ट्रात आलात आणि नेवाशाला जाऊन माउलीचे मंदिर बघतिलेले नाही तर तुम्ही काही बघतिलेले नाही ."
            ग्रंथ निर्मितीची माहिती , लेखक, ठिकाण , साल, तत्कालीन राजा यांची नोंद ग्रंथाच्या शेवटी माउलींनी केली आहे. पण यात तिथीचा उल्लेख नाही . आणि असा अलौकिक ग्रंथ जिथे तयार झाला त्या ठिकाणाविषयी आपल्याल स्वाभिमान नसावा का ? इंग्लडच्या लोकांना त्यांच्या एका साहित्यिकाचा जाज्वल्य स्वाभिमान आहे किंबहुना जर त्या शेक्सपिअरच्या गावाला भेट दिली नसेल तर काही अर्थ नाही असे त्यांना वाटते आम्हाला जिथे ज्ञानेश्वरी तयार झाली त्या नेवाशाविषयी माहितीही नसावी ? खरे तर येथे संतपीठ होणे आवश्यक आहे . बहुजन समाजाला संस्कृत समजत नव्हती आणि तळागाळातील लोकांपर्यंत हे गीतेचे ज्ञान गेले पाहिजे त्याकरिता माउलीला करुणा निर्माण झाली आणि त्या करुणेपोटी ज्ञानेश्वरी निर्माण झाली आणि मऱ्हाठी  भाषेत लिहली गेली , " तो शांतूची अभिनवेल । ते परियसा मऱ्हाठी बोल । जे समुद्राहूनी खोल अर्थभरित ।।"किंवा तेथ साहित्य आणि शांती । हि रेखा दिसे बोलती । जैसी लावण्या गुण कुलवंती । आणि पतिव्रता ।। " मर्हाठीचे हरवलेले वैभव ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा मिळवून दिले . वेदांताची प्रस्थान त्रयी म्हणजे " गीता, दशोपनिषदें , ब्रहमसूत्र " त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाची सुध्हा प्रस्थान त्रयी आहे ती म्हणजे " ज्ञानेश्वरी , एकनाथी भागवत,व तुकाराम महाराजांचा गाथा." ज्ञानेश्वरीचे लाखो पारायणे झाली पण त्यातील गोडी यत्किंचितही कमी झाली नाही . ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रकारे साहित्य विश्वातील हि एक क्रांतीच केली म्हणावे लागेल. वेदातील तत्वज्ञान गीतेमध्ये आले आणि गीतेतील तत्वज्ञान मराठीत ज्ञानेश्वरीत आले हि मोठी क्रांती झाली. किंबहुना माउलींनी वेदातील उणेपणा सुद्धा काढला , " वेदु कृपण जाहला । जे कानी त्रिवर्गाचे लागला । स्त्री शूद्रासी अबोला ।अद्यापि ठेला ।।" वेदातील हे उणेपण ज्ञानेश्वरीच्या रूपाने भरून निघाले .  "पसायदानासारखा मराठीतील शांतिपाठ माउलींनी एकूणच सर्व विश्वाला अर्पण केला. "ओवी ज्ञानेशाची।  सुश्लोक वामनाचा ! आर्या मयुरपंतांची ! अभंग वाणी तुकयाचा ! " असाही गौरव या मराठी कवींचा केलेला आहे . ज्ञानेश्वरीचे महत्व विशद करतांना संत जनाबाई म्हणतात ," वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पाहावी पंढरी ।।१।। ज्ञान होय अज्ञानासी । ऐसा वर त्या टीकेसी ।।२।। ज्ञान हो मूढा । मूर्ख अति त्या दगडा ।।३।।वाचली जो कोणी । जणी त्यासी लोटांगणी ।। " ती ज्ञानेश्वरी कशी वाचावी हे संत एकनाथ महाराज सांगतात ," भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ।।१।।स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णू । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी ।।२।।" तात्पर्य भावनेने , श्रद्धेने हे ज्ञानेश्वरी जर आपण अभ्यासली तर ब्रहमज्ञान सहज होऊ शकते.
            एकनाथ महाराजांनी ग्रंथ शुध्द् केला अर्थात आजच्या भाषेत ग्रंथाचे संपादन केले . या ग्रंथशुद्धीची तिथी व साल दोन्हीची नोंद नाथ महाराजांनी केली आहे . ही तिथी आहे भाद्रपद वद्य षष्ठी .  ग्रंथ निर्मितीची तिथी उपलब्ध नसल्याने याच तिथीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी केली जाते.  बहुकाळ पर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी । प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाठी संपूर्ण जाहली ।। संत एकनाथ महाराजांनी केलेला ग्रंथशुद्धीच्या(संपादन)  तिथीचा निर्देश. म्हणून याच दिवशी ज्ञानेश्वरीची जयंती मानण्याची वारकऱ्यांची परंपरा आहे.
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी (पा) ता. नगर
मो. ९४२२२२०६०३



