मंगळवार, ११ जुलै, २०१७

परपीडक तो आम्हा दावेदार

                                        
परपीडक तो आम्हा दावेदार
      दुर्जनाची जाती । त्याचे तोंडी पडे माती ।। त्याची बुद्धी त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ।। ... खळ दुर्जनाची जातीचं अशी असते कि तिला चांगले वाईट लोक काही काळत नसते. तो दोष दृष्टीने सगळीकडे पाहतो आणि काहीही बडबडतो.  कडू वृंदावन गुळाने माखले तरी ते गोड होईल काय ? काळे जिरे पांढरे होईल काय ?" तैसी अधमाची जाती अधम । उपदेश करावा श्रम तो ।।" विचंवाचे अंग कुरवाळले म्हणजे त्याचा स्वभाव जाईल का ? तो नांगी मारून आपला रंग दाखवल्याशिवाय राहणार नाही . त्याच्या तो जातीं स्वभावच आहे . महाराजांनी एका अभंगात फार छान सांगितले " देव्हाऱ्यावरी विंचू आला । देवपूजा नावडे त्याला । तेथे पैंजऱ्याचे काम । अधमा तो अधम ।। घराची रुसली दासी । धनी समजावी तिसी । तेथे बटिकीचे काम । अधमा तो अधम ।। पाया झाला नारू । त्यासी बांधिला कपूरु । तेथे बिबव्याचें काम । अधमा तो अधम ।। " कडू निंबाच्या झाडाला साखरेचे आळे केले तरी त्याच्या निंबोळ्या कधीही गोड होत नाहीत . "तैसे अधर्माचे अमंगळ चित्त । वामन ते हित  करून सांडी ।।"  खापरा परिस काय करी ।। डुकराच्या कपाळावर केशर लावून काय उपयोग ?
       जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी मेघवृष्टीने उपदेश केला म्हणून काय तो सगळयांना रुचला काय ? सात्विक वृत्तीच्या लोकांना ते पटले पण अधमांना मात्र ते रुचले नाही .. जे जातिवंत दुष्ट आहेत त्यांना तुम्ही कितीही सांगा काही उपयोग होत नाही . दया शांती , क्षमा हे फार महान गुण आहेत पण दुर्जनाला त्याचा काहीही उपयोग होत नाही . उलट तो त्याची टर उडवितो . म्हणून त्याला त्याच्याच भाषेत सांगावे लागते. 'लातो के भूत बातोसे नाही मानते '." किती उपदेश करावा खळाशी ।नावडे तयासी बरे काही । शुद्ध हे वासना नाही चांडाळाची ।होळी आयुष्याची केली तेणे ।।" हे चांडाळ स्वात:च्या आयुष्याची होळी करून थांबत नाहीत तर ते दुसऱ्याच्या पण आयष्याची होळी करतात. ह्या असल्या दुष्ट लोकांना क्षमा दाखवणे म्हणजे सज्जनांना छळण्याचा त्यांना परवाना दिल्यासारखा आहे. विंचवाची नांगी ठेचायची असते हा धर्मच आहे . 'दया तिचे नाव भुतांचे पाळणं । आणिक दंडन कंटकाचे ।।' दया म्हणजे सर्व सामन्याचे पालन करणे आणि दुष्टाला शिक्षा करणे हि दयाच आहे .
        हे एवढे कशासाठी लिहतोय ! चार दोन दिवस झाले कि पेपरला,टी व्ही वर बातम्या झळकतात ' भारत पाकिस्तान कुरबुरीत भारतचे पाच शाहिद झाले आणि त्यांचा एका सैनिकाला कंठस्नान घातले. अतिरेकी हल्ला करून पळून जाण्यात सफल झाले . आत्ता काल अमरनाथ यात्रेकरूंवर भ्याड हल्ला झाला त्यात महाराष्ट्राचे दोन जण आहेत. अरे ! आमचे हिंदूंचे पवित्र स्थान तिथे जाऊ न देण्याची हि प्रवृत्ती कोणती म्हणायची? बरे ते स्थान भारतातच आहे .... मानसरोवर - रस्ताच बंद करून टाकला  तेथेही जाता येत नाही . आपण जर तेथे गेलो नाही तर आपली ती वाट मोडून जाईन आणि आपले एक देवस्थान तिथे होते याची पुढच्या पिढीला आठवण सुद्धा येणार नाही. आणि त्यांना तेच अपेक्षित आहे.