शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

विचाराचे चिरंतनत्व

                                 

                              
        विचाराचे चिरंतनत्व

          माणसाला एक गोष्ट कळली पाहिजे ते म्हणजे "त्याला कळत नाही हे त्याला कळले पाहिजे." पण !काय करावे त्याला हेच कळत नाही कि त्याला कळत नाही . नाकळे ते कळे कळे ते नाकळे ।वळे ते नावळे गुरुविण ।। ए. म. हरिपाठ ।। जगत मिथ्या असूनही सत्य वाटते व परमात्मा सत्य असूनही तो सत्य वाटत नाही . जसे जगात एक आंधळा असा आहे कि त्याला जगत दिसत नाही फक्त परमात्मा दिसतो, व दुसरा एक आंधळा आहे ज्याला देव न दिसता जगत दिसते आणि ते सत्य वाटते. " सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे । वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे । कवणा मी शरण जाऊ दृष्टी देई जो निर्मळ ।।.... येथे दृष्टी सुर्ष्टीवाद आहे म्हणजे दृष्टीकाली सृष्टी . ईशसृष्टी आणि जीव सृष्टी असाही एक सुंदर विचार पंचदशीमध्ये आला आहे. असो जगात विचार हा खूप महत्वाचा भाग आहे . विचारला कोणीही नष्ट करू शकत नाही हेही तितकेच खरे आहे. कार्ल मार्क्सने कम्युनिझम सांगितला " दास कॅपिटल" नावाचा ग्रंथ लिहला त्याचा एवढा परिणाम झाला कि संपूर्ण रशिया, चीन हे कम्युनिष्ट झाले म्हणून विचार हि चिरंतन राहणारी बाब आहे. महाराष्ट्रात झालेले संत, विचारवंत त्यांच्या विचाराने समाजात एक वेगळी जागृती आणली . संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज , संत नामदेव महाराज अगदी संत निळोबाराय आदी संत व आधुनिक कालावधीमध्ये झालेले संत महंत यांनी समजला एक विचार दिला व वराकारी परंपरा अबाधित राहिली कर्मठपणाला या परंपरेत स्थान नाही " चंद्रभागे स्नान । विधी तो हरिकथा ।।" असा सुंदर विधी पंढरीचा आहे , कर्माची कटकट नाही, सोवळे ओवळेपणाचे अवडंबर नाही .
           असा एखदा क्रांतिकारी विचार आला  कि मग मात्र कर्मठ प्रस्थापितांना मात्र हे सहन होत नाही मग अशा विचारवंताना हे लोक विरोध करतात तो विरोध नाना प्रकारचा असतो कधी निंदा करून, कधी प्रलोभन दाखवून, कधी चारित्य्रावर संशय घेऊन, आणि कशानेही जमले नाही कि मग ते त्या विचारवंताला या जगातूनच नाहीसे करतात.
           ग्रीस देशातील महान तत्वेता सॉक्रेटिस , वै . ह.भ.प श्री मामा (सोनोपंत) दांडेकर या सॉक्रेटिसची तुलना आपल्या जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि संत श्री कबीर महाराज यांच्याबरोबर करायचे . या सॉक्रेटिसने आत्म्याचे अमरत्व सांगितले आणि अंधश्रद्धेवर आघात केले.सॉक्रेटिस हा एक थोर शिक्षक गणला जातो. त्याची शिक्षणपद्धत ही वेगळीच होती व तो प्रश्न विचारत-विचारत शिकवे व लोकांकडून उत्तरे मिळवे. "ex duco" चा अर्थ "lead out" होतो जो "education" ह्या शब्दाचा गाभा आहे. उत्तरे "मिळवणे" हे "lead out" किंवा त्यातूनच मार्ग दाखवणे अशा अर्थाने पाहिले तर अशा शिक्षणपद्धतीचे महत्त्व पटते.  पण त्यांचे विचार व आचार तत्कालीन प्रस्थापित कर्मठ लोकांना पटले नाही त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण सॉक्रेटिसने त्यांना दाद दिली नाही. शेवटी त्यांच्यावर खटला  भरला व त्यावेळी कोर्टात न्यायाधीशाने त्यांना विचारले ," सॉक्रेटिस ! तुम्ही म्हणता कि मला जे कळले ते कोणाला कळले नाही , तुम्हाला काय कळले कि जे इतरांना कळले नाही ? तेव्हा सॉक्रेटिसने सांगितले कि " महोदय ! मला जे कळले आहे ते या लोकांना कळले नाही , तुम्ही म्हणता तुम्हाला काय कळले , तर महाराज ! मला कळत नाही हे मला कळले आहे आणि हेच या लोकांना कळले नाही . अज्ञानाचे ज्ञान याना नाही मला माझ्या अज्ञानाचे ज्ञान झाले आहे . " एवढ्या मोठया तत्ववेत्याला शेवटी देहांताची शिक्षा देण्यात आली . त्यांना हिरकणी खाऊ घालून मारण्यात आले पण त्यांच्या विचारांना ते मारू शकले नाही उलट त्यांचे शिष्य प्लेटो व ऍरिस्टॉटल त्यांनी सॉक्रेटिसची ही प्रश्नावली लिहून ठेवल्यामुळेच ती आज जगाला माहीत आहे असे समजले जाते. त्यांचे विचार पुढे जास्त प्रमाणात प्रसार पावले . तत्ववेता संपवला पण त्याचे तत्वज्ञान मात्र संपवू शकले नाही.  याचप्रमाणे येशू ख्रिस्त , सेंट जोन्स , अशा अनेक विचारवंतांना प्रस्थापितांनी संपवले पण त्यांचे विचार संपवू शकले नाही कारण विचार हे चिरंतन असतात एवढेच मला सांगायचे आहे .
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी(पा)
मो. ९४२२२२०६०३
       