मंगळवार, ११ जुलै, २०१७

परपीडक तो आम्हा दावेदार

                                        
परपीडक तो आम्हा दावेदार
      दुर्जनाची जाती । त्याचे तोंडी पडे माती ।। त्याची बुद्धी त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ।। ... खळ दुर्जनाची जातीचं अशी असते कि तिला चांगले वाईट लोक काही काळत नसते. तो दोष दृष्टीने सगळीकडे पाहतो आणि काहीही बडबडतो.  कडू वृंदावन गुळाने माखले तरी ते गोड होईल काय ? काळे जिरे पांढरे होईल काय ?" तैसी अधमाची जाती अधम । उपदेश करावा श्रम तो ।।" विचंवाचे अंग कुरवाळले म्हणजे त्याचा स्वभाव जाईल का ? तो नांगी मारून आपला रंग दाखवल्याशिवाय राहणार नाही . त्याच्या तो जातीं स्वभावच आहे . महाराजांनी एका अभंगात फार छान सांगितले " देव्हाऱ्यावरी विंचू आला । देवपूजा नावडे त्याला । तेथे पैंजऱ्याचे काम । अधमा तो अधम ।। घराची रुसली दासी । धनी समजावी तिसी । तेथे बटिकीचे काम । अधमा तो अधम ।। पाया झाला नारू । त्यासी बांधिला कपूरु । तेथे बिबव्याचें काम । अधमा तो अधम ।। " कडू निंबाच्या झाडाला साखरेचे आळे केले तरी त्याच्या निंबोळ्या कधीही गोड होत नाहीत . "तैसे अधर्माचे अमंगळ चित्त । वामन ते हित  करून सांडी ।।"  खापरा परिस काय करी ।। डुकराच्या कपाळावर केशर लावून काय उपयोग ?
       जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी मेघवृष्टीने उपदेश केला म्हणून काय तो सगळयांना रुचला काय ? सात्विक वृत्तीच्या लोकांना ते पटले पण अधमांना मात्र ते रुचले नाही .. जे जातिवंत दुष्ट आहेत त्यांना तुम्ही कितीही सांगा काही उपयोग होत नाही . दया शांती , क्षमा हे फार महान गुण आहेत पण दुर्जनाला त्याचा काहीही उपयोग होत नाही . उलट तो त्याची टर उडवितो . म्हणून त्याला त्याच्याच भाषेत सांगावे लागते. 'लातो के भूत बातोसे नाही मानते '." किती उपदेश करावा खळाशी ।नावडे तयासी बरे काही । शुद्ध हे वासना नाही चांडाळाची ।होळी आयुष्याची केली तेणे ।।" हे चांडाळ स्वात:च्या आयुष्याची होळी करून थांबत नाहीत तर ते दुसऱ्याच्या पण आयष्याची होळी करतात. ह्या असल्या दुष्ट लोकांना क्षमा दाखवणे म्हणजे सज्जनांना छळण्याचा त्यांना परवाना दिल्यासारखा आहे. विंचवाची नांगी ठेचायची असते हा धर्मच आहे . 'दया तिचे नाव भुतांचे पाळणं । आणिक दंडन कंटकाचे ।।' दया म्हणजे सर्व सामन्याचे पालन करणे आणि दुष्टाला शिक्षा करणे हि दयाच आहे .
        हे एवढे कशासाठी लिहतोय ! चार दोन दिवस झाले कि पेपरला,टी व्ही वर बातम्या झळकतात ' भारत पाकिस्तान कुरबुरीत भारतचे पाच शाहिद झाले आणि त्यांचा एका सैनिकाला कंठस्नान घातले. अतिरेकी हल्ला करून पळून जाण्यात सफल झाले . आत्ता काल अमरनाथ यात्रेकरूंवर भ्याड हल्ला झाला त्यात महाराष्ट्राचे दोन जण आहेत. अरे ! आमचे हिंदूंचे पवित्र स्थान तिथे जाऊ न देण्याची हि प्रवृत्ती कोणती म्हणायची? बरे ते स्थान भारतातच आहे .... मानसरोवर - रस्ताच बंद करून टाकला  तेथेही जाता येत नाही . आपण जर तेथे गेलो नाही तर आपली ती वाट मोडून जाईन आणि आपले एक देवस्थान तिथे होते याची पुढच्या पिढीला आठवण सुद्धा येणार नाही. आणि त्यांना तेच अपेक्षित आहे.