म्हणून त्यांनी हा मार्ग शोधला आहे. बरे ! अनेक वेळा हेच चालले आहे . सीमा सुरक्षित नसल्या तर नीट झोप तरी येईल काय ? काश्मीरमध्ये सैनिकांवर नागरिक दगडफेक करतात तेव्हा सैनिकाला काही करता येत नाही ... काय हि अगतिकता ? चर्चा करा वाटेल त्या मार्गाने काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होणे आवश्यकच आहे. अतिरेकी हा कोणत्याही एका धर्माचा असत नाही पण अतिरेकी मात्र जेव्हा त्याला जिहाद नाव देतात तेव्हा विचारच करावा वाटतो . आता कालच्या हल्ल्यात एक 'संदीप शर्मा ' नावाचा हिंदू अतिरेकी निघालाय . आणि सलीम शेख नावाचा ड्रायव्हर याने पन्नास जणांचे प्राण वाचवले . त्याला मी सलाम करतो व धन्यवाद देतो . काय म्हणावे याला दुष्टाला जात नसते हेच खरे . पण तो कोणीही असो तो  ठेचलाच पाहिजे हेही तितकेच खरे आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आड येणारे स्वकीय सुद्धा सोडले नाही . तुकोबाराय म्हणतात ' परपीडक तो आम्हा दावेदार । विश्वी विश्वंभर म्हणऊनि ।। दंडु त्यागु बळे नावलोकू डोळा । राखू तो चांडाळा ऐसा दुरी ।। अनाचार काही न साहे अवगुणे ।बहू होय मन कासावीस ।।तुका म्हणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळी चित्ते ।। ' विश्व् हे परमात्स्वरूप आहे सर्वत्र एक ईश्वरच आहे तर मग दुसऱ्याला त्रास देणारा हा ईश्वरालाच त्रास देतो असे म्हणावे लागते .म्हणून असा हा चांडाळ , दुष्ट,. दुर्जन आमचा दावेदार आहे आम्ही त्याला दंडन केल्याशिवाय राहणार नाही . संतांनी सुद्धा  समाजात शांतता नांदावी असे वाटत असेल तर काय केले पाहिजे हे स्पष्ट सांगितले आहे . ' दुर्जनांचा मान । सुखे करावा खंडन ।। लात हाणोनिया वरी । गुंड वाट शुद्ध करी ।। बहुता पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ।। तुका म्हणे नखे । काढून टाकीजेते सुखे ।।' याप्रमाणे गुंड , दुष्ट यांना योग्य वेळी शिक्षा केलीच पाहिजे . तेथे लवचिक धोरण काही कामाचे नाही . भारताच्या कोणत्याही बाजूने घुसखोरी होऊ शकते कोणाला काही भय राहिले नाही सीमा पोखरून निघाल्यात कधी नव्हे तो चीन सुद्धा धमकी देतो . पाकिस्तान अणू बॉम्बची धमकी देतोय . काय चाललय ? चिनी वस्तूंनी सर्व बाजारपणे काबीज केली आहे . ते एक प्रकारचे छुपे युद्ध आहे . देशात अराजक मजल्यासारखे वातावरण झाले आहे . शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत . कर्जमाफी घोषणा फसवी ठरत आहे ... निसर्ग सुद्धा कोपला आहे काही ठिकाणी अतोनात पाऊस आहे तर काही ठकाणी दुबार पेरणीचे संकट उभे आहे . सर्व बाजूनी जनता भरडून निघत आहे यावर आता राज्यकर्त्यांना ईश्वरच सुबुद्धी देवो हीच अपेक्षा . कारण" राजा कालस्य कारणं ।।"

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले