मित्रांनो मी मागील वर्षी डिसेंम्बरमध्ये ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेथे मेलबर्न येथे माझ्या मुलाकडे राहिलो होतो दोन महिने मी जवळ जवळ बारा हजार किलोमीटर प्रवास केला व तेथील परिस्थती जाणून घेण्याचा प्रयत्न केला . मी जेव्हा प्रवासास निघत असे तेव्हा आवर्जून तेथील पशुधन कसे सांभाळतात ते पाहत असे . तेथे जवळ जवळ सर्वत्र हिरवळ दिसते . मोठमोठे शेतीचे प्लॉट आणि त्यात वेगवेगळ्या फळ बागा , व पिके दिसत होते . फार छान वाटायचे . विशेष म्हणजे तेथे सर्व प्रकारच्या पशूंची फार काळजी घेतलेली दिसत होती . पैकी गाईंची ठेवलेली निगा व त्यांची घेतलेली योग्य काळजी , व्यवस्था बघितल्यानंतर असे वाटले कि आपल्याकडे का नाही अशी व्यवस्था होऊ शकत ? तेथे साधारणपणे १०० ते २०० एकरमध्ये विस्तीर्ण अशा मैदानात फक्त गवत लावलेले आणि त्यामाध्जे एक छानपैकी शेततळे व त्या मैदानात हजाराच्या आसपास गाई मोकळ्या चरण्यासाठी सोडल्याल्या त्यांच्या मानेवर दावे नाही . सभोवताली तारेचे कुंपण व त्यातून वीज सोडलेली कि ज्यामुळे बाहेरचा कुणी आत येत नाही व आतले जनावरे बाहेर जात नाहीत सर्व गाया मुक्तपणाने तेथे चरतांना दिसतात होत्या . व अंगाने धष्टपुष्ट अशा दिसत होत्या व तेथे दुधाचे वेगवेगळे पदार्थांची रेलचेल दिसते . मौल्मधे चीज, श्रीखंड, दही, व दुध तर विचारू नका त्याचे प्रकार म्हणजे milk with vitamin- A , B , C व milk with full cream , half cream असे प्रकार ते बघितल्यानंतर मला आपल्याकडचे पशुधन व त्याची दुरवस्था आठवायची .
सांगायचा मुद्दा असा कि आपल्या महाराष्ट्रात जनावरांची फारच दुरवस्था आहे . गोहत्या बंदी कायदा असून सुद्धा गाईंची हत्या झाल्याशिवाय राहत नाही . आजच सकाळला बातमी वाचली ३०० किलो मांस संगमनेरमध्ये सापडले . शेतकरी रस्त्यावर गाई सोडू लागले आहेत , जनावरांच्या बाजारात कमी भावात जन्वरांची विक्री सुरु आहे , लपून छपून कसाईच हे जनावरे विकत घेतात . दुष्काळामुळे पाणी नाही, चारा नाही …. चाराडेपो सुरु करा म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे परतू शासन लक्ष देत नाही आणि छावणीसाठी एवढे जाचक नियम व अटी करून ठेवल्या आहेत कि कोणी छावणी सुरु करू इच्छित नाही . गम्मत म्हणजे छावणीतील जन्वारांच्या शेणाचे देखील ऑडीट होणार आहे आणि त्या शेणाची किमत ठरविली जाऊन छावणी मालकाच्या बिलातून ती रक्कम कापून घेतिली जाणार आहे त्यामुळे काय होईल कोणी किती" शेण खाल्ले " हे उघड होणार ह्या सर्व प्रक्रियेत जीव जाईन तो या मुक्या जनावरांचा व शेतकर्यांचा . तेव्हा सरकारने याकडे गांभीर्याने बघायला हवे . . आता ज्या छावण्या आहेत त्या अतिशय थोड्या आहेत . नगर तालुक्यातील जनावरे आष्टी तालुक्यात नेले जातात …छावणी म्हणजे एक छोटेशे गावच असते . तेथील आरोग्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनतो त्याकरिता चारा डेपो जर सुरु झाले व शेतकर्यांना चारा घरी नेता आला तर शासनाचा बराच भाग हलका होईल .. असो काहीही चांगले उपाय करून हे पशुधन वाचवणे महत्वाचे आहे . विविध तज्ञ मंडळी शासनात आहे त्यांनी हे तातडीने कारवाई करावी एवढीच माफक अपेक्षा .
अशोकानंद महाराज कर्डिले