म्हणून त्यांनी हा मार्ग शोधला आहे. बरे ! अनेक वेळा हेच चालले आहे . सीमा सुरक्षित नसल्या तर नीट झोप तरी येईल काय ? काश्मीरमध्ये सैनिकांवर नागरिक दगडफेक करतात तेव्हा सैनिकाला काही करता येत नाही ... काय हि अगतिकता ? चर्चा करा वाटेल त्या मार्गाने काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होणे आवश्यकच आहे. अतिरेकी हा कोणत्याही एका धर्माचा असत नाही पण अतिरेकी मात्र जेव्हा त्याला जिहाद नाव देतात तेव्हा विचारच करावा वाटतो . आता कालच्या हल्ल्यात एक 'संदीप शर्मा ' नावाचा हिंदू अतिरेकी निघालाय . आणि सलीम शेख नावाचा ड्रायव्हर याने पन्नास जणांचे प्राण वाचवले . त्याला मी सलाम करतो व धन्यवाद देतो . काय म्हणावे याला दुष्टाला जात नसते हेच खरे . पण तो कोणीही असो तो  ठेचलाच पाहिजे हेही तितकेच खरे आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आड येणारे स्वकीय सुद्धा सोडले नाही . तुकोबाराय म्हणतात ' परपीडक तो आम्हा दावेदार । विश्वी विश्वंभर म्हणऊनि ।। दंडु त्यागु बळे नावलोकू डोळा । राखू तो चांडाळा ऐसा दुरी ।। अनाचार काही न साहे अवगुणे ।बहू होय मन कासावीस ।।तुका म्हणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळी चित्ते ।। ' विश्व् हे परमात्स्वरूप आहे सर्वत्र एक ईश्वरच आहे तर मग दुसऱ्याला त्रास देणारा हा ईश्वरालाच त्रास देतो असे म्हणावे लागते .म्हणून असा हा चांडाळ , दुष्ट,. दुर्जन आमचा दावेदार आहे आम्ही त्याला दंडन केल्याशिवाय राहणार नाही . संतांनी सुद्धा  समाजात शांतता नांदावी असे वाटत असेल तर काय केले पाहिजे हे स्पष्ट सांगितले आहे . ' दुर्जनांचा मान । सुखे करावा खंडन ।। लात हाणोनिया वरी । गुंड वाट शुद्ध करी ।। बहुता पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ।। तुका म्हणे नखे । काढून टाकीजेते सुखे ।।' याप्रमाणे गुंड , दुष्ट यांना योग्य वेळी शिक्षा केलीच पाहिजे . तेथे लवचिक धोरण काही कामाचे नाही . भारताच्या कोणत्याही बाजूने घुसखोरी होऊ शकते कोणाला काही भय राहिले नाही सीमा पोखरून निघाल्यात कधी नव्हे तो चीन सुद्धा धमकी देतो . पाकिस्तान अणू बॉम्बची धमकी देतोय . काय चाललय ? चिनी वस्तूंनी सर्व बाजारपणे काबीज केली आहे . ते एक प्रकारचे छुपे युद्ध आहे . देशात अराजक मजल्यासारखे वातावरण झाले आहे . शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत . कर्जमाफी घोषणा फसवी ठरत आहे ... निसर्ग सुद्धा कोपला आहे काही ठिकाणी अतोनात पाऊस आहे तर काही ठकाणी दुबार पेरणीचे संकट उभे आहे . सर्व बाजूनी जनता भरडून निघत आहे यावर आता राज्यकर्त्यांना ईश्वरच सुबुद्धी देवो हीच अपेक्षा . कारण" राजा कालस्य कारणं ।।"