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

।। वाचावी ज्ञानेश्वरी ।।


                                                    ।। वाचावी ज्ञानेश्वरी ।।
             जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते.आणि त्यांना "फादर ऑफ ड्रामा" असेही म्हटले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात. विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म इंग्लंड देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन या गावात इ.स. १५६४ साली झाला. समजा तुम्ही जर पर्यटनासाठी इंगलंडमध्ये गेलात आणि तेथील जाणकार माणसाची भेट झाली आणि तुम्ही जर त्याला सांगितले कि इंग्लडमध्ये बराच फिरलो आणि अमुक बघितले तमुक बघितले " त्यानंतर तो समोरचा माणूस तुम्हाला विचारतो कि " तुम्ही सगळा इंग्लंड फिरून बघितला पण काहो ! तुम्ही आमच्या देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन या गावात गेला होता का ? ते आमच्या शेक्सपियरचे जन्मस्थान आहे " आपण जर ते बघितले नाही म्हणून सांगितले तर तो माणूस म्हणतो मग तुम्ही काहीच बघितले नाही . असो हे सांगण्याचे तात्पर्य त्या लोकांना त्याच्या एका नाटककाराचे किती अप्रूप वाटते . मित्रानो ! जगामध्ये कुठेही तुम्ही जा तुम्हाला मंदिरासाठी खांब दिसतील पण अहमदनगर जिल्यातील नेवासा हे असे एकमेव गाव आहे येथे फक्त खांबासाठी मंदिर आहे.  जगात  अनेक भाषेत जिची भाषांतरे झाली आहेत अशी ज्ञानेश्वरी या खांबाला टेकून माउली ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरील टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी सांगितली आणि सदचिदानंद बाबा यांनी ती लाऊन घेतली . शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ।।ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय ओवी क्र. १८१० माउलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने भगवद गीतेवर मराठीत भाष्य केले , देशीकार लेणे केले . "माझा मऱ्हाटीचा बोलू कौतुके । परी अमृताते पैजा जिंके ।ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।। (ज्ञाने - ६.१४)  माउलींनी ग्रंथ सांगितला व सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला . ग्रंथ लेखन गोदावरी तटी नेवासे क्षेत्री झाले . आपणही हा विचार केला पाहिजे कि "जर तुम्ही महाराष्ट्रात आलात आणि नेवाशाला जाऊन माउलीचे मंदिर बघतिलेले नाही तर तुम्ही काही बघतिलेले नाही ."
            ग्रंथ निर्मितीची माहिती , लेखक, ठिकाण , साल, तत्कालीन राजा यांची नोंद ग्रंथाच्या शेवटी माउलींनी केली आहे. पण यात तिथीचा उल्लेख नाही . आणि असा अलौकिक ग्रंथ जिथे तयार झाला त्या ठिकाणाविषयी आपल्याल स्वाभिमान नसावा का ? इंग्लडच्या लोकांना त्यांच्या एका साहित्यिकाचा जाज्वल्य स्वाभिमान आहे किंबहुना जर त्या शेक्सपिअरच्या गावाला भेट दिली नसेल तर काही अर्थ नाही असे त्यांना वाटते आम्हाला जिथे ज्ञानेश्वरी तयार झाली त्या नेवाशाविषयी माहितीही नसावी ? खरे तर येथे संतपीठ होणे आवश्यक आहे . बहुजन समाजाला संस्कृत समजत नव्हती आणि तळागाळातील लोकांपर्यंत हे गीतेचे ज्ञान गेले पाहिजे त्याकरिता माउलीला करुणा निर्माण झाली आणि त्या करुणेपोटी ज्ञानेश्वरी निर्माण झाली आणि मऱ्हाठी  भाषेत लिहली गेली , " तो शांतूची अभिनवेल । ते परियसा मऱ्हाठी बोल । जे समुद्राहूनी खोल अर्थभरित ।।"