गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

|| कामातुराणां भयं ना लज्जा ||

           


                  
                भारतीय तत्वज्ञानात चार पुरुषार्थ कल्पिलेले आहेत , धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष . यातील दोन पुरुषार्थ म्हणजे अर्थ आणि काम जरी साधले गेले नाही तरी चालते परंतु धर्म आणि मोक्ष मात्र संपादन केलेच पाहिजेत . तसेच अर्थ आणि काम हे पुरुषार्थ तेव्हाच पुरुशर्थ ठरतात जेव्हा त्यांना " धर्माची " चौकट असते " वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।" या तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे जर धन कमावले तर तो पुरुषार्थ ठरतो पण जर   म्हणजेच भ्रष्टाचाराने पैसा कमावला कि तो पुरुषापरध ठरतो . तसेच काम या पुरुषार्थाचे सुद्धा आहे " धर्माविरुद्ध भुतेषु कामोस्मि भारतषर्भ ।।" धर्मानुकूल काम हा पुरुषार्थ असतो . धर्माने विहित , निषिद्ध , काम्य, प्रायश्चित , कर्म अकर्म, विकर्म असे वेगवेगळे कर्माचे प्रकार सांगितले आहेत नित्य , नैमित्तिक कर्मे केलीच पाहिजेत व निषिद्ध कर्मे करूच नयेत व झालीच तर त्यासाठी वेगवेगळे प्रायश्चित कर्मे आहेत . असो काम म्हणजे इच्छा त्यातही सदिच्छा वेगळी आणि असदिच्छा वेगळी . समाजाची घडी नीट चालावी यासाठी धर्माने हे नियोजन केले आहे. पण आपल्यला माहित आहे कि कितीही चांगले नियोजन करा त्यात अम्मलबजावणी नीट होईल असे नाही . त्यात दोष राहतो आणि त्याचे परिणाम वाईट होतात .
                  चांगली प्रजा उत्पन्न व्हावी म्हणून धर्माने काम या विषयाला पुरुषार्थ ठरवले आणि त्याचे योग्य नियमन व नियोजन केले तर चांगली प्रजा उत्पन्न होते याचे अनेक उदाहरणे आहेत. व कामाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे भल्या भल्या व्यक्तींनी अत्याचार केल्याचे उदाहरणे आहेत . इतिहास पुराणातील उदाहरणे दिली कि हे म्हणतात पुराणातील वांगे पुराणात पण मित्रांनो तसे नाही ती एक प्रवृत्ती  आहे तिला काळाचे बंधन नाही . रावणासारख्याला काही कमी  नव्हते पण त्याने सुद्धा " हेमा " नावाच्या अप्सरेवर बलात्कार केला होता . तो पंडित होता ज्ञानी होता तरीही वासनेवर नियंत्रण मिळवू शकला नाही . इंद्राने वासनेपोटीच अहल्येशी समागम केला आणि शाप पदरात पडला . " महाराजांचा एक अभंग आहे "वासनेच्या सांगे नको जाऊ मना ।पहा त्या रावणा काय झाले ।।१।।।इंद्रा पडले भाग चंद्र झाला काळा । नारद चुकला चाळा भजनाचा ।।२।। " किंवा नाथ बाबा सांगतात कि " एडका मदन , केवळ पंचानन । धडक मारली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।।इंद्र चंद्रासी लाविला दरारा जेणे ।। तो जाण  केवळ पंचानन ।।" हि सगळी मोठ्यांची यादी आहे ज्यांना विधी निषेधाचे ज्ञान आहे अशांना वासना ताब्यात ठेवता अली नाही . अगदी ब्रहादेव तर स्वात:च्या मुलीच्या मागे वासनेने धावत होता . " ब्रम्हा डोलसते वेदार्थ ना कळे । तेथे हे आंधळे व्यर्थ होती ।। वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेडे नाही ऐसे सांगितले ।।" पण इकडे बघितले तर संत मंडळी मात्र सद्विचाराने " काम " या विषयावर मात  करू शकली . " जाई वो माते न करी सायास । आम्ही विष्णुदास तैसे नोहो ।। तुका म्हणे तुज जरी पाहिजे भ्रतार । तरी का इतर लोक थोडे ।।" याचा परिणाम असा झाला कि ज्या वाईट विचाराने ती श्त्री अली होती तीच बदलली आणि त्यांची अनुयायी झाली . म्हणून नियंत्रित काम हा पुरुषर्थ आहे आणि अनियंत्रित काम हा विनाशाला कारणीभूत होतो .