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले

        
      

सोमवार, १९ जून, २०१७

   ।। होय होय वारकरी ।।
जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी सांगितले आहे कि पंढरी बघायची असेल तर तुला वारकरीच व्हावे लागेल . कारण पंढरीचा महिमा असा आहे कि तो वारकरी झाल्याशिवाय कळत नाही त्यासाठी वारकरी व्हावे लागेल " होय होय व वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।। " वारकरी होऊन वारीत सामील होण्याबाबत कोणाची काही तक्रार असण्याचे कारण नाही ..... काल -परवा कोणी धारकरी माऊलीच्या पालखीच्या पुढे तलवारी वगैरे घेऊन आले कदाचित ते त्यांची कला सादर करीत असतील ...पण वारीचे काही नियम असतात. पालखीच्या मार्गावरील काही पद्धती असतात. ते नियम पाळायला काय हरकत आहे . गर्दी दिसली कि घे आपली पोळी भाजून ! अहो निळोबारायानंतर संत झाले नाही का ? पण त्याचे सुद्धा अभंग काव्य प्रमाण धरले जात नाही , हा दंडक आहे आणि तो पळाला पाहिजे . छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येत तेव्हा ते त्यांचा लवाजमा बाजूला ठेवून येत . तुम्ही तुमचे वारकरी संप्रदायात घुसडयाचे काही कारण नाही . उद्या कोणीही उठेल आणि दिंडीमध्ये सामील होऊन आम्हाला आमची कला सादर करायची म्हणेल तर ते चालणार नाही . " हाती टाळ दिंडी घेऊनि नाचा ।।" असा आदेश संतांचा आहे तलवारी नव्हे !! तलवारीचे क्षेत्र वेगळे आहे . वारीत सरमिसळ कशासाठी ? प्रत्येकाला आपण व्यक्त व्हावे वाटते. पण त्याला मार्ग भिन्न आहेत. काही कर्मठ वारकऱ्यांमध्ये घुसले आहेत आणि नको त्या पद्धती सुरु करीत असतील तर त्या तिथेच रोखल्याही पाहिजेत. वारकरी संप्रदायाची संप्रदायाची आचारसंहिता आहे.
लोकमान्य टिळक आणि ह भ प श्री जोग महाराज हे मित्र होते , ते दोघे एकदा पंढरपूरला गेले व पांडुरंगाच्या दर्शनाची एक विशिष्ट पद्धत आहे . अगोदर श्री चोखोबार्यांचे समाधीचे दर्शन , नंतर श्री नामदेव पायरीचे दर्शन त्यानंतर आत गेल्यावर गरुड खांबाचे दर्शन व पुढे मग पांडुरंगाचे दर्शन व याप्रमाणे दोघांनी दर्शन झाल्यावर गाभाऱ्यात आले व जोग महाराजांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे दोन्ही हातानी आपले कान धरून उडी मारली ... व टिळकांना पण म्हणाले कि " येथे आपले कां धरून उडी मारावी लागते " तर टिळक म्हणाले " मी इंग्रज सरकारचे कान धरतो , माझे नाही ". जोग महाराज म्हणाले "इंग्रजांचे कान धरण्यासाठी बळ हवे असेल तर अगोदर पांडुरंगासमोर आपले कान धरावे लागतील " टिळकांनी लगेच स्वतः:चे कां धरले आणि उडी मारली . तात्पर्य वारकरी संप्रदायाचे नियम हे सगळ्यांनी पाळायचे असतात. व ती शिस्त पालन करून घेण्याची जबाबदारी चोपदारांची असते म्हणून त्यांनी जर आपल्याला तसे सांगितले तर त्यांचा राग यायचे काही कारण नाही . ज्याच्या त्याच्या क्षेत्राचे ज्याचे त्यालाच माहित असते. दिंडी सोहळा म्हणजे काही फुटकळ उत्सव नाही त्याला एक शिस्त आहे.
एकदा दिंडी प्रस्थानाचे वेळी काही दिंडी चालकांमध्ये मतभेद झाले व पोलीस फोर्स बोलवावा लागला पण लोक काही ऐकेनात तेव्हा ह भ प मामा दांडेकर होते एस पी मामांना म्हणाले " मामा आता यांच्यावर लाठी चार्ज करता येणार नाही व यांना आवरताही येत नाही काय करावे काही कळत नाही " मामा म्हणाले " साहेब तुम्ही काही काळजी करू नका ... आमच्या वारकऱ्यांना शिस्त आहे ते कोणाचे ऐकणार नाहीत पण माऊलीच्या सेवकाचे नक्की ऐकणार ." आणि मामांनी चोपदाराला कल्पना दिली , काय सांगावे ! चोपदाराने रथावर जाऊन एक ललकारी दिली आणि त्याच्या हातातील दंड उंच धरला , काही क्षणात सर्व वारकरी समाज एकदम शांत झाला व चोपदार काय सांगतो हे कां टवकारून ऐकू लागला . तात्पर्य हि आहे वारकरी संप्रदायाची शिस्त . हि मोडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये आणि आपले काही नवीन मांडण्याच्या भानगडीत पडू नये . तो वारकऱ्यांचा अपमान ठरेल . ह भ प राजाभाऊ चोपदार माउलीचे चोपदार त्यांच्या शिस्तीचे सर्वांनी आदराने पालन करावे त्यांना तो अधिकार आहे . राजाभाऊ तसे वैक्तिक जीवनात खरेच खूप नम्र आहेत. हजारो वारकरी त्यांना आदराने ओळखतात. तेव्हा त्यांच्या कृतीचे मी समर्थन करतो . रामकृष्ण हरी ।
हि पोस्ट कुठल्याही अभिनिवेशाने लिहली नाही नि:पक्षपातीपणाने लिहली आहे तेव्हा कोणी उगीच ओढाताण करू नये आणि विषयांतर करण्याचे प्रयत्न करू नये . मी त्याला किंमत देणार नाही याचे नोंद घ्यावी
अशोकानंद महाराज कर्डीले