किंवा तेथ साहित्य आणि शांती । हि रेखा दिसे बोलती । जैसी लावण्या गुण कुलवंती । आणि पतिव्रता ।। " मर्हाठीचे हरवलेले वैभव ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा मिळवून दिले . वेदांताची प्रस्थान त्रयी म्हणजे " गीता, दशोपनिषदें , ब्रहमसूत्र " त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाची सुध्हा प्रस्थान त्रयी आहे ती म्हणजे " ज्ञानेश्वरी , एकनाथी भागवत,व तुकाराम महाराजांचा गाथा." ज्ञानेश्वरीचे लाखो पारायणे झाली पण त्यातील गोडी यत्किंचितही कमी झाली नाही . ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रकारे साहित्य विश्वातील हि एक क्रांतीच केली म्हणावे लागेल. वेदातील तत्वज्ञान गीतेमध्ये आले आणि गीतेतील तत्वज्ञान मराठीत ज्ञानेश्वरीत आले हि मोठी क्रांती झाली. किंबहुना माउलींनी वेदातील उणेपणा सुद्धा काढला , " वेदु कृपण जाहला । जे कानी त्रिवर्गाचे लागला । स्त्री शूद्रासी अबोला ।अद्यापि ठेला ।।" वेदातील हे उणेपण ज्ञानेश्वरीच्या रूपाने भरून निघाले .  "पसायदानासारखा मराठीतील शांतिपाठ माउलींनी एकूणच सर्व विश्वाला अर्पण केला. "ओवी ज्ञानेशाची।  सुश्लोक वामनाचा ! आर्या मयुरपंतांची ! अभंग वाणी तुकयाचा ! " असाही गौरव या मराठी कवींचा केलेला आहे . ज्ञानेश्वरीचे महत्व विशद करतांना संत जनाबाई म्हणतात ," वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पाहावी पंढरी ।।१।। ज्ञान होय अज्ञानासी । ऐसा वर त्या टीकेसी ।।२।। ज्ञान हो मूढा । मूर्ख अति त्या दगडा ।।३।।वाचली जो कोणी । जणी त्यासी लोटांगणी ।। " ती ज्ञानेश्वरी कशी वाचावी हे संत एकनाथ महाराज सांगतात ," भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ।।१।।स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णू । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी ।।२।।" तात्पर्य भावनेने , श्रद्धेने हे ज्ञानेश्वरी जर आपण अभ्यासली तर ब्रहमज्ञान सहज होऊ शकते.
            एकनाथ महाराजांनी ग्रंथ शुध्द् केला अर्थात आजच्या भाषेत ग्रंथाचे संपादन केले . या ग्रंथशुद्धीची तिथी व साल दोन्हीची नोंद नाथ महाराजांनी केली आहे . ही तिथी आहे भाद्रपद वद्य षष्ठी .  ग्रंथ निर्मितीची तिथी उपलब्ध नसल्याने याच तिथीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी केली जाते.  बहुकाळ पर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी । प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाठी संपूर्ण जाहली ।। संत एकनाथ महाराजांनी केलेला ग्रंथशुद्धीच्या(संपादन)  तिथीचा निर्देश. म्हणून याच दिवशी ज्ञानेश्वरीची जयंती मानण्याची वारकऱ्यांची परंपरा आहे.
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी (पा) ता. नगर
मो. ९४२२२२०६०३