मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

परी मी त्यासी न म्हणे संत

करिशी ते देवा करि माझे सूखे । परी मी त्यासी न म्हणे संत ॥१॥
जया राज्य द्रव्य करणे उपार्जना । वश दंभ माना इच्छे झाले || २॥
जग देव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भार वाही ।।३।।
तुका म्हणे भय न धरी मानसी । ऐशियाचे विशी करिता दंड ।।४।।
परमार्थ मार्ग म्हणावा तसा सोपा नाही . आज सकाळपासून विविध घडामोडी घडत आहेत . त्यात काही परमार्थातील आहेत काही राजकारणातील आहेत . एकमेकांची अब्रू चोहट्यावर आणण्यात धन्यता मानतात . " मतामतांचा गलबला । कोणीच ऐकेना कोणाला । थोर म्हणताच । वाया गेला ।।" हे एक संत वाचन आहे . संत नव्हती जागा माणसाच्या सारिखे ।। संत हे सांसारिक माणसासारखे नसतात. त्यांना कुठलीही उपाधी आवडत नाही . उपाधिरहित जीवन हे खरे संत जीवन असते . " मांडीना स्वतंत्र फड । अंगी अहंता येईन वाड ।।" हे नाथरायांनी चिरंजीवपदात सांगून ठेवले आहे पण ! कोण ऐकतो ? गड, फड , या उपाधीने महाराज शोभत नाही तर तो स्वरुपस्थितीने शोभत असतो . राजकारण आणि परमार्थ या दोन वेगळ्या बाजू आहेत . त्याची सरमिसळ होता कामा नये .
एकदा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांना एकाने संत कसे असतात असे विचारले ? तेव्हा त्याचे उत्तर त्यांनी दिले ते म्हणतात " हे देवा ! माझे काय व्हायचे ते होवो पण ! अशा व्यक्तीला संत म्हणणार नाही , ज्याला राजकारण करून परमार्थ करायचा , द्रव्य मिळवायचे,व आपले पोट भरायचे , ज्याच्या मनामध्ये दंभ आहे , दंभ म्हणजे असतो एक आणि दाखवतो दुसरेच , आणि इच्छेचे अधीन ज्याचे जीणे झाले आहे . अशा व्यक्तीला मी संत म्हणणार नाही . वास्तविक जगत ब्रहम आहे , देव आहे तरीही मी निवडनिवड करिन ज्यांना आत्मज्ञान नाही केवळ राजकारण करून आपले संतपण, महंतपण टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न जो करतो तो ज्ञानदृष्टी नसलेला आंधळा आहे असा व्यक्ती नुसता भारवाही हमाल आहे. त्याचे संतजीवन , महंतपण व्यर्थ आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या काळी सुद्धा असे काही महंत होतेही त्यांचा महाराजांनी तीव्र शबदात निषेध केलेला आहे. " भिक्षा पात्र अवलंबिणे । जळो जीणे लाजिरवाणे ।।" कष्ट न करता , ज्ञान नसताना भिक्षा मागणे हे लाजिरवाणे जीणे आहे . " हरिभजनें हे ढवळीले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ।।" हे साधूचे काम आहे . आता कुठेही पाहावे तर साधू ,महंतांच्या मारामाऱ्या , कुंभमेळ्यात तर तलवारीने मारामाऱ्या होतात हे ऐकणाऱ्याला लाज वाटते महंतपद, मंडलेश्वर , महामंडलेश्वर या पदव्या मिळवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात हे वास्तव आहे . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात कि " न होती ते संत करिता कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ।।१।। येथे नाही वेष सरते आडनाव ।निवाडे घावडावं व्हावा अंगी ।।२।। नव्हती ते संत धरीता भोपळा करिता वाकला प्रावरण ।।३।। नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराणे नव्हती संत ।।४।। नव्हती ते संत वेदाच्या पठणे ।कर्म आचरणे नव्हती संत ।।५।। नव्हती संत करिता तप तीर्थाटणें । सेविल्या वन नव्हती संत ।।६।। नव्हती संत माळा मुद्रांच्या भूषणे । भस्म उधळणे नव्हती संत ।।७।। तुका म्हणे नाही निरसीला देह । तोवरी अवघे हे सांसारिक ।।८।। तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा जर विचार केला तर मला वाटत नाही एखादा तरी खरा संत सापडेल कि नाही ? आणि अशा दांभिक संतांविषयी महाराज म्हणतात कि अशा माणसाला दंड करण्यात मला बिलकुल भीती वाटत नाही . किंवा ज्याला दंड करण्याचा अधिकार आहे त्याने तरी भय भरू नये .