मंगळवार, १४ मार्च, २०१७

धन्य म्हणवीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।।


जय हरी !
धन्य म्हणवीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।।
वारकरी संप्रदायातील भागवत धर्म मंदिराचे कळस असणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा आज निर्याण दिवस म्हणजेच " बीजोत्सव". ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस ।। असे तुकाराम महाराजांची शिष्या  संत बहिणाबाई पाठक यांनी म्हटले आहे. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहितांना श्रीमद भगवद गीतेचा आधार होता ," पदाची कोर न सांडी ।।" हि त्यांना मर्यादा होती , भगवंताचे मनोगत सांगायचे होते. तसे तुकोबारायांना गाथा लिहितांना बंधन नव्हते त्यामुळे गाथ्यामध्ये सर्व विषय आलेले आहेत. व या स्वातंत्र्यामुळेच तुकोबाराय तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर परखडपणे बोलू शकले. नाही भीड भार । तुका म्हणे साना थोर ।।... सत्याचिये साठी नाही भीड भार । आप आणि पर दोन्ही नाही ।।  सत्य सांगण्याकरिता महाराजांनी कोणाचाही मुलाहिजा राखला नाही . वास्तविक पाहता तत्कालीन परिस्थती अत्यंत सनातनी व जातीभेद , वर्णभेद मानणारी होती . अशा प्रतिकूल काळात तुकाराम महाराजांचा अवतार झाला होता. महाराजांनी सनातनी व्यवस्थेविरुद्ध उघडपणे बंड पुकारले होते , ढोंगी महाराज , अभक्त ब्राहमण , फुटकळ दैवते, याविषयी महाराजांनी परखडपणे लिहले . म्हणून ते सर्वात श्रेष्ठ क्रांतिकारी संत ठरले . तसेच ते समाजाभिमुख समाजसेवक सुद्धा होते. देहू परिसरात बारा वर्षे दुष्काळ पडला अशा वेळी महाजांनी आपली धान्याची कोठारे जनतेसाठी खुली केली , सर्व धान्य वाटून टाकले . महाराज हे महाजनकीचा व्यवसाय सुद्धा करीत होते . त्यांनी ओळखले कि पाऊस नसल्यामुळे  गरीब लोक आता आपले व्याज सुद्धा देऊ शकणार नाहीत तेव्हा त्यांनी जेव्हढ्या कर्जाच्या वह्या होत्या त्या सर्व वह्या इंद्रायणीत बुडवून टाकल्या  लोकांना कर्जमुक्त केले , त्यांचा " सातबारा कोरा केला ". हा तुकाराम महाराजांचा आदर्श घेऊन हल्लीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे पण गेंड्याची कातडी असलेले सरकार त्यांच्याही लोकांचे व विरोधकांचे ऐकायला तयार नाही . तसेच तुकोबाराय उत्कृष्ट व्यापारी अर्थतज्ज्ञ होते. " याती शूद्र केला वैश्य केला व्यवसाव ।। " हे महाराजांनी स्वत:च म्हणून ठेवले आहे. ते उत्कृष्ट शेतकरी होते . " एका बीज केला नाश । मग भोगिले कणीस ।।" व अशाच शेतीवरील त्यांच्या अभंगावरून लक्षात येते.
         महाराजांनी वेद , पुराणादिकांचा अभ्यास देखील केला होता. " पाहिली पुराणे । धांडोळिली दर्शने ।। " अठरा पुराणे आणि षड दर्शने महाराजांनी अभ्यासली होती . त्यावेळी हे ग्रंथ भाषांतरित झालेले नव्हते ते सर्व संस्कृतमध्येच होते. म्हणजे महाराजांना संस्कृत उत्तम येत होते. शिवाय त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन देऊन अनुग्रह दिला होता. " माझ्या विठाबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु ।। किंवा पांडुरंगे सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धी भेद ।।" नामदेवराय व पांडुरंग हे साक्षात भेटले आणि कवित्व करायची आज्ञा केली . सखा कृपावंत वाचा त्याची म्हणून त्यांच्या मुखवटे अभंग वाणी बाहेर पडू लागली .... वेदाचा तो अर्थ अम्हासीच ठावा । येरांनी वाहवा भार माथा ।। खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाहे मजुरीचे ।। किंवा तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरी वेदांत वाहे पाणी ।। व एव्हढेच बोलून महाराज थांबले नाही तर त्यांनी वेदाचे मनोगत सुद्धा सांगितले " वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची साधिला  । विठाबासी शरण जावे । निजनिष्ठे नाम गावे ।। आम्ही नुसते वेदाचे पाठक नसून आम्हाला त्याचा यथार्थ अर्थ सुद्धा कळतो .... नेणती वेद श्रुती कोणी । आम्हा भविकावाचूनि ।। तुका म्हणे नाही श्रुती आतुडलें । आम्हा सापडले गीता गाता ।। किंवा शास्त्राचे जे सार वेदाची जो मूर्ती । तो माझा सांगाती प्राणसखा । म्हणुनी नाही अनिकाचा पांग ।। केव्हडा हा आत्मविश्वास आणि अनुभूती . आणि नेमके हेच तत्कालीन पंडित आणि पुरोहित वर्गाला सहन झाले नाही त्यांना विविध प्रकारे छळण्यास सुरवात झाली . पण महाराज त्यांच्या विरोधाला जुमानीत नव्हते उलट आणखी स्पष्ट लिहू लागले " न पढवे वेद नव्हे शास्त्र बोध । नामाचे प्रबंध पाठ करा ।।.... निगमाचे वन नको शोधू करू शीण ।। .... व्यर्थ भराभर पाठांतर काय कामाचे . घोडे काय ओझे वागवीत नाहीत ? पण त्यांना त्यातील काही कळते का ? म्हणून न लगे सांडणे मांडणे । अगं निगमाचे देखणे ।। न लगे पाहावे अबद्ध वाकडे । उच्चारावे कोडे नाम तुझे ।। .. आणि नाही वेळ नाही पंडिताचा धाक । होत का वाचक वेदवक्ते ।। न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएक भावे ।। धातू पोसोनिया आणिक उपदेश । अंतरितो   लेश प्रेम नाही ।। व ब्राहमण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी । पहा श्रुतीमधी विचारूनि ।। असे परखड विचार महाराजांनी मांडले . आणि ते या उच्चवर्णीयांना सहन झाले नाही मग त्यांनी नाना प्रकारे महाराजांना त्रास द्यायला सुरवात केली .  तितक्याच प्रमाणात त्यांना उत्तर दिले " सकळांसी येथे आहे अधिकार । कलियुगी उद्धार हरीच्या नामे ।। किंवा ब्राहमण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार । बाळे नारीनर अदीकरोनी वेश्याही ।। " परमार्थाच्या क्षेत्रात महाराजांनी मोठी जनजागृती केली . त्यामुळेच पुरोहित वर्ग नाराज झाला कारण त्यांचे पोट भरणे हे लोकांच्या अज्ञानात असते. त्यामुळे पंडित लोक खोडी काढू लागले. किंबहुना कोर्ट कचेरीमध्ये दावे दाखल झाले महाराजांना त्यांच्या अभंगाच्या वह्या बुडवायला आदेश दिले गेले. तेरा दिवस उपोषण केले व त्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत तरल्या ताशा त्या लोकगंगेतही तरल्या . पण मनस्ताप खूप झाला. गावचे लोकही त्यांचेच खाऊन त्यांच्या विरोधात गेले . " कोपला पाटील गावीचे हे लोक । आता मज भीक कोण घाली ।।" अशी भ्रांत पडली कारण धर्मसत्तेपुढे कोणाचेही चालत नव्हते ... साक्षात छत्रपति शिवाजी महाराजांना सुद्धा दोन वेळा राज्याभिषेक करावा लागला .
         चमत्कार व अंगात येणे अशा प्रकारांना महाराजांनी कधीच महत्व दिले नाही . अंगे भारोनिया वारे दया देती । तया भक्ता हाती चोट आहे।। मांत्रिक हा काळतोंड्या कुत्र्यासारखा आहे . वनात जाण्याची गरज नाही . कासया करावे तापाचे डोंगर ? रिद्धी सिद्धी यांचे दास आम्ही होणार नाही . भगवे कपडे घालून लोकांना भुलवयाचे काम आम्ही करणार नाही . उलट भगवे तरी श्वान । सहज वेष त्याचा ।। किंवा भिक्षापात्र अबलंबिणे । जालो जिणे लाजिरवाणे ।। भिक्षा मागून भगवे कपडे करून जगणे म्हणजे लाजिरवाणे आहे . स्वत: कष्ट न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणे हे चांगले नाही . परमार्थातील दांभिकपणावर महाराजांनी कोरडे ओढले.
           मोक्ष सुख हाणू लाता । भय नाही जन्म घेता ।। असे म्हणून त्यांनी मोक्षाचे स्वरूप काय आहे हे समजावून सांगितले . बंध  आणि मोक्ष या दोन्ही कल्पना आहेत. किंबहुना " रज्जू सर्पाकार । भासियले जगडंबर ।। " हा विवर्तवादातील सिद्धांत त्यांनी सांगितला . जगत मिथ्यत्व प्रतिपादन करून ब्रह्माचे सत्यत्व प्रतिपादन केले . सत्य तू सत्य तू सत्य विठ्ठला । का गा हा दाविला जगदाकार ।। , सत्य साच खरे । नाम विठोबाचे बरे ।। आणि एवढे असूनही भक्तिमार्गाचे महत्व अनन्यसाधारण आहे हेच सांगितले " भक्ती पंथ बहू सोपा । पुण्य नागवे पापा ।। भक्तीचा जिव्हाळा ज्याला आहे तोच मला आवडतो दुसरा कोण पंडित महाज्ञानी असला तरी त्याला मी मान्यता देत नाही. महाराजांनी परमार्थ सोपा करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवला . महाराजांचे हे कार्य पारमार्थिक क्षेत्रातील दिग्गजांना धक्का देणारी होती .
             " वैकुंठा जावया तापाचे सायास । करणे लागे जिवा नाश बहू ।। आणि म्हणून वैकुंठीचा देव आणिला भूतळा। धन्य तो आगळा पुंडलिक ।। वैकुंठादिक स्वर्ग सुख सुद्धा तुच्छ करून टाकली . नको वैकुंठीचा वास । तया सुखा आहे नाश ।। या न्यायाने त्यांनी जगत मिथ्यत्व अनुभूतीने जगालाही पटवून दिले . व आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहोत , स्वयंभू आहोत हेही ठणकावून सांगितले " तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइतें केले नव्हो ।।" तात्विक, उपदेशपर, करुणापर, वेदान्तापर,अशा विविध प्रकारची अभंग रचना केली आणि " पीडिता हे राष्ट्र देखोनि जग ।।" राष्ट्राची व जगाची पीडा बघवेना , प्रस्थापितांचा छळ , आणि देहीच विदेही भोगू दशा ।। हि महाराजांची प्रतिभ अनुभूती त्यामुळे शरीराचे तादात्म्य राहिले नाही . " झाला प्रेतरूप शरीराचा भाव ।।"... आता ह्या जगात राहू वाटेना आणि मी आता आपुल्या माहेराला जाईन .. मी कृतकृत्य झालो आहे. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो ।। अशी माझी स्थिती आहे. म्हणून " जातो आता आज्ञा घेऊनिया स्वामी । काळक्षेप आम्ही करू कोठे ।।आता मी जातो ..... मला शेवटचे चिन्ह दिसू लागले आहेत. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला । गरुडावर बैसोनि माझा कैवारी आला ।। .... आता माझे कर्तव्य संपले आहे ,माझ्या कीर्तनात लोकांना जो आनंद मिळेल तो कुठेही मिळणार नाही. " कडू स्वर्गवास करिन भोग ।।"स्वर्गादि सुखोपभोग सुद्धा माझ्या कीर्तनापुढे तुच्छ वाटतील . लोकही म्हणतील ," धन्य म्हणावीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।।",  देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ।। या नामदेव महारांजाच्या उक्तीप्रमाणे जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे आज म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीवर निर्याण झाले . त्यांचा अभंग गाथा हेच त्यांचे खरे वाङ्मयरूप आहे. तुकोबाराय जर समजावून घ्यायचे असतील तर त्यांचा अभंग गाथा अर्थारुद्ध होऊन वाचला कीं खरे तुकाराम महाराज समाजातील म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात गाथा अवश्य ठेवावा. रामकृष्ण हरी ।।

-भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले  

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

परी मी त्यासी न म्हणे संत

करिशी ते देवा करि माझे सूखे । परी मी त्यासी न म्हणे संत ॥१॥
जया राज्य द्रव्य करणे उपार्जना । वश दंभ माना इच्छे झाले || २॥
जग देव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भार वाही ।।३।।
तुका म्हणे भय न धरी मानसी । ऐशियाचे विशी करिता दंड ।।४।।
परमार्थ मार्ग म्हणावा तसा सोपा नाही . आज सकाळपासून विविध घडामोडी घडत आहेत . त्यात काही परमार्थातील आहेत काही राजकारणातील आहेत . एकमेकांची अब्रू चोहट्यावर आणण्यात धन्यता मानतात . " मतामतांचा गलबला । कोणीच ऐकेना कोणाला । थोर म्हणताच । वाया गेला ।।" हे एक संत वाचन आहे . संत नव्हती जागा माणसाच्या सारिखे ।। संत हे सांसारिक माणसासारखे नसतात. त्यांना कुठलीही उपाधी आवडत नाही . उपाधिरहित जीवन हे खरे संत जीवन असते . " मांडीना स्वतंत्र फड । अंगी अहंता येईन वाड ।।" हे नाथरायांनी चिरंजीवपदात सांगून ठेवले आहे पण ! कोण ऐकतो ? गड, फड , या उपाधीने महाराज शोभत नाही तर तो स्वरुपस्थितीने शोभत असतो . राजकारण आणि परमार्थ या दोन वेगळ्या बाजू आहेत . त्याची सरमिसळ होता कामा नये .
एकदा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांना एकाने संत कसे असतात असे विचारले ? तेव्हा त्याचे उत्तर त्यांनी दिले ते म्हणतात " हे देवा ! माझे काय व्हायचे ते होवो पण ! अशा व्यक्तीला संत म्हणणार नाही , ज्याला राजकारण करून परमार्थ करायचा , द्रव्य मिळवायचे,व आपले पोट भरायचे , ज्याच्या मनामध्ये दंभ आहे , दंभ म्हणजे असतो एक आणि दाखवतो दुसरेच , आणि इच्छेचे अधीन ज्याचे जीणे झाले आहे . अशा व्यक्तीला मी संत म्हणणार नाही . वास्तविक जगत ब्रहम आहे , देव आहे तरीही मी निवडनिवड करिन ज्यांना आत्मज्ञान नाही केवळ राजकारण करून आपले संतपण, महंतपण टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न जो करतो तो ज्ञानदृष्टी नसलेला आंधळा आहे असा व्यक्ती नुसता भारवाही हमाल आहे. त्याचे संतजीवन , महंतपण व्यर्थ आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या काळी सुद्धा असे काही महंत होतेही त्यांचा महाराजांनी तीव्र शबदात निषेध केलेला आहे. " भिक्षा पात्र अवलंबिणे । जळो जीणे लाजिरवाणे ।।" कष्ट न करता , ज्ञान नसताना भिक्षा मागणे हे लाजिरवाणे जीणे आहे . " हरिभजनें हे ढवळीले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ।।" हे साधूचे काम आहे . आता कुठेही पाहावे तर साधू ,महंतांच्या मारामाऱ्या , कुंभमेळ्यात तर तलवारीने मारामाऱ्या होतात हे ऐकणाऱ्याला लाज वाटते महंतपद, मंडलेश्वर , महामंडलेश्वर या पदव्या मिळवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात हे वास्तव आहे . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात कि " न होती ते संत करिता कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ।।१।। येथे नाही वेष सरते आडनाव ।निवाडे घावडावं व्हावा अंगी ।।२।। नव्हती ते संत धरीता भोपळा करिता वाकला प्रावरण ।।३।। नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराणे नव्हती संत ।।४।। नव्हती ते संत वेदाच्या पठणे ।कर्म आचरणे नव्हती संत ।।५।। नव्हती संत करिता तप तीर्थाटणें । सेविल्या वन नव्हती संत ।।६।। नव्हती संत माळा मुद्रांच्या भूषणे । भस्म उधळणे नव्हती संत ।।७।। तुका म्हणे नाही निरसीला देह । तोवरी अवघे हे सांसारिक ।।८।। तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा जर विचार केला तर मला वाटत नाही एखादा तरी खरा संत सापडेल कि नाही ? आणि अशा दांभिक संतांविषयी महाराज म्हणतात कि अशा माणसाला दंड करण्यात मला बिलकुल भीती वाटत नाही . किंवा ज्याला दंड करण्याचा अधिकार आहे त्याने तरी भय भरू नये .