                      अनियंत्रित काम वासनेतूनच बलात्कार, अत्याचार असे  घडत असतात . अशा या वासनांध लोकांवर नियंत्रण  दोन प्रकारे ठेवले जाते १) संस्कारद्वारे २) कायद्याद्वारे ... रांझ्याच्या पाटलाने एका तरुण स्त्रीवर अत्याचार केला असता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा" चौरंग " केला म्हणजे हात पाय तोडून गाढवावरून धिंड काढली मग लोकांना कळले कि असे काही केले कि असे होऊ शकते . कामातुराणां भयं न लज्जा  वासनांध माणसाला भय वाटत नाही आणि लाजहि वाटत नाही . कायद्याचे भय नाही आणि नीतीची चाड नाही  . आता लोकशाही आहे अशा जबर शिक्षा होत नाहीत किंबहुना असे म्हटले जाते कि १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका  निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये . असे जर असेल तर गुन्हेगार कोर्टातून सुटून जातात हा आपला अनुभव आहे . तुकाराम महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतात " काय करू देवा सत्ता नाही हाती । दंडुनी पुढती लावू वाटे ।" हे देवा सत्ता हातात नाही , नाही तर असे अन्यायी अत्याचारी लोकांना मीच दंड केला असता . सत्ता परिवर्तन घडवते म्हणतात पण सत्ता ज्याच्या हातात आहे त्याची मानसिकता हवी . आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल मी का लिहतोय " कोपर्डीची " घटना सर्वांना ज्ञात आहे , दिल्लीत जेव्हा निर्भयाकांड झाले तेव्हा साऱ्या जगाने  दखल घेतली सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड लोक तर मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले होते .... ते योग्यच होते यात वाद नाही पण कोपर्डीची घटना त्याहून भयानक होती पण ! या घटनेला जातीय रंग देऊन दोन समाजात तेढ उत्त्पन्न झाली . आता हे दुष्टचक्र किती दिवस चालणार आहे . जाती जातीमध्ये सलोखा निर्माण होऊ शकत नाही का ? या सर्व गोष्टीला राजकारण कारणीभूत आहे . प्रत्येकजण जण तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेत असतो , फोटो छापून आणीत असतो . " तुका म्हणे ऐश्या नरा । मोजनि माराव्या पैजांरा ।।" किंवा तुका म्हणे याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगाव्या ।।" हा महाराजांचा सात्विक संताप आहे . दुर्दैव असे आहे कि आता जेलमध्येही या अशा लोकांची मोठी बडदास्त ठेवली जाते , तिथेहि हे गुन्हेगार त्याच तोऱ्यात वागत असतात. गुन्हा करणाऱ्याला भीतीच राहिली नाही . " सांगितले तरी नायकीती बटकीचे । पुढे शिंदळीचे रडतील ।।" असा शाप सुद्धा महाराजांनी दिलेला आहे. संस्काराने माणूस घडत असतो . धर्म माना  नका मनू हा भाग वेगळा पण परस्त्री मातेसमान मानायला काय हरकत आहे . "Brothers and sisters god is one "  हा संदेश स्वामी विवेकानंदानी अमेरिकन लोकांना शिकागो येथे दिला तेव्हा बंधू - भगिनी हा भाव त्यांना नवीन होता कारण त्यांना फक्त " Ladies and gentleman " एवढेच माहित होते.  दृष्टी बदलली कि जग सुंदर आहे आणि दृष्टी विकृत झाली कि जग हे नरक आहे . कीर्तनकार, प्रवचनकार, समाजसुधारक, नेते, पुढारी  हे सगळे उदबोधनात्मक बोलत असतात पण ! याचा परिणाम होत नाही . का ? त्याचे कारण म्हणजे " बोलते मगर करते नाही मुहसे भले लबाड ". वृत्तीसह कृती नाही " सर्वच कमर्शियल झाले आहेत त्यामुळे समाजाचा सुद्धा यांच्यावर विश्वास राहिला नाही . अध्यतमाच्या क्षेत्रात करोडो रुपयांची उलाढाल होत असते . पण सत्कारणी किती लागते हे ज्याचे  त्यालाच माहित . "सब पैसेके भाई आपणा कोई नाही " दहशतवाद्यास शाहिद म्हणण्याची प्रथा आपल्याकडे रुजवली जातेय . नथुराम गोडसेचे उद्दात्तीकरण केले जातंय हि कसली मानसिकता . स्वतंत्र्य लढ्यातील एक मोठा नेता बलात्कारी होता पण त्याचेही उदात्तीकरण झाले ...... एक खोटे दहा वेळा सांगितले कि ते खरे वाटू लागते . असो तरीसुद्धा लोकशाहीने आपणास विचार स्वतंत्र्य दिलेले आहे त्याचा उपयोग करून आपण आपल्या परीने आवाज उठवू अर्थात एवढया मोठ्या भाऊगर्दीत आपला आवाज विरून सुद्धा जाईल पण आपण प्रयत्न सोडायचे  नाही . " सदैव सैनिका पुढेही जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे ".

 भागवताचार्य  अशोकानंद महाराज कर्डीले