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

खंडित शून्यवाद

जय हरी !  
अभावातून भावाची कधीही उत्पत्ती होत नसते व भावरूप पदार्थाचा कधीही अभाव होत नसतो . पण शून्यवादाची जे सहा नास्तिक तत्वज्ञान सांगणारे शास्त्रे आहेत ते म्हणतात कि " हे जग शून्यातून निर्माण झाले ". हे शून्यवादी अभाव प्रमाण मानतात पण विचार करा नसण्यातून असणे कधीच निर्माण होत नाही . शून्य म्हणजे अभाव . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात " न झाला प्रपंच आहे परब्रहम ।अहं सोहम ब्रह्म आकळले ।।" कोणतेही मिथ्या पदार्थाला अधिष्ठान सत्य लागत असते . सत्य अधिष्ठानाशिवाय मिथ्या पदार्थ भासत नाही . शून्यवादी मात्र म्हणतो कि काहीहि जे नाही तेच जग निर्माण करते . किती हास्यास्पद आहे . " वांझेचीया पुत्रा कैची जन्म पत्रिका ।।" वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कशी असू शकेल ? तसे जग अधिष्ठानाशिवाय कसे दिसेल किंवा भासेल ? " रज्जू सर्पाकार। भासियेले जगदंबर ।।" असे तुकाराम महाराज म्हणतात. ( विवर्तवाद ) एके हाती दंतु । जो स्वभावाता खंडितु ।।... ज्ञा . तात्पर्य शून्यवाद हा स्वभावात:च खंडित आहे . एक सुंदर दृष्टांत आहे ... एक भिकारी एका घराच्या बाहेर उभा राहून भिक्षेकरिता हाक मारतो व म्हणतो " माई भिक्षा वाढा " आतील बाई म्हणते कि " पुढे जा पुढे ! घरात कोणी नाही . ! शून्यवादाची अशी स्थिती आहे कोणी नाही म्हणणारा कोणी तरी आहे ना ? म्हणजे नाही म्हणायचे त्याकरिता सुद्धा कोणीतरी अगोदर असावे लागते . आणि खरोखर कोणीच नसते तर कोणीच उत्तर दिले नसते . आणि म्हणे शून्यातून जग निर्मण झाले . कधी कधी एखादा माणूस म्हणतो सुद्धा " अहो ! माझ्या बापाने काहीहि केले नाही मीच सर्व शून्यातून निर्माण केले ." यालाच वदतो व्याघात दोष म्हणतात. "नासते विद्यते भावो नाभावो विद्यते संत:।। " वेदांत जग नाही असे म्हणत नाही तो म्हणतो जग आहे पण कसे " रज्जू सर्पवत " ते हि तुम्ही म्हणता म्हणून अगदी सोप सांगायचे तर व्यवहारात सुद्धा लोक म्हणतात "दिसत तस नसत म्हणून जग फसत " स्वप्नातील पदार्थ स्वप्न काली दिसतात पण जागे झाले कि ते मिथ्या ठरतात . स्वप्नातील पदार्थ हे अनिर्वाचिनीय व अतींद्रिय आहेत तरी पण ते भासतात . व जागे झाल्यावर त्याचे अस्तित्व संपते . तद्वत ब्रह्मज्ञान झाले कि जगद्भ्रास मिथ्या ठरतो .म्हणून अभाव प्रमा मानणारा शून्यवाद सहजच खंडित होतो .